मुंबई दि. २८ : राज्यात दिले जाणारे मानधनाचे स्वरूप सुनिश्चित करणे, कार्यरत कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या तरतूदी लागू करणे, १० वर्षापासून जे कर्मचारी अखंड सेवा देत आहेत अशा कर्मचाऱ्यांना केरळ राज्याच्या धर्तीवर शासकीय रजा लागू कराव्यात, तसेच या कर्मचाऱ्यांचे पदोन्नती व बदलीबाबतचे धोरण निश्चित करावे, अशा विविध मागण्यांसदर्भात योग्य कार्यवाही संबंधित यंत्रणांनी करावी, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.
कृषी विस्तारामधील क्रांतीकारक बदलांच्या गरजेच्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंतर्गत प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या ‘आत्मा’मधील कर्मचाऱ्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम आत्मा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सुविधा देण्यासंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
विधानभवन येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा-‘आत्मा’अंतर्गत कार्यरत करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करणेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत कृषी आयुक्त धीरज कुमार, सहसचिव अशोक आत्राम, आत्मा एम्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विनोद रहांगडाले, आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000