कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा; राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
7

ठाणे, दि. 16 (जिमाका) – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो लागणारा निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगासाठी संगणक प्रणाली, प्लॅस्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. उल्हासनगरमधील सेंच्युरी मैदानात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले की, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सामान्य जनतेच्या सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत केली जाईल. रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि शहराची स्वच्छता यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आज उल्हासनगर वासियांचे प्रेम मला पाहायला मिळाले. या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे ते लक्षात घेऊन आपले सरकार काम करत आहे. केंद्र सरकारचा देखील आपल्याला पाठिंबा आहे. देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा आपल्या राज्याच्या विकासासाठी आहे, म्हणून हे सरकार या राज्याचा सर्वांगीण विकास अतिशय वेगाने करत आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी रात्रंदिवस आम्ही काम करतोय. या राज्याच्या हिताचे निर्णय घेतोय. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्व शहर यासाठी जे जे काय आवश्यक आहे ते देण्याचं काम आम्ही करतोय.

उल्हासनगरमधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी सगळे अडथळे दूर करण्यासाठी नियमांमध्ये देखील बदल केला आहे. त्याचा शासन निर्णय लवकरच प्राप्त होईल. उल्हासनगर शहराला 50 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे, ही पाण्याची कमतरता देखील राज्य शासन पूर्ण करेल. मोठे रस्ते, पिण्यासाठी पाणी, दिवाबत्ती, गार्डन या मूलभूत सोयी सुविधा देण्याचे काम महापालिका आणि राज्य सरकार दोन्हीच्या माध्यमातून करत आहे. या शहराचा सुनियोजित विकास होईल. मोठे रुंद रस्ते, गार्डन, खेळाचे मैदान, आरोग्य सुविधा निर्माण होतील. चांगल्या शाळा होतील, दवाखाने होतील हे सगळं होईल आणि उल्हासनगरातील रहिवाशांचे जीवनमान उंचावेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, उल्हास नगरच्या विविध उपक्रमांमुळे विकास होईल. येथील रस्ते, घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. यावेळी आयुक्त श्री शेख यांनी प्रास्ताविकात विविध उपक्रमांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here