ठाणे, जि. ९ (जिमाका) : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते आदीबाबत उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती कृषि विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.
बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास येताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
या नियंत्रण कक्षामध्ये कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल. कृषि निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल,असे श्री. माने यांनी सांगितले.
नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी
· विभागीय कार्यालय, ठाणे- ८६९१०५८०९४ toqcthanediv@gmail.com
· ठाणे- ७०३९९४४६८९ dsaothane.2013@rediffmail.com
· पालघर- ९४०३८२१८७० dsaopalghar@rediffmail.com
· रायगड- ९५०३१७५९३४ dsaoraigad@gmail.com
· रत्नागिरी- ८६६८९७२३३७ dsaortn@rediffmail.com
·सिंधुदूर्ग- ९४०४३०५८४८ saosindhu@gmail.com
०००