मुंबई, दि. 27 : मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठी भाषा ही समृद्ध भाषा असून तिचे जतन आणि संवर्धन करून मराठी भाषेचा वारसा जपूया असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिन विद्यापीठ आणि महाविद्यालयात अनिवार्य करण्यात आला असल्याने मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. सामंत बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुसुमाग्रज यांचे मोलाचे योगदान आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या समृद्ध साहित्याचे वाचन केले पाहिजे.
श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व लोककला जपल्या पाहिजेत आणि लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे. आपल्या मातृभाषेचा आदर राखत सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये तिचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व अभिमत विद्यापीठे, सर्व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे आणि सर्व शासकीय/अशासकीय, अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये यामध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या निवासस्थानांना ऐतिहासिक गड किल्ल्यांची नावे द्यावीत– उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
मंत्री, राज्यमंत्री यांना वाटप करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना राज्यातील विविध गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यांची नावे मंत्रालयासमोरील मंत्री आणि राज्यमंत्री यांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना देण्यात यावीत. असे विनंतीपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
मंत्री आणि राज्यमंत्री यांना वाटप केलेले शासकीय निवासस्थान क्रमांक आणि विनंती केलेल्या निवासस्थानांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
अ–३ सिंधुदुर्ग,अ–४ राजगड,अ–५ प्रतापगड ,अ–६ रायगड, अ –९ तोरणा, ब –१ सिंहगड, ब –२ रत्नदुर्ग,ब –३ जंजिरा, ब – ४ पावनगड, ब –५ विजयदुर्ग, ब – ६ सिद्धगड, ब – ७ पन्हाळगड,क –१ आचलगड, क– २ ब्रम्हगिरी, क –३ पुरंदर, क – ४ शिवालय, क –५अजिंक्यतारा, क–६ प्रचितगड , क – ७ जयगड, क –८ विशालगड अशी नावे देण्यात यावीत अशी विनंती करण्यात आली असल्याचेही श्री.सामंत यांनी सागितले.
कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारुड, पोवाडा, नमन आदी लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/27.2.2020