विविध महामंडळामार्फत सुरू असलेल्या योजनांमध्ये काळानुरूप बदल करावेत – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई दि २६: विविध महामंडळामार्फत संबंधित प्रवर्गाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यात येतात. काळानुरूप या योजनांमध्ये सुधारणा करण्यात यावी व कर्जाची रक्कम वाढविण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळ तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळाच्या कामाचा आढावा मंत्रालयात राज्यमंत्री मिसाळ यांनी घेतला.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, काळानुरूप योजनांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, कर्जाची रक्कम आणि वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी. तसेच विविध योजनांमार्फत लाभार्थ्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो, यामध्ये शासन अनुदान देते. हे कर्ज बँकमार्फत देण्यात येत असल्याने कर्ज वसुलीची सर्वस्वी जबाबदारी बँकेला देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.

चर्मोद्योग संदर्भातले प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधून नव तरूणांना त्याचे प्रशिक्षण द्यावे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. चर्मोद्योगातील तंत्रज्ञान विकसीत करून, चर्मवस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करण्यात यावी.

बैठकीत महात्मा फुले मागासवर्ग महामंडळातील सुविधा कर्ज, उत्कर्ष कर्ज, सूक्ष्म पतपुरवठा योजना, महिला समृद्धी, उच्च शैक्षणिक कर्ज योजना, सॅनेटरी मार्ट, स्कीम फॉर रिहॅबलिटेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स योजना, स्वच्छता उद्यमी योजनेसदंर्भात आढावा घेण्यात आला.

ऊसतोड कामगारांची नोंदणी घेण्यासंदर्भात संबंधित साखर कारखान्याशी समन्वय साधून कार्यवाही करता येईल का, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी काही उपाययोजना आखण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करा, आरोग्यासंदर्भातील प्रबोधनाबाबत विशेष योजना राबवाव्यात. सुरू असलेल्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांची संख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा व अनुदानाबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

सर्व महामंडळांच्या योजनांची एकाच व्यासपीठावर माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी पोर्टलची निर्मिती करावी. जास्तीत जास्त नागरिकांपर्यत कार्यान्वित योजनांची माहिती पोहोचावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोशल मीडियाचा वापर करावा. सुरू असलेल्या योजनांमध्ये सुधारणा करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

यावेळी महात्मा फुले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, उपसचिव वर्षा देशमुख, महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम, उपमहाव्यवस्थापक दत्तराज शिंदे उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/वि.सं.अ