आजपर्यंत पार पडलेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने…

अ. भा. साहित्य संमेलन, नवी दिल्ली: विशेष लेख

साहित्य संमेलनामुळे समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास मदत होते…नवी दिल्ली येथे पार पडत असलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय धुळे संकलित साहित्य संमेलने पार पडलेल्या ठिकाणांविषयी माहिती देणारा लेख… 

 माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।

असे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी लिहून ठेवले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. त्यामुळेच यंदाचे देशाची राजधानी दिल्लीत होत असलेले 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन असणार आहे हे ही विशेष. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सन 1878 मध्ये पुण्यात झाले होते, ज्याचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे हे होते. तर 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झाले असून या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते.

आतापर्यंत झालेल्या 97 मराठी साहित्य संमलेनापैकी सर्वाधिक 14 संमलने आयोजित करण्याचा मान पुणे जिल्ह्यास मिळाला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत 10 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. यात सन 1936 साली 22 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे संपन्न झाले. त्यानंतर 1939 साली अहमदनगर, 1942 नाशिक तर 29 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धुळे जिल्ह्यात 1944 साली झाले असून या संमलेनाचे अध्यक्ष भार्गवराम विठ्ठल वरेरकर हे होते. त्यानंतर 1952 अमळनेर (जि. जळगाव), 1984 जळगाव, 1997 अहमदनगर, 2005 आणि 2021 नशिक तर 2024 मध्ये अमळनेर (जि. जळगाव) येथे झाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा, साहित्य आणि विचारांबाबत मौलिक अशी मेजवाणी साहित्यरसिकांना मिळते. मराठी साहित्य जगतास दिशा दाखवणारे व विचार देणारे अध्यक्षीय भाषण हे या संमेलनाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. संमेलनातील विविध नावीण्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे मानवी जीवनमूल्यांचे व विचारांचे पोषण घडते. पुस्तकांचे अफाट विश्व ग्रंथप्रदर्शन व पुस्तकांच्या लावलेल्या स्टॉलमधून उलगडत जाते. साहित्य हे जगण्यासाठी महत्वाचे सांस्कृतिक मूल्य आहे यांची जाणीव अशा संमेलनातून होते. समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास या साहित्य संमेलनामुळे मदत मिळते. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेल्या संमलेनाचे ठिकाण व त्यांचे अध्यक्ष यांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाची माहिती..

संमेलन वर्षे ठिकाण अध्यक्ष
1 1878 पुणे न्या. महादेव गोविंद रानडे
2 1885 पुणे कृष्णशास्त्री राजवाडे
3 1905 सातारा रघुनाथ पांडूरंग करंदीकर
4 1906 पुणे वासुदेव गोविंद कानिटकर
5 1907 पुणे विष्णू मोरेश्वर महाजनी
6 1908 पुणे चिंतापण विनायक वैद्य
7 1909 बडोदे कान्होबा रामछोडदास किर्तीकर
8 1912 अकोला हरी नारायण आपटे
9 1915 मुंबई गंगाधर पटवर्धन
10 1917 इंदूर गणेश जनार्दन आगाशे
11 1921 बडोदे नरसिंह चिंतामण केळकर
12 1926 मुंबई माधव विनायक किबे
13 1927 पुणे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
14 1928 ग्वाल्हेर माधव श्रीहरी अणे
15 1929 बेळगाव शिवराम महादेव परांजपे
16 1930 मडगाव वामन मल्हार जोशी
17 1931 हैद्राबाद श्रीधर व्यंकटेश केतकर
18 1932 कोल्हापूर सयाजीराव गायकवाड
19 1933 नागपूर कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर
20 1934 बडोदे नारायण गोविंद चापेकर
21 1935 इंदूर भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी
22 1936 जळगाव माधव जुलियन
23 1938 मुंबई विनायक दामोदर सावरकर
24 1939 अहमदनगर दत्तो वामन पोतदार
25 1940 रत्नागिरी नारायण सिताराम फडके
26 1941 सोलापूर विष्णू सखाराम खांडेकर
27 1942 नाशिक प्रल्हाद केशव अत्रे
28 1943 सांगली श्रीपाद महादेव माटे
29 1944 धुळे भार्गवराव विठ्ठल वरेरकर
30 1946 बेळगाव गजानन त्र्यंबक माडखोलकर
31 1947 हैद्राबाद नरहर रघुनाथ फाटक
32 1949 पुणे शंकर दत्तात्रय जावडेकर
33 1950 मुंबई यशवंत दिनकर पेंढारकर
34 1951 कारवार अनंत काकबा प्रियोळकर
35 1952 अमळनेर कृष्णाजी पांडूरंग कुलकर्णी
36 1953 अमदाबाद विठ्ठल दत्तात्रय घाटे
37 1954 दिल्ली लक्ष्मणशास्त्री बाळजी जोशी
38 1955 पंढरपूर शंकर दामोदर पेंडसे
39 1957 औरंगाबाद अनंत काणेकर
40 1958 मालवण अनिल
41 1959 मिरज श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
42 1960 ठाणे रामचंद्र श्रीपाद जोग
43 1961 ग्वाल्हेर कुसुमावती देशपांडे
44 1962 सातारा नरहर विष्णु गाडगीळ
45 1964 मडगाव वि. वा. शिरवाडकर
46 1965 सातारा वामन लक्ष्मण कुलकर्णी
47 1967 भोपाळ विष्णु भिकाजी कोलते
48 1969 वर्धा पु. शि. रेंगे
49 1973 यवतमाळ गजानन दिगंबर माडगुळकर
50 1974 इचलकरंजी पु. ल. देशपांडे
51 1975 कराड दुर्गा भागवत
52 1977 पुणे पु. भा. भावे
53 1979 चंद्रपूर वामन कृष्ण चोरघडे
54 1980 बार्शी गं. बा. सरदार
55 1981 (फेब्रुवारी) अकोला गो. नी. दांडेकर
56 1981 (डिसेंबर) रायपूर गंगाधर गाडगीळ
57 1983 अंबेजोगाई व्यंकटेश दिगंबर माडगुळकर
58 1984 जळगाव शंकर रामचंद्र खरात
59 1985 नांदेड शंकर बाबाजी पाटील
60 1988 मुंबई विश्राम बेडेकर
61 1988 ठाणे वसंत कानेटकर
62 1989 अमरावती केशव जगन्नाथ पुरोहित
63 1990 (जानेवारी) पुणे यु. म. पठाण
64 1990 (डिसेंबर) रत्नागिरी मधु मंगेश कर्णिक
65 1992 कोल्हापूर रमेश मंत्री
66 1993 सातारा विद्याधर गोखले
67 1994 पणजी राम शेवाळकर
68 1995 परभणी नारायण सुर्वे
69 1996 आळंदी शांता शेळके
70 1997 अहमदनगर ना. स. इनामदार
71 1998 परळी वैजनाथ द. मा. मिरासदार
72 1999 मुंबई वसंत बापट
73 2000 बेळगाव य. दि. फडके
74 2001 इंदूर विजया राजाध्यक्ष
75 2002 पुणे राजेंद्र बनहट्टी
76 2003 कराड सुभाष भेंडे
77 2004 औरंगाबाद रा. ग. जाधव
78 2005 नाशिक केशव मेश्राम
79 2006 सोलापूर मारुती चित्तमपल्ली
80 2007 नागपूर अरुण साधू
81 2008 सांगली म. द. हातकणंगलेकर
82 2009 महाबळेश्वर आनंद यादव
83 2010 पुणे द. भि. कुलकर्णी
84 2010 (डिसेंबर) ठाणे उत्तम कांबळे
85 2012 चंद्रपूर वसंत आबाजी डहाके
86 2013 चिपळूण नागनाथ कोत्तापल्ले
87 2014 सासवड फ. मुं. शिंदे
88 2015 घुमान (पंजाब) संदानंद मोरे
89 2016 पिंपरी चिंचवड श्रीपाल सबनीस
90 2017 डोंबिवली अक्षयकुमार काळे
91 2018 बडोदे लक्ष्मीकांत देशमुख
92 2019 यवतमाळ अरुणा ढेरे
93 2020 उस्मानाबाद फादर फ्रान्सिस
94 2021 नाशिक जयंत नारळीकर
95 2022 उदगीर भारत सासणे
96 2023 वर्धा न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
97 2024 अमळनेर रविंद्र शोभणे

(संदर्भ-लोकराज्य)

०००

  • संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, धुळे