महिला सशक्तीकरणासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’

0
14

राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे….

यासाठी दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असल्याकारणाने महिलांनी कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज भरण्याची अथवा कोणत्याही ठिकाणी अर्ज भरताना कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. महिलाचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, दरमहा आर्थिक लाभ देणारी योजना म्हणून तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका निश्चित करण्यासाठी देखील ही योजना महत्त्वाची आहे.

ग्रामपंचाय, नगर पंचायत/परिषद व महानगर पालिका क्षेत्रात विभाग कार्यालय येथे पात्र महिलांना अर्ज देता येतील. याचबरोबर पोर्टल, मोबाइल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणे शक्य नसेल त्यांना ग्रामीण भागात महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक यांच्याकडे तसेच नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर्समध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

योजनेचे स्वरूप

पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) सक्षम बॅंक खात्यात दरमहा १ हजार ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे १ हजार ५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेच्या लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. २ लाख ५० हजार रुपये पेक्षा उत्पन्न असणाऱ्या महिला लाभासाठी पात्र असतील. २ लाख ५० हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांनी उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही. १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलादेखील लाभ देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक, वयासाठी व रहिवाससाठी – जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला , पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकेची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

ज्या लाभार्थ्यांस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) तसेच ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

०००

–           सतिश आनंदराव बगमारे, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here