धुळे, दिनांक 22 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्रात औद्योगिक, कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि डिजिटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या क्षेत्रात भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याने तरुणांनी या नव्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व मॉडेल करिअर सेंटर आणि शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, दोंडाईचा येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे ,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहेत. यात मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग व सप्लाय चेन व्यवस्थापन यामध्ये हजारो रोजगार निर्माण होत आहेत. कृषी आधारित उद्योगात फार्मगेट प्रोसेसिंग, शीतगृह, फळ-भाजीपाला प्रक्रिया, कृषी ड्रोन, सेंद्रिय शेती, स्मार्ट सिंचन तसेच राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, मेट्रो प्रकल्प, स्मार्ट सिटी मिशन यामुळे कुशल-अकुशल कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तर माहिती तंत्रज्ञान व डिजिटल क्षेत्रात ए.आय, डेटा सायन्स, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, गेम डेव्हलपमेंट, डिझाईन अशा क्षेत्रात उच्च शिक्षित युवकांसाठी करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. तसेच वर्क फ्रॉम होम आणि फ्री लाईन मुळे ग्रामीण भागातही रोजगाराचा विस्तार होत आहे.
सौर व पवन उर्जेवर आधारित प्रकल्प, ईव्ही चार्जिंग स्टेशन्स आणि ग्रीन बिल्डिंग्स यामध्ये 2029 पर्यंत 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. हेल्थटेक, टेलिमेडिसिन, आयुष सेवा, ग्रामीण आरोग्य केंद्रे, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज आहे. इको-टुरिझम, गड-किल्ले पर्यटन, आदिवासी भागातील पर्यटनामुळे स्थानिकांना गाईड, होम स्टे व्यवस्थापक, खाद्य सेवा यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असून तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. याशिवाय डिजिटल मार्केटिंग, युट्यूब, ब्लॉग सारख्या माध्यमातून डिजिटल स्वंयरोजगाराचे नवीन पर्याय तयार होत आहे.
यात योग्य तयारी केल्यास ग्रामीण भागातील युवकही यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळेल त्या संधीचा फायदा घ्यावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, आपल्याला जी योग्य संधी मिळेल, ती संधी घेऊन, कष्ट करत, सातत्याने प्रयत्न केले, तर कुठलेही यश आपल्यापासून दूर राहू शकणार नाही. आपण आपले जे ध्येय आहे, आपला जो संकल्प आहे, त्या संकल्पापूर्तीसाठी आपण पुढे गेले पाहिजे त्यातून विद्यार्थ्यांना यश निश्चितच मिळेल. या रोजगाराच्या विविध संधीचा विद्यार्थ्यांनी आणि बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात.
प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात 100 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. धुळे शहरांमध्ये दोन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केलेले आहे. तर दोंडाईचा येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ 25 विविध क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला असून, या कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 1 हजार पेक्षा जास्त रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आजच्या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे, आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये आपण कुठलीही शैक्षणिक पात्रता धारण करत असलात – दहावी पास, बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बीएससी ॲग्री या सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आज इथे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचाही लाभ आपण या रोजगार मेळाव्यामध्ये देणार आहोत. आता या योजनेची मुदत 11 महिन्यापर्यंत वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 3200 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्राचार्य के.डी गिरासे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. मेळाव्याचे सूत्रसंचालन डी.एम. गिरासे यांनी तर व्ही.एम.गिरासे यांनी आभार मानले. या मेळाव्यास संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थींनी तसेच विविध कंपन्याचे प्रमुख व प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000000