सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या राज्यभर ‘एकता दौड’

0
9

मुंबई, दि. 30 :लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याकरिता त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मुंबईत आयोजित एकता दौडचा आरंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीपीए, मरीन ड्राईव्ह येथून सकाळी ८.००वाजता होणार आहे.

मुंबईतील एकता दौड ही 31 ऑक्टोबर रोजी सकाळी८.००वाजता एनसीपीए गेट क्र.3, मरीन ड्राईव्ह येथून सुरू होणार असून, त्याचे विसर्जन ग्रँट मेडिकल जिमखाना, मरीन ड्राईव्ह येथे होणार आहे. यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांनी दिली आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त’रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.

नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात हुतात्मा उद्यान येथून सकाळी 7.30 वाजता दौडचा आरंभ होणार आहे. 21 क्रीडा संघटनांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. अहमदनगर येथे सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दौडला सुरूवात होईल. टिळकरोडमार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, रुपीबाई बोरा हायस्कूल मार्ग, दिल्ली गेट, सिद्धीबाग मार्गे पोलीस मुख्यालय येथे एकता दौडचा समारोप होईल.

धुळे येथे सकाळी8 वाजता जमनालाल बजाज मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथून दौडचा प्रारंभ होणार असून महापालिका जुन्या इमारतीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात दौडचा समारोप होणार आहे. जळगाव येथे देखील एकता दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून एकतेची शपथ घेऊन दौडचा आरंभ होईल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे एकतेची शपथ देतील. एमजी रोड, रेडक्रॉस सिग्नल, सीबीएसमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप होणार आहे. एकता दिवसाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी स. 8.00वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना आणि संचलन होणार आहे.

विदर्भात नागपूर येथे ही दौड अमरावती रोड येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  मैदानावर सकाळी8 वाजता  सुरु होणार आहे. अकोला येथे ही दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडीयम येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी7 वाजेपर्यंत वसंत देसाई स्टेडियम येथे उपस्थित रहावे, असे आवाहन अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून दौड सुरु होणार असून नवीन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता ही दौड सुरु होणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी 7 वाजेपर्यंत वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

बुलडाणा येथे ही दौड जिल्हा पोलीस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील मुख्य चौकांमधून पुन्हा जिल्हा पोलीस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. ही दौड31ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता सुरु होणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्हा पोलीस मैदान येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनच्यावतीने करण्यात आले आहे.

उस्मानाबाद येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी  7.00 वाजता  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय दौडमध्ये युवक-युवती,विद्यार्थी,खेळाडू,योगप्रेमी,स्वयंसेवी संस्था, पोलीस, व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यात सकाळी 7 वाजता क्रिडा भवन अलिबाग बीच येथून एकता दौडचा प्रारंभ करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या दौडचे आयोजन करण्या आले आहे.

लातूर येथे गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर 2019  रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनीटांनी  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय एकता दौडला टाऊन हॉल येथून सुरुवात होणार आहे. सदर दौड शिवाजी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे. ही दौड यशस्वी करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि विविध विभागांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सांगली येथे एकतादौड पुष्कराज चौक येथूनसकाळी 7 वाजतासुरु होणार असून मार्केट यार्ड,विश्रामबाग चौक परत त्याचमार्गाने पुन्हा पुष्कराज चौक येथे आल्यानंतर एकता दौडचा समारोप होईल.अशी माहितीजिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनीदिलीआहे.

बीड येथे सकाळी08.00  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल पर्यंतएकता दौड” (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.

हिंगोली येथे राष्ट्रीय एकता दौडची सकाळी7.00 वाजता अग्रसेन चौक (नांदेड नाका) येथून सुरुवात होणार आहे. बस स्थानक-इंदिरा गांधी चौक – महेश चौक मार्गे महात्मा गांधी चौक येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे.

कोकण विभागातील रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांच्या सहभागाने  एकता दौडचेआयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीजिल्ह्यातशिवाजी स्टेडियम, मारुती मंदीर ते जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील 100 फुटी ध्वजस्तंभ पर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दौडची सुरुवात सकाळी7 वाजता पाच बत्ती ते आर्यन हायस्कूल या मार्गाने होणार आहे. तर समारोप पाचबत्ती येथे होणार असून या राष्ट्रीय दौंडमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती खेळाडू सामाजिक संस्था पोलीस दल सहभागी होणार आहेत.

चंद्रपूर येथे रन फॉर युनिटीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी 6 वाजता केले आहे. राष्ट्रीय एकता दौड ही जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होणार असून जनता महाविद्यालय वरोरा नाका प्रियदर्शनी हॉल ते जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

अकोला येथे एकता दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम  येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार असून वसंत देसाई स्टेडियमच्या बँडमिंटन हॉलकडील प्रवेशद्वार येथे समारोप होईल. या दौडमध्ये सुमारे400 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सकाळी  6.15 वा. राष्ट्रीय  एकता दौड क्रांतीचौक ते बाबा पेट्रोल पंपपर्यंत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 8 वा. शहरातील मम्मादेवी येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी पुतळा इथपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

तसेच परभणी येथे सकाळी 7.30 वा. राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रिडा संकुल येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आली आहे.

याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये दौडसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here