मारुती चितमपल्ली वनसंपदेचे सजग प्रहरी – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपालांकडून पद्मश्री चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

मुंबई, दि. १९ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रसिद्ध निसर्गप्रेमी आणि लेखक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पद्मश्री चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या तरल आणि प्रवाही लेखनातून त्यांनी निसर्गाचे निरागस व निर्मळ विश्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.

ज्येष्ठ वनसंरक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतरही, चितमपल्ली आयुष्यभर वन्यजीव तसेच जैवविविधतेचे संरक्षक राहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने मानवतेचा आणि विशेषतः वनसंपदेचा सजग प्रहरी गमावला आहे. त्यांचे कार्य व वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबिय, चाहते आणि निसर्गप्रेमी जनतेला आपल्या शोकसंवेदना कळवतो, अशा शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

०००