पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

मुंबई, दि. 28 :- पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, राज्यातील पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे. २ ते ४ मे, २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे.

राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत. ‘पर्यटन पोलीस’ या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, पर्यटन सुरक्षा दलाच्या नव्याने सुरूवातीमुळे राज्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल, ज्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढेल. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. दलातील कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेतील, जेणेकरून ते पर्यटकांना मार्गदर्शन आणि संरक्षण देऊ शकतील. पर्यटन स्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाईन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील.

आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा दल ठरेल वरदान

प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले की, पर्यटकांसाठी सुरक्षाकवच निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाचे हे पाऊल अत्यंत सकारात्मक आहे. यामुळे पर्यटनस्थळांवर विश्वासार्ह वातावरण निर्माण होईल. तसेच पर्यटकांचा पर्यटनाकडे ओघ वाढेल आणि स्थानिक समुदायांना आर्थिक लाभ मिळेल. दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारी, आधुनिक तंत्रज्ञान आणि समन्वित यंत्रणा असेल, जी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करेल. पर्यटकांसाठी हेल्पलाइन, माहिती केंद्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ सेवा उपलब्ध होतील. याशिवाय, स्थानिक पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था बळकट केली जाईल. पर्यटन विभाग पर्यटकांच्या गरजा समजून त्यांच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणखी मजबूत होईल.

प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल

२ ते ४ मे २०२५  दरम्यान पार पडणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनानुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. हे दल  २५ एप्रिल  ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यरत राहील. या दलासाठी आवश्यक वाहन व्यवस्था आणि अन्य सुविधा पुरविल्या जातील. जवानांकडून योग्य कर्तव्ये पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून केली जाईल. या उपक्रमासाठी होणारा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून अदा केला जाईल.

महाबळेश्वर महोत्सवातील प्रायोगिक तत्त्वावरील यशस्वी अंमलबजावणीनंतर, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन केले जातील. या उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्रात रु. १ लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि १८ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/