भंडारा डोंगरावरील मंदिर उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्र्यांची भंडारा डोंगर पायथ्याशी आयोजित गाथा पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट

पुणे, दि. १६: जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भंडारा डोंगर पायथा येथे आयोजित गाथा पारायण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. सर्वांच्या सहभागाने भंडारा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या मंदीराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, सुनील शेळके, मारोती महाराज कुऱ्हेकर, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज भोसले उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र ही संत, शूर-वीरांची भूमी आहे. भंडारा डोंगरावर प्रत्येक वारकऱ्याची श्रद्धा आहे. त्यामुळे भंडारा डोंगरातून जाणारा बोगदा मार्ग बदलण्यात आला आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी २२०० कोटीचा डीपीआर तयार करुन केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. परंतु, नद्या पुनरुज्जीवनाची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

इंद्रायणी नदी स्वच्छता, प्रत्येक तालुक्यात वारकरी भवन बांधणे, पंढरपूर येथे ६५ एकर जागेत कायमस्वरूपी मंडप उभारणी, १२५ एकर जागेबाबत महसूल विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. दर्शन रांगेच्या उभारणीसाठी योग्य ती वाढीव मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच वारकरी संप्रदायासाठीचा पहिला पद्मश्री पुरस्कार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना देण्याबाबत राज्याच्या समितीत मान्यता देऊन केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी राज्यभरातून आलेले वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००