बोगस बियाणे विक्रीला पायबंद घालावा – पालकमंत्री गिरीष महाजन

0
8

धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता कृषि विभागाने घ्यावी. असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात खरीप पूर्व हंगाम आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, आमदार जयकुमार रावल (ऑनलाईन) आमदार मंजुळाताई गावीत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती संजीवनी सिसोदे (ऑनलाईन) अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी, उपनिबंधक सहकार मनोज चौधरी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम सुकर होण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीं मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. याकरिता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे. शेतकरी बांधवांना आवश्यक असणारे खरीप पीककर्ज वेळेत वितरीत करण्यात यावे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता बॅकांनी घ्यावी. ज्या बँका पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करतील त्यांचेवर गुन्हे दाखल करावे. जिल्ह्यातील पीक लागवड लक्षात घेऊन आवश्यक ते बी-बियाणे, खते व कृषि निविष्ठा मुबलक उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. बी-बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तसेच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे व खते विक्री होणार नाही. यासाठी कृषि विभागाने खते व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण म्हणून शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत मार्गदर्शन करावे. शिवाय शेतकऱ्यांच्या लाभाच्या विविध योजना शासन राबवित आहेत. या योजनांची माहिती शेतकऱ्यांना द्यावा. जिल्ह्यात फळबाग लागवड वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यास अनुसरुन जिल्ह्यात तृणधान्याचे लागवड क्षेत्र वाढण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचीही सूचना केली.

जिल्ह्यात खरीप हंगाम लागवडीचे क्षेत्र 3 लाख 84 हजार 159 हेक्टर इतके आहेत. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे असून त्यानंतर मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारीचे क्षेत्र आहे.कापूस लागवडीसाठी 10 लाख 30 हजार 640 बीटी कापूस बियाणे पाकीटांची आवश्यकता आहे.  तर यावर्षीसाठी 94 हजार 380 मे. टन खतांचे आवंटन मंजूर असून 47 हजार 472 मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. जिल्हास्तरावर एक तर तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच गुणनियंत्रण भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बी-बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तडवी यांनी बैठकीत दिली. या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध मौलिक सूचना केल्या. त्यावर आवश्यक कार्यवाहीच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबधित यंत्रणेला दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here