निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

0
10

अमरावती, दि. 5 : अधिकारी-कर्मचारी शासकीय नोकरीत असताना आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा कार्यालयासाठी तसेच जनसेवेसाठी देतो. सेवानिवृत्तीनंतर त्याचे उर्वरित आयुष्य निरामय तसेच त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व मोबदला म्हणून त्याला निवृत्तीवेतन दिल्या जाते. त्यांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन पडताळणी व निवृत्तीवेतन विषयक उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी ह्या संबंधित शासकीय विभागाने संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी सर्व शासकीय यंत्रणांना आज दिले.

महसूल सप्ताह निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, माजी सैनिकांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त संजय सुरंजे, श्यामकांत मस्के, तहसीलदार वैशाली पाथरे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, मधुकर धुळे यांच्यास‍ह सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, महसूल विभाग हा 24 तास जनसेवेसाठी कार्यरत असतो. कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विभागाला तत्परतेने नागरिकांना सेवा द्यावी लागते. ‘सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत संवाद’ यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय नोकरी करीत असताना त्यांना आलेले चांगले अनुभव नवीन पिढीला त्यांचे भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरु शकतात. सेवानिवृत्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे ही प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी असून तो कर्तव्याचा भाग आहे. सेवानिवृत्तांचे प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी कार्यालयात एक मदत कक्ष उभारला जाईल. या कक्षाच्या माध्यमातून सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविल्या जाईल. निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आनंददायी वातावरणाची अनुभूती होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक द्यावी, असे भावनात्मक आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित 45 सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी, माजी सैनिकांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते पुस्तक व गुलाबपुष्प देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. विभागीय आयुक्तांनी त्यांची आस्थेने विचारपूस करुन त्यांच्या आयुष्यातील सुखद प्रसंगाबाबत हितगूज केले. त्यांच्या वेतनपडताळणी, निवृत्तीवेतन, आरोग्य सुविधा आदी संदर्भात त्यांनी संबधितांकडून माहिती जाणून घेतली. त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. कार्यरत अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींची पडताळणीसाठी लेखा पडताळणी विभागाच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावे. कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यासाठी नियोजन करावे. तसेच दिव्यांग व्यक्तींनाही कार्यालयात येण्या-जाण्यासाठी सुलभता होण्यासाठी लिफ्ट अथवा रॅम्पची सुविधा उभारण्याची कार्यवाही करावी, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, अव्वल कारकुन उध्दव काळे, सुजन सोलंकी आदींनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक विविध बाबींवर मार्गदर्शन केले. सेवा निवृत्त उपायुक्त श्री. देशमुख, स्वीय सहायक महेंद्र गायकवाड आदींनी कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व प्रश्नांबाबत विभागीय आयुक्तांसमोर मागण्या मांडल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसीलदार शामसुंदर देशमुख यांनी केले तर वैशाली पाथरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, स्वीय सहायक अतुल लवणकर, नायब तहसीलदार मधुकर धुळे, उध्दव काळे, सुजन सोलंकी, नाझर प्रशांत वैद्य व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here