विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख शिक्षण देणार – शिक्षण मंत्री दादाजी भुसे

तुंगण दिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशात्सव कार्यक्रम

मालेगाव, दि. १६ (उमाका): विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी व त्यांच्या कल्पना शक्तीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्यपुर्ण  शिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

तुंगण दिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशात्सव कार्यक्रम शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी  ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी चित्रा देवरे, तहसीलदार कैलास चावडे, सरपंच, शर्मिला  पवार, प्रशासक पंढरीनाथ बोरसे, मुख्याध्यापक भाऊराव बहिरम,शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी,पालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रथमत: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  व्हिडिओ कॉलिंगद्वारे शाळा प्रवेशात्सव निमित्ताने  तुंगण दिगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधला व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, तुंगण दिगर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले 100 टक्के आदिवासी गाव आहे. येथील सर्व विद्यार्थी स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असून या शाळेला गावकऱ्यांचे  पूर्ण सहकार्य असल्यामुळे  इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षणाची सुविधा असलेल्या या शाळेत एकही विद्यार्थी खासगी शाळेत जात नाही, ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार शिक्षणमंत्री भुसे यांनी काढले.

शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासह विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. तसेच स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यात येईल. विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आवश्यक ते निधी शाळेला देण्यात येईल. त्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाबरोबरच कौशल्यपुर्ण शिक्षण देण्यात येणार असून तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असल्याचे यावेळी शिक्षणमंत्री भुसे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राज्यात साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यांच्यात शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करून शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल. या सोहळ्यामुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास शिक्षण मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वाद्य व पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा सहभाग होता. पहिलीच्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक, प्रवेश पात्र मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व पाहिले पाऊल उपक्रमांतर्गत ठसा आणि विद्यार्थ्यांना पुरणपोळी व आंबा रसाचे भोजन देण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या हस्ते त्यांच्या आईच्या साक्षीने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते उपक्रमांची भिंतीचे उद्घाटन करण्यात आले व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, टॅब व गणवेश वाटप करण्यात आले.

तुंगण दिगर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षक विविध नाविण्यपुर्ण उपक्रम उत्कृष्टपणे राबवित असल्यामुळे शिक्षकांचे  कौतुक शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शिक्षण मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेची माहिती व अडीअडचणी जाणून घेतल्या. शाळेच्या व गावाच्या सर्वांगिण् विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील व आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षण मंत्री भुसे यांनी दिली.

०००