भारत रंग महोत्सवास नवी दिल्ली येथे प्रारंभ

0
9

नवी दिल्ली, १४ : प्रतिष्ठ‍ित राष्ट्रीय नाटक विद्यालयातंर्गत होणाऱ्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सवा’त दिल्लीसह अन्य शहरांत ६ मराठी नाटके सादर केली जाणार आहेत. दिल्लीत २, नाशिकमध्ये ३ आणि केवडिया येथे १ अशी एकूण सहा शहरांमध्ये नाटके दाखविली जाणार आहेत. महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल, नाटक दिग्दर्शक तथा अभिनेते  राम गोपाल बजाज, अभिनेत्री आणि निर्माता वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाटक विद्यालयाचे संचालक रमेश चंद्र गौर यांच्या उपस्थितीत सायं. ६ वा. कोपर्निकस मार्ग येथील कमानी सभागृहात मुख्य कार्यक्रम सोहळयाचे उद्घाटन झाले. यावर्षी दिल्लीसह अन्य दहा शहरांत ‘भारत रंग महोत्सव’ साजरा होत आहे.

दिल्ली येथे रविवार १९ फेब्रुवारीला सांयकाळी ६ वा. ‘शब्दांची रोजनिशी’  हे नाटक सादर केले जाईल. गुरूवारी  २३ फेब्रुवारीला सांयकाळी ६.३० वाजता ‘मराठी कर्ण’ (दशावतार) हे नाटक सादर केले जाईल. ही दोन्ही नाटके कमानी सभागृहात सादर होतील.

नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने महाकवी कालीदास कलामंदीर सभागृह येथे  १८, २० तसेच २३ फेब्रुवारीला ‘संगीत मत्स्यगंध’, ‘विश्वामित्र’, ‘संगीत सुवर्णतुला’ ही नाटके सादर केली जाणार आहेत. केवडिया येथे गुजरात स्टेट संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने एकता सभागृहात २३ फेब्रुवारीला ‘तेरव’ हे नाटक सादर होणार आहे. महाराष्ट्रातील हिंदी नाट्य संस्थांची नाटकेही दिल्लीसह अन्य शहरांत सादर केली जाणार आहेत.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here