पूरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे राशन देण्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचे निर्देश

0
12

बुलडाणा, दि २३ : संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात गेल्या दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबाचे प्राधान्याने पुनर्वसन करीत या कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे राशन तातडीने पुरविण्यात यावे, असे निर्देश मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.
शेगाव येथील विश्रामगृहात आज श्री. पाटील यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पुराचे पाणी घरात शिरले आहे, अशा कुटुंबांना मदतीसोबत एक महिना पुरेल एवढे राशन देण्यात यावे. तसेच पुरामुळे मृत्यू झाला असल्यास तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे. पुरामुळे गावातील विहिरीत गाळपाणी गेले आहे आणि त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांनी चांगले पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी तात्काळ अधिग्रहित करून पाणीपुरवठा करावा. दूषित पाणीपुरवठा झाल्यास आरोग्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.
पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावातील कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे धान्य आणि सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच पुरामुळे बाधित आणि बिघर झालेल्या कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे. अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेल्यामुळे पिक, फळबागा आणि बुजलेल्या विहिरींचे तातडीने पंचनामे करावेत.

पुरामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणाची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. तसेच महसूल मंडळामध्ये 65 मिलिमीटरहून अधिक पाऊस झालेला असल्यास तेथील सरसकट पंचनामे करण्यात यावे. जिगाव प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुकसानीची माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here