‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्ग घेतल्यास शाळांवर कारवाई होणार
मुंबई, दि. 9 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले तर प्रवेश रद्द करण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य संजय गायकवाड, नमिता मुंदडा यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद RTE कायद्यानुसार आहे. या योजनेंतर्गत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील शाळांमध्ये पहिलीपासून प्रवेश दिला जातो. यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. एकदा प्रवेश मिळाल्यानंतर शाळा बदलण्याची कोणतीही तरतूद नाही. काही शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत याबाबत चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/
मुंबईत भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ठिकाणांचा पुन्हा सर्व्हे करणार – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. ९:- मुंबईत भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ठिकाणांचा यापूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India) संस्थेमार्फत सर्व्हे करण्यात आला असून पुन्हा एकदा अशा धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे केला जाईल, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
सदस्य सुनील राऊत यांनी मुंबई शहरात डोंगराळ भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेतेबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री राम कदम, हारून खान, अजय चौधरी, अशोक पाटील यांनीही सहभाग घेतला.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले, सन २०१७ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने मुंबईतील २४९ ठिकाणांचा सर्व्हे केला होता. यातील ७४ ठिकाणे धोकादायक तर ४६ ठिकाणे ही अतीधोकादायक असल्याचे नमूद केले होते. या ४६ ठिकाणांपैकी ४० ठिकाणे मुंबई उपनगरात आहेत. भूस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणी आयआयटी, पवई यांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक कामे हाती घेण्यात आल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
मंत्री श्री.महाजन यांनी सांगितले, सूर्यानगर, विक्रोळी येथील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणी जिओ नेटिंग, संरक्षक भिंतीची कामे करण्यात आली आहेत. या ठिकाणी ११ कोटी ६३ लाखाची ४७ कामे घेण्यात आली असून यातील ४५ कामे पूर्ण आहेत तर दोन कामे प्रगतीपथावर आहेत. जिओ नेटिंगचे काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास बृहन्मुंबई महापालिकेमार्फत कळविण्यात आले असून हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
घाटकोपर, भांडूप या भागात सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षात धोकादायक असलेल्या ठिकाणी १७७ कामांना मान्यता देण्यात आली असून यातील ११३ कामे पूर्ण, ३८ कामे प्रगतीपथावर आणि २६ कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धोकादायक असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत, जिओ नेटिंग यासारख्या कामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री महाजन यांनी सांगितले.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ/