खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते  उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.26 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित  विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगुरूळे, तहसीलदार आबा महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलिप देवरे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटविकास अधिकारी संदीप वायाळ,  तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, नगरपालिकाचे मुख्याधिकारी तुषार आहेर, उप अभियंता पी आर घोडे, उप अभियंता आर. यू. पुरी पोलीस उप अधीक्षक बाजीराव महाजन, शाखा अभियंता गणेश चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खरिप हंगामात विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना बियाणे रास्त दराने विक्री होईल तसेच खताचा बफर स्टॉक करून ठेवावा आणि खताची लिंकिंग होणार नाही याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी. तालुक्यात पाऊस सुरू झाला असून पाणी टंचाईच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू ठेवावेत. येवला तालुक्यात 50 कोटी उद्दिष्टापैकी 39 कोटी पीक कर्ज वाटप झाले आहे ही बाब समाधानकारक असून मागणीनुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे, अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या.
जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतांना मंत्री श्री भुजबळ म्हणाले की,  राजापूर व ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेतील पंपिंग जॅकवेल व पाईप जोडणी संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावी. धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाण्यांच्या टाक्यांचे बांधकाम संबंधित कामांना गती द्यावी. येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील रिट्रोफिटिंगकरिता आवश्यक असलेल्या मोटर्स साठी निविदा प्रक्रिया सुरू करावी. विंचूर लासलगावसह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रिट्रोफिटिंग ची कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री भुजबळ यांनी दिले.
येवला शहरातील झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी झोपडपट्टी वासियांना घरकुल/आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत.  पंचायत समितीकडील घरकुल/आवास योजनेतील घरकुलांसाठी आवश्यक जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला-लासलगाव येथील शेतकरी व नागरिकांच्या वीज संदर्भातील सर्व तक्रारींचे निवारण करून विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या.
पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकरण टप्पा 1 मधील कालवा दुरूस्ती व लाइनिंगची कामांना गती द्यावी. येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील  दुरुस्ती व आनुषंगिक कामांसाठी निधीचे प्रस्ताव सादर करावेत. स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे स्मारकाचे कामासाठी निधी उपलब्ध झाला असून काम पूर्ण करण्यात यावे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील भुयारी गटार योजनेची कामे करतांना आवश्यकतेनुसार खोदकाम करून ते काम पूर्ण झाल्यानंतरच पुढील खोदकाम करण्यात यावे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. शहरातील शॉपिंग कॉम्लेक्स वाटपासाठी आरक्षण नियमाप्रमाणे कार्यवाही करून लिलाव प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी. शिवसृष्टीची उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया तातडीने करून प्राप्त निधीतून प्रस्तावित कामे सुरू करावीत.लासलगाव बाह्य वळण योजनेची कामे पूर्ण करावी. उपजिल्हा रुग्णालय लासलगाव इमारतीचे काम, पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रोड इत्यादी कामे सुरू करण्यात यावे. लासलगाव विंचूर चौपदरी सह खेडलेझुंगे कॉंक्रीट रोडची कामे गुणवत्तापूर्ण होतील यासाठी दक्ष राहावे. मनरेगा अंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड जुलैअखेर करावयाची आहे. त्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे. राज्य नदी संवर्धन योजने अंतर्गत लासलगाव शिव नदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी या कामांची निविदा प्रक्रिया प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचनाही मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या.