मुंबई, दि. २४ : अंदाज समितीच्या माध्यमातून आर्थिक शिस्त, उत्तरदायित्व, कारभारात पारदर्शकता, अचूक अर्थसंकल्पीय अंदाज व गतिमान प्रशासनासाठी प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी राष्ट्रीय संमेलनाच्या समारोपानंतर विधानपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभा उपसभापती हरीवंश, अंदाज समिती अध्यक्ष डॉ. संजय जैस्वाल, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, लोकसभा सचिव उत्पलकुमार सिंह, राज्यसभा सचिव पी. सी मुडी, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.
समितीच्या कार्याविषयी माहिती देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, संसदेत अंदाज समितीने आपल्या ७५ वर्षाच्या प्रवासात १ हजारपेक्षा जास्त अहवाल दिले आहेत. समितीने वातावरण बदल, हरीत ऊर्जा, भारतमाला, एम्स यासह इलेक्ट्रीक वाहन धोरण यामध्ये महत्त्वपूर्ण शिफारशी शासनाकडे केल्या. संसदेत व राज्यांमध्ये समितीने केलेल्या शिफारशींपैकी ९७ टक्के शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत. येणाऱ्या काळात संसद सदस्य व विधानमंडळाच्या सदस्यांच्या कार्यपद्धती अधिक सक्षम होण्यासाठी कार्य केले जाणार आहे. संमेलनात राज्य व संघराज्यांच्या अंदाज समितीमधील १०९ आणि संसदेतील समितीच्या २२ प्रतीनिधींनी सहभाग घेतला. समित्यांच्या माध्यमातून राज्यांमध्ये करण्यात आलेली चांगली कामे, नवीन उपक्रम आदींचे चर्चेतून आदान – प्रदान संमेलनात करण्यात आले.
भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईत आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन यशस्वीरित्या पार पडले. या संमेलनात अर्थसंकल्पीय तरतूद, निधीचा विनीयोग, संसदीय कामकाजात तंत्रज्ञानाचा उपयोग, आर्थिक स्तरावर राज्य व केंद्र शासनात प्रभावी समन्वय, अंदाज समितीकडून करण्यात येत असलेल्या शिफारशी आदींवर सकारात्मक चर्चा झाली.
समितीच्या कार्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग
संमेलनात समितीच्या कार्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविणे, प्रभावी डाटा विश्लेषण, समितीमधील सदस्यांनी कमीत कमी संख्या निश्चित करणे यावर निर्णय झाले. संमेलनात ६ प्रस्ताव संमत पारीत करण्यात आले. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अंदाजांवर प्रभावी नियंत्रण व पारदर्शकतेला प्राधान्य देणारी कार्यप्रणाली करणे, समितीमध्ये अनुभव व ज्ञानाचे आदान – प्रदान करण्यासाठी संस्थात्मक प्रणाली विकसित करणे, समितीने केलेल्या शिफारशी, सादर केलेले अहवाल, केलेली कार्यवाही यांचा जनसामान्यांवर पडलेल्या परिणामांचा प्रभावी प्रचार करणे, समितीच्या अर्थसंकल्पीय अंदाज व प्रशासकीय खर्चाच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ट कालावधी, समिती सदस्यांच्या कार्यकुशलतेसाठी प्रभावी कार्यप्रणाली तयार करणे, राज्य व केंद्राच्या समन्वयातून वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करणे आदींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. बिर्ला म्हणाले, ब्राझील येथे ११ वे ब्रिक्स संमेलन पार पडले. या संमेलनात १० देश सहभागी झाले, या संमेलनात पहलगाम आतंकवादी हल्याचा निषेध करण्यात आला. यामध्ये सहभागी देशांनी आतंकवादाविरूद्ध एकत्रित लढण्याचा मानसही व्यक्त केला. १८ व्या लोकसभेचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून या वर्षात ४ सत्र झाले असून या सत्रांमध्ये १०४ टक्के कामकाज झाले. लोकसभेच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करीत २२ भाषांमध्ये संसदीय कामकाजाचे भाषांतर करण्यात आले आहे. सर्व सदस्यांना कामकाज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेलाही संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. संसदेचे कामकाज पेपरलेस करण्यात आले आहे.
संसदेच्या कामकाजाची ‘डिजिटल लायब्ररी’ करण्यात आली आहे. तसेच संसदेतील ग्रंथालयही डजिटल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. यावेळी राज्यसभा उपसभापती हरीवंश, अंदाज समिती अध्यक्ष डॉ. संजय जैस्वाल यांनीही संमेलनातील विविध सत्रांबाबत माहिती दिली.
०००००
नीलेश तायडे/विसंअ/