मुंबई, दि. २४ : इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक,पत्नी यांच्या पाल्यांना रुपये १० हजाराचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटूंबियांनी ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यंत याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी.
आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळ, साहित्य, संगित, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे, तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य, यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तरी पात्रता धारक लाभार्थीनी दूरध्वनी क्र ०२२- ३५१८३८६१ / ८५९१९८३८६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ/