मुंबई, दि. ११ : माहिती तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र(NIC), महाराष्ट्रच्यावतीने, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांच्या ISEA प्रकल्पाच्या माध्यमातून मंगळवार ११ राेजी, “सुरक्षित इंटरनेट दिन” (Safer Internet Day) निमित्त राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचा उद्देश बालक, महिला आणि युवकांना इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. “Together for a Better Internet” या जागतिक संकल्पनेवर आधारित या उपक्रमाअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.
NIC च्या जिल्हा सूचना विज्ञान अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळांमध्ये सायबर सुरक्षितता, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे मार्ग, डेटा गोपनीयता आणि सोशल मीडियाच्या जबाबदारीने वापराबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमात माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस सायबर सेल, शैक्षणिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटनांचे सहकार्य लाभले.
राज्यभर राबविलेल्या या मोहिमेद्वारे सुरक्षित आणि जबाबदारीपूर्वक इंटरनेट वापरण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विशेषत: सायबर गुन्हेगारीपासून बचाव, ऑनलाईन व्यवहारातील सावधगिरी आणि वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबाबत जनजागृती करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान विभागाने नागरिकांना सुरक्षित इंटरनेटचा वापर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि सायबर सुरक्षेविषयी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
०००
संजय ओरके/विसंअ/