‘ठाणे विकास परिषद-२०२४’ च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार होणार

0
52

ठाणे, दि. २० (जिमाका): विकसित शहर घडविण्यासाठी प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, यावर अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणणे, हे ‘ठाणे विकास परिषद-2024’ चे उद्दिष्ट आहे. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीचा कल्पकतेने वापर करुन नियोजनबद्ध आराखडा केला जात आहे. ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन’ च्या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल या महानगरपालिका तर अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, माथेरान, कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग आणि पालघर या नगरपरिषदा येतात.

नीती आयोगाच्या अहवालानुसार ‘एमएमआर जागतिक आर्थिक केंद्र’ बनविण्याच्या दृष्टीने एमएमआर क्षेत्रांमध्ये सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ‘जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि मित्रा’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे शनिवार, दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ‘MMR Development Conference-2024’ अंतर्गत ‘ठाणे विकास परिषद-2024’ चे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.

या विकास परिषदेस पत्रकार, उद्योजक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, राज्याचे मुख्य सचिव तथा ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here