मुंबई, दि २९ :- शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिल्या.
मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांच्या आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीला सह सचिव कैलास गायकवाड, अवर सचिव सुनील सामंत उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागीय आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी या बैठकीत सन २०२३ व २०२४ मधील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांचा आढावा घेऊन ही प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तालुकास्तरीय समितीने संबंधित यंत्रणांकडून आवश्यक असणारा अहवाल प्राप्त करून घ्यावा. जिल्हास्तरावरही प्रलंबित प्रकरणाचा नियमित आढावा घेऊन प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावावीत. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणांचा आढावा घ्यावा. शेतकरी आत्महत्या मदतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री श्री. जाधव -पाटील यांनी सांगितले.
००००
एकनाथ पोवार/स.सं/