मुंबई, दि. ३० : च्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विधान परिषद सदस्य अरुण काका भिमराव जगताप आणि डॉ.रामदास भगवानजी आंबटकर यांच्या निधनाबाबत सभापती प्रा.राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला.
सभापती प्रा.शिंदे यांनी शोकप्रस्तावात डॉ. जयंत नारळीकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. कोल्हापूर येथे जन्मलेले नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विभागप्रमुख म्हणून 16 वर्षे कार्य करत संस्थेला जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नंतर पुण्यात इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सची स्थापना करून संशोधन क्षेत्रात मोलाची भर घातली. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. विज्ञानाचा सामान्यांशी संबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न विशेषत्वाने उल्लेखनीय होता. त्यांच्या विज्ञानकथांच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे कार्य केले.
सभापती प्रा.शिंदे यांनी अरुणकाका जगताप यांचे सामाजिक योगदानही अधोरेखित केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील भेंडी गावचे रहिवासी असलेले जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधान परिषदेमध्ये दोन वेळा निवडून येईपर्यंतचा राजकीय प्रवास केला. समाजकार्य, शिक्षण संस्था, क्रीडा संघटना यामधून त्यांचा जनतेशी घनिष्ठ संबंध राहिला. त्यांच्या निधनामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आप्तस्वकीय हरपल्याची भावना आहे, असे सभापती म्हणाले.
डॉ. रामदास आंबटकर यांचा जीवनप्रवास आणि कार्यकर्तृत्वाचा आढावाही सभागृहात मांडण्यात आला. वर्धा जिल्ह्यात जन्मलेले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्यरत असलेले आंबटकर यांचा सहकारी संस्थांमध्ये मोठा सहभाग होता. ते 2018 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले. विद्यार्थी चळवळीतील त्यांचा 20 वर्षांचा अनुभव आणि कार्यकर्तावृत्तीने केलेले काम आजच्या काळासाठी प्रेरणादायी आहे, असे सभापतींनी नमूद केले.
या तिन्ही व्यक्तिमत्त्वांचे योगदान स्मरणीय असून त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास सभापतींनी यावेळी व्यक्त केला.
000
संजय ओरके/विसंअ/