जिल्ह्यातील ७४२ ज्येष्ठ नागरिक आज अयोध्येला रवाना होणार

पालकमंत्र्यांच्या सर्व तीर्थकरूंना शुभेच्छा

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत निवड

यवतमाळ, दि.११ (जिमाका) : राज्यातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेर तीर्थ दर्शन करता यावे यासाठी शासनाने तीर्थ दर्शन योजना सुरु केली. योजनेतून ५८ सहाय्यकांसह ७४२ जेष्ठ नागरिक उद्या अयोध्या दर्शनासाठी रवाना होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने योजनेतून पहिली फेरी रवाना होत असून सहभागी सर्व जेष्ठांना त्यांनी दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पालकमंत्री राठोड यांनी या योजनेच्या जिल्ह्यात उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी दोनदा आढावा घेतला होता. जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांची नोंदणी करुन तीर्थ दर्शनाचा लाभ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्याप्रमाणे नियोजन करुन यापूर्वीच अयोध्या दर्शनासाठी जेष्ठ नागरिक जाणार होते. परंतु, आचारसंहितेमुळे बदल होऊन आता हे दर्शन दि.१२ ते १६ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

अयोध्या दर्शनासाठी जाणाऱ्यांमध्ये यवतमाळ व कळंब तालुक्यातील प्रत्येकी १०८ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. नेर तालुक्यातील ५८, दारव्हा ९, बाभूळगाव ४१, दिग्रस ८६, पुसद ४०, उमरखेड ९३, महागाव ५७, आर्णी २५, घाटंजी ११३, राळेगाव ५१, पांढरकवडा १५, वणी २ याप्रमाणे तालुकानिहाय ७४२ जेष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. तर ५८ सहाय्यक सोबत जाणार आहे. हे सहायक जेष्ठ नागरिकांना त्यांच्या आवश्यक्तेप्रमाणे मदत करतील.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत अयोध्या जाणाऱ्या जेष्ठांचे पूर्णपणे विनामूल्य दर्शन होणार आहे. यासाठी प्रती लाभार्थी ३० हजार इतका खर्च शासन करणार आहे. त्यात प्रवास, निवास व भोजनाचा देखील समावेश आहे. शासन नियुक्त संस्थेद्वारे लाभार्थ्यांना ही यात्रा घडविण्यात येणार आहे. अयोध्येसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी दि.१२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता धामनगाव रेल्वे येथे स्टेशनवर स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे.

जास्तीत जास्त जेष्ठांना दर्शन घडविणार : संजय राठोड

तीर्थ स्थळांना भेटी देण्याची इच्छा असतांना देखील ती पूर्ण होत नाही. ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांची दर्शनाची मनोकामना पुर्ण करण्यासाठीच तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून जिल्ह्यातील ७४२ नागरिकांची पहिली टिम अयोध्या जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून दर्शन घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.

०००