“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”

मुंबई, दि. 29 : सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने “TECH वारी – टेक लर्निंग वीक” या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी आवश्यक ज्ञान, साधने आणि विचारसरणीने सज्ज करणारा हा उपक्रम आहे. ५ ते ९ मे, २०२५ दरम्यान मंत्रालय, मुंबई येथे TECH-वारी हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. हा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्राच्या प्रशासनात होणाऱ्या डिजिटल परिवर्तनातील आघाडीचा ठरणार आहे. वारी या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित TECH-वारी ही समर्पण व सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहे, जे शासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये निरंतर शिक्षण व सहयोगाची भावना जागृत करते. या सामूहिक प्रवासाचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाकरीता सक्षम करणे हा आहे.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण

TECH-वारीचा गाभा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सहजसोपे आणि समजण्याजोगे बनवणे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज् (IoT), सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स अशा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे हे जटिल विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातील. प्रशासन सक्षमीकरण, सेवा प्रदान व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल हे सांगितले जाईल. केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर मानसिक व भावनिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी TECH-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवर विशेष सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे एक संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडवण्यास मदत होईल.

प्रसिद्ध वक्त्यांचा अपूर्व मेळा

या कार्यशाळेत सुप्रसिद्ध वक्त्यांचा समावेश असून ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यांचे ५ मे २०२५ रोजी व्याख्यान होणार आहे. ‘प्रवास पाककृतीचा’या विषयावर ६ मे २०२५ रोजी सुप्रसिद्ध शेफ माधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.’आरोग्यपूर्ण जीवनशैली’ या विषयावर रूजता दिवेकर यांचे ७ मे रोजी तर,’जीवन संगीत’ या विषयावर डॉ.संतोष बोराडे यांचे ८ मे रोजी २०२५ रोजी, ध्यान आणि अंतरिक शांती या विषयावर व्याख्यान होणार आहेत.

प्रशासनातील तंत्रज्ञान परिवर्तक

‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन’ या विषयावर सचिव (MeitY) श्री. एस. कृष्णन,’कृत्रिम बुद्धिमत्ता’या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी एआय इंडिया मिशन चे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह यांचे,’विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’या विषयावर निती आयोगाच्या फेलो देबजानी घोष यांचे, ‘भाषा अडथळे दूर करणारे तंत्रज्ञान’या विषयावर डिजिटल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाचे अधिकारी

‘महसूल विभागात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’या विषयावर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे, ‘स्टार्टअप डेमो डे – महा-राईज प्लॅटफॉर्म’या विषयावर कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, ‘आपत्ती निवारण व पुनर्वसनात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर’या विषयावर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, ‘कुंभमेळ्यात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांचे, ‘नागरी क्षेत्रात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांचे, ‘वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे.

नॅस्कॉमचे विशेषज्ञ

‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)’ या विषयावर एलटीआय माईंडट्रीचे  ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)’ या विषयावर एलायड डिजिटलचे रवींद्र देशपांडे यांचे ,’ब्लॉकचेन’ या विषयावर बेकर ह्युजेस या विषय लौकिक रगजी यांचे ,’सायबरसुरक्षा’ या विषयावर नॅस्कॉमचे प्रसाद देवरे, सुक्रित घोष यांचे,’स्मार्ट मिटिंग्स कशा घ्याव्यात’ या विषयावर झूमचे शैलेश रंगारी व मेहर उल्लीपालेम यांचे, ‘डिजिटल जागरूकता’ या विषयावर मास्टेकचे प्राजक्ता तळवलकर, राहुल मुळे यांचे व्याख्यान  होणार आहेत.

कर्मयोगी भारत हे डिजिटल शिक्षणासाठी मुख्य भागीदार,नॅस्कॉम हे  स्टार्टअप सहयोगी व तंत्रज्ञातील विशेषज्ञाचे भागीदार, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट – पोषण व आरोग्य संवर्धनासाठी पाककला सत्र या सर्वांचा या प्रशिक्षण उपक्रमात सहभाग असणार आहे.

आजीवन शिक्षणाचा प्रसार

डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत, TECH- वारीने निरंतर शिक्षण संस्कृतीला चालना दिली आहे. आयगॉटसारख्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मचा वापर वाढवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रेरित केले आहेत. महाराष्ट्रातील 5 लाख कर्मचारी आयगॉटवर आहेत व 10 लाखांहून अधिक कोर्स पूर्ण केले आहेत.

प्रशासनातील नवोपक्रमांना चालना

TECH-वारी हे सिद्ध करते की, केवळ खासगी क्षेत्रच नाही तर शासनही नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून परिवर्तन साधू शकते. सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना नवीन कल्पना आणि डिजिटल उपायांमध्ये सहभागी करून महाराष्ट्र एक अभिनव, कार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासन घडवत आहे.

नवसंधी निर्माण करणारा उपक्रम

TECH-वारी हे केवळ शिक्षणापुरते सिमित नसून, उद्योजकता व नाविन्यपूर्ण उत्पादने यांना संधी देणारे हे व्यासपीठ आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या सहकार्याने “महाराईज- स्टार्टअप पिचिंग” हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. ज्यात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2025 मधून विजयी ठरलेल्या 24 स्टार्टअप्सना प्रशासनातील  वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपले उत्पादने व सेवा  सादर करण्याची संधी मिळणार आहे.

भविष्याकडे निर्धारपूर्वक पाऊल

TECH-वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र ठामपणे सांगतोय – आपण फक्त बदलाचा स्वीकार करत नाही, तर बदलाचे नेतृत्व करतो आहोत. प्रत्येक कर्मचारी हा परिवर्तनाचा वाहक आहे आणि एका तंत्रसज्ज, प्रगत व संवेदनशील महाराष्ट्रासाठी आपली जबाबदारी पार पाडत आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/