सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : पर्यावरणातील बदलामुळे व मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टी एकावेळी झाल्यामुळे 2019, 2021 मध्ये सांगली, कोल्हापूरमध्ये हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागले. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मित्राच्या माध्यमातून महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) प्रकल्प राबवित आहोत. जागतिक बँकेच्या माध्यमातून लवकरच 500 कोटीच्या कामाचे टेंडर काढू. पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 3200 कोटीचा प्रकल्प राबवत असून दुसऱ्या टप्प्यात मित्राच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) व महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित पूरनियंत्रण प्रकल्प व विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, विजया यादव व शिल्पा दरेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्राचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 2019 च्या पूरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर होती. सन 2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर पाहणी दौरा करून पर्यावरणातील बदलामुळे होत असलेले नुकसान यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी मित्रा च्या माध्यमातून एमआरडीपी प्रकल्प राबवित आहोत. जागतिक बँकेच्या माध्यमातून हा प्रकल्प हाती घेतला आहे.
आयटी सेक्टरला चालना देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा च उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, येथील आयटी इंजिनियर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी बाहेर जावे लागते. सांगलीला आयटी क्षेत्र चांगल्या पध्दतीने विकसीत करण्यासाठी प्रयत्न करू. आयटी कंपन्या येण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी जागा निवडावी. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, त्यामुळे रोजगार उपलब्धता होईल. सौर उर्जेवर उद्योगधंद्याना वीजपुरवठा यासाठी लवकरच धोरण आखत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी ॲग्रीस्टॅक योजना, सौर उर्जेव्दारे कृषी पंपाना वीज पुरवठा, केंद्र शासनाची एक जिल्हा एक निर्यात उत्पादन योजना, कृषी, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विकास साधण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, कोविड, पाणीपुरवठा व्यवस्था, नाविण्यपूर्ण येाजनेतून करण्यात येत असलेली कामे, कोविड आदि विषयांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा च उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सविस्तर आढावा घेतला. यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ॲग्रीस्टॅक योजना, पर्यटन, नाविण्यपूर्ण योजना अंतर्गत करण्यात येत असलेले प्रयत्न आदिबाबत सविस्तर माहिती देऊन जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा विकास आराखड्यात समावेश केलेल्या विविध बाबींबाबत माहिती दिली.
महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील पूर व्यवस्थापनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये शहरातील पूर समस्या, पूर प्रभावित क्षेत्र, शेरीनाला, सांडपाण्याशी संबंधित समस्या, पाणी साठत असलेल्या शामरावनगर येथील प्रस्तावित कामे व दीर्घकालीन आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती दिली.
बैठकीनंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी शामरावनगर व शेरीनाला येथे पाहणी करून विविध सूचना केल्या.