पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अमृत वाटिकेत वृक्षारोपण

0
10

चंद्रपूर, दि. २५ : जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायती, १७ नगरपरिषद/नगरपंचायत व १ महानगरपालिका अशा एकूण ८४३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वसुधा-वंदन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप म्हणून ‘मेरी माटी मेरा देश’ ‘मिट्टी को नमन…विरों का वंदन’ हा उपक्रम मोठ्या उत्साहाने जिल्हाभरात राबविण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व तालुक्यातून माती गोळा केली असून ही माती एकत्रित करून माती कलशामधून डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यान येथे आणली गेली. या उद्यानात आलेल्या मातीतून अमृतवाटिका बाग तयार केली जात आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपीन पालीवाल, ताडोबा क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर, प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आदींची उपस्थिती होती.

अमृत कलश बाईक रॅलीचा शुभारंभ 

‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने जिल्हा परिषद चंद्रपूर येथून बुधवारी (दि.२३) अमृत कलश घेऊन विशेष बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दुचाकी चालवित अमृत कलश रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, श्याम वाखर्डे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष संपकाळ, प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी  सहभागी झाले होते. ही रॅली जटपुरा गेट- बंगाली कॅम्प येथून डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम गार्डनच्या दिशेने मार्गस्थ झाली होती.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here