नवी दिल्ली, दि. २३ : राज्याचे कृषीमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय भूपृष्ठ आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पालघर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 ची नियमानुसार पुनर्रचना व्हावी, अशी मागणी केली.
श्री.भुसे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इरानी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
श्री.भुसे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांची यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी पालघर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 च्या पुनर्रचना व्हावी असा प्रस्ताव सादर केला. मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा हा राष्ट्रीय महामार्ग 217 किलो मिटरचा आहे. या महामार्गावर जड वाहनांचे सतत वहन होत असल्यामुळे या मार्गाची पुनर्रचना होणे गरजेच आहे. यासोबतच या महामार्गाचे त्र्यंबकेश्वर, जव्हार, नाशिक असे थोडे रूंदीकरण व्हावे, अशीही श्री.भुसे यांनी बैठकीत मागणी केली. यामुळे या परिसरात असणाऱ्या तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला हा महामार्ग पूरक ठरेल.
यासह कोथरेडीगज-सतना-मालेगाव-चाळीसगाव हा राज्य महामार्ग क्रमांक 19 हा दुपदरी रस्ता चौपदरी करावा अशी मागणी केली. राज्य महामार्ग 19 मालेगाव ग्रामीणला जोडून असल्यामुळे गुजरात, राजस्थान आणि दक्षिणेकडे तामिळनाडू आणि कर्नाटकला जातो. या महामार्गावर जड वाहनांची गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण हे सीआरएफ निधीतून करावे, अशी मागणी श्री.भुसेंनी बैठकीत केली.
केंद्रीय संरक्षण विभागातर्फे नाशिकमध्ये सुसज्ज रूग्णालय द्यावे
भारतीय संरक्षण दलातील विविध लष्करी तुकड्यांमध्ये सैनिक म्हणून नाशिक जिल्ह्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याठिकाणी निवृत्त सैनिक, सैनिकांची कुटुंबे आहेत. त्यांच्यासाठी अद्ययावत असे रूग्णालय नाशिक जिल्ह्यात असावे, अशी मागणी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या बैठकीत श्री.भुसे यांनी केली.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून द्राक्ष्यांवरील अनुदानाचे पुनर्विलोकन व्हावे
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून द्राक्ष्यांवरील अनुदानाचे पुर्नविलोकन व्हावे, अशी मागणी श्री भुसे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन केली. 2018-19 आणि 2019-20 मध्ये 7 टक्के आणि 5 टक्के असे अनुदान दिले होते. परंतु 31 डिसेंबर 2020 पासून अनुदान मिळणे बंद झाले आहे. याचा विपरीत परिणाम द्राक्ष शेतीवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता यावर्षी अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी श्री.भुसे यांनी यावेळी केली. त्यांनी या संदर्भात निवेदनही दिले.
नाशिकमध्ये टेक्सटाईल पार्कची मागणी
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातमागाचे काम होत असून या ठिकाणी टेक्सटाईल पार्क उभारण्यात यावा, अशी मागणी श्री.भुसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांना निवेदन देऊन केली.
000000
अंजु निमसरकर /वृत्त वि. क्र.34/ दिनांक 23.02.2021