पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक संपन्न

पुणे दि. १४: आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पुणे विधानभवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त डॉ.योगेश म्हसे, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूने खोदाई सुरू असल्याने पावसाने दगड रस्त्यावर येऊन वारकऱ्यांना धोका होऊ उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावे.

उंडवडी कडेपठार येथील बारामतीकडे जाणाऱ्या जुन्या तुकाराम महाराज पालखी मार्गावरील राडारोडा दूर करावा, रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत, काम वेगाने पूर्ण करावे. इंदापूरकडे जाणाऱ्या पालखी महामार्गाचे कामाला वेग द्यावा. इंदापूर ते पंढरपूर दरम्यान पालखी महामार्गाच्या कामाला गती मिळणे आवश्यक असून पालखी जाईपर्यंत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात. पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले बांधकाम साहित्य त्वरित बाजूला करावे.

महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपली अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावे. जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची, गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषदेने जनरेटरची व्यवस्था करावी. आवश्यकता असल्यास जनरेटरसाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वादळात रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरात फलक खाली कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून अनधिकृत फलक तातडीने काढावे. त्यासाठी संपूर्ण मार्गावर महसूल, पोलीस अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त पाहणी करावी. अधिकृत जाहिरात फलकांचे संरचनात्मक स्थीरता परीक्षण (स्ट्रॅक्चरल स्टॅबिलीटी ऑडिट) करून घ्यावे, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.

कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख, दिंडीप्रमुखांशी संवाद साधून सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या वारकऱ्यांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करावे. असे आजार असलेल्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक ते तपासणीची व्यवस्था, औषधे पालखीमार्गावरील आरोग्य पथकांकडे ठेवावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विनय कुमार चौबे यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली. इतर उपस्थित जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना तसेच केलेल्या तयारीची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. पालखीचे रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी पालखी ट्रॅकिंग ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट वारी’ या संगणकीय उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांची संख्या मोजण्यात येणार असल्यामुळे भविष्यात अचूक नियोजनासाठी उपयोग होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0000