नाशिक दि. 05फेब्रुवारी, 2021 (जिमाका वृत्तसेवा) -‘महाआवास’ अभियान उपक्रम तळागाळातील आर्थिक दुर्बल घटकांपर्यत पोहोचवून अभियानाची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित नाशिक जिल्हा ‘महाआवास’अभियान कार्यशाळेत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार,आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, रवींद्र परदेशी, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, श्री. सिद्धार्थ वनारसे यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, प्रशासक आदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
श्री.भुजबळ यावेळी म्हणाले, गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी ज्या लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आली होती. त्यांची आता दुरवस्था झाली आहे. या लाभार्थ्यांना घरकुल योजनेत नव्याने सामावून घेण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा. घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून जागा उपलब्ध करून द्यावी किंवा बहुमजली इमारत बांधण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महाआवास अभियान ग्रामीण नाशिक जिल्ह्याबाबत माहिती दिली. श्रीमती बनसोड म्हणाल्या, सन 2016-17 पासून 20 नोव्हेंबर 2020 हा दिवस राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत शंभर दिवसीय महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत 1714 भूमिहीन लाभार्थीपैकी 662 लाभार्थ्यांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा उपलब्ध करून दिली आहे.
श्रीमती बनसोड म्हणाल्या, या अभियाना अंतर्गत पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 49 हजार 813 घरकुले, शबरी आवास योजनेतून 4 हजार 535 घरकुले, रमाई आवास योजनेतून 4 हजार 914 घरकुले, पाथरी आवास योजनेतून 53 घरकुले लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. तसेच या अभियानाचा एक भाग म्हणून 1 हजार 875 लाभार्थ्यांनी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण देण्यात आले आहे. महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत घरकुलासोबतच लाभार्थ्यांना जल जीवन मिशन योजनेतून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, प्रधामंत्री उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी, सौभाग्य योजनेतून विघुत जोडणी व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मधून उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार असल्याचे श्रीमती लीना बनसोड यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाआवास अभियान योजनेचे होर्डिंग्ज, पोस्टर व बॅनर व जिंगल्स यांचे अनावरण करण्यात आले तसेच यासोबतच डेमो हाऊसचे उद्घाटन करण्यात आले.