सोलापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने राबविण्यात आलेले ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ हे केवळ एक वैद्यकीय प्रमाणपत्र मोहिम नव्हे, तर दिव्यांग व्यक्तींच्या आत्मसन्मानाचा, सक्षमीकरणाचा आणि त्यांच्या सामाजिक समावेशाचा क्रांतिकारी प्रयत्न आहे. या मोहिमेने सोलापूर जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना २१ प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे दिव्यांगत्व हे अपंगत्व नव्हे तर समाजाचा आधारस्तंभ ठरेल याची खात्री आहे.
मोहिमेचे उद्दिष्ट व पार्श्वभूमी
दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची अडचण लक्षात घेऊन ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ची रूपरेषा तयार करण्यात आली.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांगासाठी प्रमाणपत्र अनिवार्य असून केंद्र सरकारची स्वावलंबन प्रणाली (UDID कार्ड) यासाठी वापरण्यात येते. सोलापूर जिल्ह्यातील हजारो दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात आली.
प्राथमिक तपासणी व शिबिरांची रचना
तपासणी कालावधी: १९ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२४
एकूण शिबिरे: २५
प्राथमिक तपासणी लाभार्थी: १८,४२१ दिव्यांग व्यक्ती
प्रमाणपत्र वितरण: पात्र १३,५२१ लाभार्थ्यांना ९० दिवसांत घरपोच प्रमाणपत्र
मानसिक तपासणी व बौधिक अक्षम बालकांचे निरीक्षण
दुसरा टप्पा: समग्र शिक्षेच्या अंतर्गत ११ तालुक्यातील १,०१० बौद्धिक अक्षम बालकांसाठी IQ टेस्ट.
तपासणी ठिकाणे: ब्लॉक व क्लस्टर स्तरावर ४३ ठिकाणी मानसशास्त्रज्ञांमार्फत तपासणी.
प्रशिक्षण व समन्वय कार्यशाळा
जिल्ह्यात हे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. अभियानाच्या प्रारंभी १६ कार्यशाळांमधून ३,७४२ व्यक्तींना प्रशिक्षण दिले गेले.
सहभागी घटक: आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, पालक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सामाजिक संस्था इत्यादी
घरपोच लाभ आणि माहितीपत्रके
प्रमाणपत्रासोबत दिलेले साहित्य:
UDID कार्ड
रेल्वे सवलत प्रमाणपत्र
विविध शासकीय योजनांची माहिती
दिव्यांग हक्क अधिनियमाची माहिती
शुभेच्छा पत्र
अभिप्रायासाठी पोस्टकार्ड (स्पीड पोस्टद्वारे)
प्रशासनाचा सक्रिय सहभाग
जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या संकल्पनेतून अभियानाची सुरुवात करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या देखरेखीखाली मोहिमेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे झाली. तर तज्ज्ञ मंडळ: डॉ. रुत्विक जयकर, डॉ. सुहास माने, सुलोचना सोनवणे, मीनाक्षी वाकडे, डॉ. संपत्ती तोड़कर, डॉ. रोहन वायचाळ, कादर शेख
– मित्र संस्था, मिशन इन्स्टिट्यूट यांचे योगदान बहुमूल्य ठरले. या प्रकारे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाने तसेच मैत्र संस्थेने परस्परात योग्य समन्वय ठेवून दिव्यांग अस्मिता अभियान जिल्ह्यात यशस्वी केलेले आहे.
‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ने सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांसाठी आदर्श वर ठरले आहे. वैद्यकीय तपासणी, माहिती संकलन, तांत्रिक समन्वय, घरपोच सेवा आणि सर्वसमावेशक प्रशिक्षण या सर्व घटकांनी दिव्यांग व्यक्तींना केवळ सेवा नव्हे तर सन्मान मिळवून दिला. याद्यानाच्या माध्यमातून १३५२१ दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगात्वाचे प्रमाणपत्र घरपोच मिळालेले आहे. त्यामुळे ह्या दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सन्मानपूर्वक जीवन जगता येणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमवलेले दिसून येत आहेत.
- सुनील सोनटक्के, जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर
०००