मुंबई, दि. २६ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात होण्यासाठी पोलिस, महानगरपालिका व संबधित जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेऊन काम करावे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायींची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची प्राधान्याने काळजी घ्यावी. महानगरपालिकेच्या वार्ड अधिकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी सजावट करावी, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजीच्या १३४ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भारतीय बौद्ध महासंघाचे प्रदीप कांबळे, भिकाजी कांबळे, विश्वशांती मित्रमंडळाचे प्रीतम कांबळे, कामगार नेते रमेश जाधव,आशिष गाडे, मुंबई महानगरपालिका प्रशासन, समाज कल्याण, एमएमआरडीए तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ.आंबेडकर यांच्या आंबवडे या ठिकाणी सजावटीसह सुशोभीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी तसेच रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे येथील पुतळ्याची व परिसराची स्वच्छता व डागडुजी करणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर परिसरातील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यांची सजावट, विद्युतरोषणाईसह अन्य कामे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांनी प्रधान्याने पूर्ण करावीत, असेही आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले.
0000
गजानन पाटील/ससं/