‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखवून प्रतिभाताईंनी देशापुढे आदर्श निर्माण केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
11

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार 

नागपूर,दि.18:राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या’सुखोईतून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर देशापुढे आदर्श निर्माण केला, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय नागपूर केंद्राच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत, खासदार प्रफुल्ल पटेल, खा. कृपाल तुमाने, माजी मुख्यमंत्री सर्वश्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार सर्वश्री अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, दीपक केसरकर व संयोजक गिरीश गांधी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कन्या राष्ट्रपती होणार असतील तर त्यांच्या आड शिवसेना येणार नाही आणि कुणालाही येऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. अशी भूमिका जाहीर केल्यावर तेव्हाही शिवसेनेवर दबाव होता. मात्र कितीही मतभिन्नता असली तरी राज्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. या भावनेतून प्रतिभाताईंचे समर्थन केल्याचे त्यांनी सांगितले. 1962 मध्ये प्रतिभाताई पहिल्यांदा विधानसभा सदस्य झाल्या, तेव्हा शरद पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी मी केवळ दोन वर्षांचा होतो. मला अनुभवसंपन्न व्यक्तींचा सहवास आणि आशीर्वाद लाभला. प्रतिभाताईंचा सत्कार करण्याची मुख्यमंत्री म्हणून आपणास संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्यमंत्री नसतो तरीही या कार्यक्रमाला आलो असतो, कारण प्रतिभाताईंशी माझ्या आजोबांपासूनचे ऋणानुबंध आहेत. मध्यंतरी भेटी झाल्या नाहीत तरी ते नाते घट्टपणे जपले गेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिभाताई राष्ट्रपती असताना त्यांनी स्वतः उपवासाच्या महाराष्ट्रीयन पदार्थांची रेसिपी सांगून उपवासाचे पदार्थ बनवून घेतले होते आणि राष्ट्रपती भवनात ते आग्रहाने खाऊ घातलेत, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

भैरोसिंह शेखावत यांच्या जनसंपर्कासमोर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदासाठी लढा देऊ शकतील असे सोनिया गांधींना सांगितलं आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताईंना मिळाला अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. प्रतिभाताईंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या भेटीला गेल्यावर त्यांनी कोणतीही चर्चा करण्याचे कारण नाही, असे सांगून महाराष्ट्राच्या कन्या असलेल्या प्रतिभाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला. बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेल्या दोन व्यक्ती प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशस्वी झाल्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी मुख्यमंत्री असताना प्रतिभाताईंचा मृदू स्वभाव मला कधीच जाणवला नाही त्यांनी अतिशय आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्यांची भूमिका पार पाडली अशी आठवण श्री. पवार यांनी सांगितली. देशातील सर्व राज्याच्या कृषिमंत्र्यांची बैठक घेऊन शेतीसमोरील अडचणी आणि उपायांची टिपणे तयार करून प्रधानमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पाठवणाऱ्या त्या देशातील पहिल्याच राष्ट्रपती होत्या. रशियाच्या अतिशय वेगवान अशा सुखोई विमानात सैन्याचा पोशाख घालून प्रवास करणाऱ्याही प्रतिभाताई पहिल्याच महिला राष्ट्रपती ठरल्या असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना प्रतिभाताई म्हणाल्या, लेकीबाळीचे कौतुक आणि सत्कार करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, आणि ही संस्कृती बाळासाहेबांनी दाखविली. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून व्यस्त असतानाही या कार्यक्रमाला वेळ काढून आलेत, हे बाळासाहेबांचे संस्कार असल्याचे त्या म्हणाल्या. भारताचा व्यापार आणि उद्योग वाढविण्यासाठी राष्ट्रपती असताना परदेश दौऱ्यावर पहिल्यांदा व्यापारविषयक शिष्टमंडळ नेण्याचे काम केले. तेव्हा टीका झाली पण देशातील एसआयए., असोचेम, आणि फिक्की सारख्या संस्थांनी हे योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताचा व्यापार आणि उद्योगवृद्धी  झाल्याचेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

भारताची आंतरिक ताकद मोठी असून महात्मा गांधींच्या नैतिक तत्वावर आणि मानवी मूल्यांवर आधारित आहे. तसेच संविधान ही देशाची गीता असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक लढा, पंडीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद  यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान व त्याग केला. या देशाच्या पायाचे हे आधारस्तंभ आहेत. या ना आधारस्तंभांना विसरून कसे चालेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवाद, सार्वभौमत्व आणि संविधान दिलेल्यांना विसरून चालणार नाही. राष्ट्रभक्ती आणि विद्वत्ता असणाऱ्या आंबेडकरांशिवाय संविधान लिहिण्याचे काम कोणी करू शकणार नाही, असा विश्वास महात्मा गांधींना होता. त्यांचे मतभेद असले तरी मनभेद नव्हते.

संविधानाची शपथ घेताना संविधानाप्रति खरी श्रद्धा राखील व त्याप्रति प्रामाणिक राहील, असे म्हणत असताना आपण निधर्मी राज्य नाकारतो. संविधानातच स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे.

राष्ट्रपती असताना त्या पदाचा मान आणि गौरव वाढविण्याचे काम करता आले, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती तिन्ही सैन्याचा प्रमुख असतो. म्हणून जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी वयाच्या 74 व्या वर्षी सैन्याचा पोशाख चढवून सुखोइत प्रवास करण्याचे धाडस करता आले, याचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिल देशमुख यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार कृपाल तुमाने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी तर आभार गिरीश गांधी यांनी मानले . कार्यक्रमाला मोठ्या संख्येने खासदार, आमदार व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here