राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत मुंबई उपनगर कार्यालयाचे आवाहन

मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांच्याकडील परिपत्रक क्रमांक ०११२/२८७//प्र.क्र.७८/विशा/१अ/दि. १ जानेवारी २०१५ अन्वये प्लास्ट‍िक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात, असे सूचित केले आहे. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरावर व अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुकास्तरावर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाच्या आदेशानुसार समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्याच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब तसेच कार्यक्रमाच्या आणि अन्य ठिकाणी इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तहसील कार्यालयात व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटना यांना शासन आदेश दि. १ जानेवारी २०१५ अन्वये सुपूर्द करण्यात आलेले आहेत, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००