छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचा सर्वांनी अंगीकार करावा- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्योजक झालेल्या आयटीआय च्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सोलापूर, दि. :- आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात आहे. महाराजांनी लोक कल्याणकारी आदर्शवत अशी राज्यकारभार पद्धत राबवली. त्याच पद्धतीच्या अवलंब करून आपले राज्य शासनही राज्यकारभार करत आहे. समाजातील प्रत्येक विद्यार्थी, नागरिक व पालक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व आदर्शांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

जिल्हा व्यवसाय शिक्षण कार्यालय व महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात किल्ले विकास मंत्री श्री. लोढा मार्गदर्शन करत होते. यावेळी कौशल विकास विभागाचे मुंबई येथील सहसंचालक अनिल जाधव, पुणे येथील उपसंचालक चंद्रशेखर ढाकणे, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचीम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनायक झुटे, मित्राचे अधिकारी पंकज जयस्वाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. लोढा म्हणाले की, शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी  नोकरी किंवा उद्योग या दोन्ही पर्यायाचा विचार केला पाहिजे. स्वतःचे उद्योग उभारून त्या उद्योगातून इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. मित्रा या संस्थेच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध केली जात आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागाच्या न्यू एज कोर्सेसच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थ्रीडी प्रिंटिंग, इलेक्ट्रिक वेहिकल साठी ईव्ही टेक्निशियन, सोलर टेक्निशियन हे कोर्सेस जुलै महिन्यापासून सुरू होत आहेत. या कोर्सेस द्वारे भविष्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा असेही आवाहन कौशल्य विकास मंत्री श्री लोढा यांनी केले.

प्रारंभी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांनी यावेळी महाराजांना वंदन केले.

*उद्योजकांचा सत्कार –

विकास मंत्री श्री लोढा यांच्या हस्ते आयटीआय संस्थेमार्फत जे विद्यार्थी उद्योजक झालेले आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये…

1)रवींद्र बगले मल्टिपल बिझनेस, 2)लक्ष्मण राजाराम श्रीमल इलेक्ट्रिक मेकॅनिकल हे सवोॅ शाईन सर्विसेस येथे काम करतात. 3)विष्णू थेटे हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतात. 4)जसपाल सिंग तैयावाले रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्टर पदावर कार्यरत आहेत. 5) प्रकाश तैयावाले राधा इंटरप्राईजेस यांचा देखील सत्कार करण्यात आला.  त्यानंतर राष्ट्रगीताने  कार्यक्रमाचा समारोप झाला.

            **