कर नियमनाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे विकासाला चालना – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

आयकर विभागाचा १६६ वा स्थापना दिन

मुंबई, दि. २४ :- देशाच्या प्रगतीसाठी आयकर विभाग देत असलेले योगदान मोठे आहे. कर नियमनाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देशाच्या विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

आयकर विभागाच्या १६६ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील कौटिल्य भवन येथे आयोजित समारंभात राज्यपाल श्री.राधाकृष्णन बोलत होते. या कार्यक्रमास आयकर अपीलेट ट्रिब्युनलचे उपाध्यक्ष शक्तिजित डे, प्रधान मुख्य आयकर आयुक्त श्रीमती मालती श्रीधरन, विविध कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त क्रीडापटू उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले की, २०२५ मध्ये आपण ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत आहोत. यापार्श्वभूमीवर कर प्रशासनाने बदलांना सामोरे गेले पाहिजे. आपण नेहमी करदात्यांच्या चुका शोधतो. दंड आकारतो. परिणामी, जास्तीत जास्त लोक करचक्राबाहेर राहण्याचा प्रयत्न करतात. उलटपक्षी करदात्यांशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवणे, अधिकाधिक लोकांना कर प्रणालीच्या कक्षेत आणण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स च्या संमेलनांचे आयोजन करणे तसेच कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर आयकर विभागाने अधिक भर दिला पाहिजे. कर रचनेत कालसुसंगत सुधारणा करणेही आवश्यक असते. याबरोबरच करचुकवेगिरीला आळा घातला पाहिजे.

जर्मनीचा दाखला देत ते म्हणाले की, तेथे नियमित आयकर भरणाऱ्यांना सन्मान मिळतो, ओळखपत्र मिळते. अशा प्रोत्साहनात्मक उपक्रमांचा अंगिकार करावा. ज्यांचे मुख्य उत्पन्न शेती नसून इतर व्यवसाय आहे, त्यांनी केवळ नावापुरती शेती दाखवून कर टाळू नये. यासाठी पारदर्शक आणि तर्कशुद्ध निकषांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असेही राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी कौटिल्य (चाणक्य) यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच, सर्वाधिक कर भरलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा सन्स प्रा. लि., एचडीएफसी बँक लि. आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तसेच सेवनिवृत्त अधिकारी आणि आयकर विभागाचे उत्कृष्ट खेळाडूंना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

000000

संजय ओरके/विसंअ/