मुंबई, दि.१६ : ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक रणदिवे यांच्या निधनाने आपण एक ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार गमावला आहे, अशा शोक भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
दिनू रणदिवे यांनी पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा सामाजिक चळवळींमध्येही सहभाग होता. गोवा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. पत्रकारांसाठी ते एक दीपस्तंभच होते. 1956 साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नियतकालिकेतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली नंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केले. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादनही त्यांनी केले. दिनू रणदिवे यांनी दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी आवाज उठवला. दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण रणदिवे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात म्हणाले.