वडीलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’चा कोल्हापुरातून राज्यस्तरीय ई – शुभारंभ

0
143
  • योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून रवाना होणे हे माझे भाग्यच – पालकमंत्री हसन मुश्रीफ
  • कोल्हापुरातून ८०० ज्येष्ठ तीर्थयात्री विशेष रेल्वेने मार्गस्थ

कोल्हापूर, दि.२८ (जिमाका): आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई-संदेशाद्वारे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा राज्यस्तरीय ई- शुभारंभ पार पडला.

यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल गाडी रवाना झाली. ८०० तीर्थयात्री दर्शनासाठी विशेष गाडीने मार्गस्थ झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे शुभेच्छा संदेशाद्वारे म्हणाले की,  या योजनेचा शुभारंभ दक्षिण काशी आई अंबाबाईच्या करवीर येथून होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. त्यांनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन सामाजिक क्रांतिचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांनाही विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली विशेष गाडी आयोध्येसाठी रवाना होते आहे. प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्याचं संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने यात्रेकरूंना मिळतेय, त्यामुळे दक्षिण काशी कोल्हापूर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी आयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा.

यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. निवड झालेल्या लाभार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन खर्च करण्यात येणार आहे. भारतातील 73 आणि आपल्या राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश असून पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यांने या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या शुभारंभाचा मान पटकावल्याचे सांगून मंत्री श्री. मुश्रीफ यांचे या शुभारंभाच्या निमित्ताने अभिनंदन केले.

तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषधे, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे १०, वैद्यकिय मतदतीसाठी ३ तर आयआरसीटीसीचे २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोल्हापुरातून सुरु झालेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची आता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधून अमंलबजावणी सुरु होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून रवाना होत आहे, हे माझे भाग्य – पालकमंत्री श्री. मुश्रीफ

शासनाकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ कोल्हापुरातून होतोय याचा आनंद झाल्याचे सांगून पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, या योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून रवाना होत आहे हे माझे भाग्यच आहे. यात्रेकरूंना प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. पहिली रेल्वे आयोध्येला जाताना व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना फार मोठं समाधान होत आहे. श्रीरामांचे दर्शन घडविण्याचा हा फार मोठा क्षण असून आपल्या आई वडिलांप्रमाणे या यात्रा कालावधीत सर्व शासकीय अधिकारी त्यांची सेवा करतील. या योजनेतून आयआरसीटीसी कडून चांगल्या गुणवत्तेचा मोफत चहा, नाष्टा, जेवण दिले जाणार आहे. जिल्यातातून २१६३ अर्ज आले होते, लोकसंख्येच्या प्रमाणात ८०० कोटा प्रथम आला असून यातील पारदर्शकपणे निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन त्यांनी केले.

खासदार श्री. माने यांनीही यावेळी सर्व तीर्थकरुंना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हा क्षण अविस्मरणीय आहे. ज्या लोकांना सहजासहजी श्रीरामांचे दर्शन घेता येणार नाही त्यांच्यासाठी शासनाकडून या योजनेद्वारे चांगली सोय केली आहे. दिमाखदार सोहळ्यातून या योजनेची सुरूवात कोल्हापूर येथून केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here