सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
10

सातारा दि. १५ : सातारा शूरवीरांचा, क्रातिकारकांचा देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा जिल्हा आहे. निसर्ग संपन्नता आणि वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून विकास प्रक्रीया गतीमान करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यासह सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. देसाई बोलत होते.  ध्वजवंदनानंतर श्री. देसाई यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या  शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेखर, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळ, क्रांतिकारी लढे आणि स्वातंत्र्यानंतर विकासाभिमुख राजकरण या सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र असून  जिल्ह्याच्या विकासाकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देऊन श्री. देसाई म्हणाले की, आपल्या जिल्ह्याचे स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे  पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांना लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी मोलाची साथ दिली.  त्यांनी  व आतापर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांमुळे राज्यातच नव्हे तर देशात सातारा जिल्ह्याचा नावलौकीक आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर  जिल्ह्याचा विकास आराखडा सादर करण्यात आला. यामध्ये कृषि, पर्यटन इतर विकास कामांचा समावेश आहे. पर्यटन आराखड्या नुसार कोयनेचा भाग, कांदाटी खोऱ्यातील असे एकूण ८५ कि.मी. परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे आर्थिक उन्नती बरोबर दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहे. हा आराखडा तात्काळ पर्यटन व सांस्कृतीक विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४०० आदर्श शाळा करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेलाही चांगल्या आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रें निर्माण करण्यात येणार आहेत. शहरामधील  खासगी हॉस्पिटल असतात त्याच प्रकारे अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात येणार आहेत. डोंगर दऱ्यातील वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी डोंगरी विकास आराखडा सादर केला असून त्याध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात येईल.

सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारु लागू नये, सहज शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पाटण तालुक्यात  करण्यात आला. आतापर्यंत या योजनेंतर्गत साडेचार लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

एक रुपयांमध्ये पिका विमा हा एक ऐतिहासिक शासनाने निर्णय घेतला आहे. याचा जिलह्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रयत्न करीत असून याला केंद्र सरकारचेही सहकार्य मिळत. तसेच महाराष्ट्रातील जवळपास सर्व साखर कारखान्यांना मिळून १० हजार कोटींचा आयकर भरावा लागला असता तो केंद्र सरकारने माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे याबद्दल त्यांनी केंद्राचे विशेष आभार मानले

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार

आर्चरी या खेळात एकाच हंगामात दोन आंतरराष्ट्रीय विश्वजितेपद प्राप्त केलेल्या कुमारी अदिती स्वामी तसेच राज्यस्तरीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी घवघवीत यश संपादन केल्याद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. शहीद जवान सुरज शेळके यांची वीरमाता सुवर्णा व वीरपिता प्रताप, शहीद जवान सोमनाथ तांगडे यांच्या विरपत्नी रेश्मा यांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते तम्रपटांचे वितरण करण्यात आले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here