उत्तम आरोग्यासह विश्वशांतीसाठी योग आवश्यक -राज्यपाल रमेश बैस

0
9

मुंबई, दि. २१ : योग ही भारताची जगाला अनमोल देणगी आहे. योगाच्या अमूर्त ठेव्याचे रक्षण करणे व त्याचा प्रचार – प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.  शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य  उत्तम राखण्यासह योग विश्वशांती प्रस्थापित करण्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे ‘कैवल्यधाम’ व श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर योग या संस्थांतर्फे संयुक्तपणे आयोजित योगसत्रात राज्यपाल श्री. बैस बोलत होते. भारतीय तटरक्षक दल, सूचना प्रसारण कार्यालय व राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी राज्यपालांसह योगासने केली.

भारत जगातील सर्वाधिक युवा राष्ट्र आहे. योग देशातील युवाशक्तीच्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक सशक्तीकरणात मदत करून स्वस्थ भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहायक सिद्ध होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले. आपण स्वतः नियमित योगासने करतो व प्रत्येक दिवस आपल्याकरिता योग दिवस असतो, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेचे विश्वस्त आत्मप्रीत रक्षित, रतन लुणावत व अल्पा गांधी तसेच  कैवल्यधाम योग संस्थेचे रवी दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. रवी दीक्षित व देवकी देसाई यांनी योगसत्राचे संचलन केले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here