स्वातंत्र्य, मजबूत संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांमुळे संसदीय लोकशाहीवरील विश्वास वाढेल – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

0
10

नागपूर, दि. 27 :- नागरिकांचे स्वातंत्र्य, मजबूत संविधान आणि त्यावर विश्वास ठेवणारे नागरिक यामुळे संसदीय लोकशाहीवरील विश्वास वाढत असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर  यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘विधिमंडळ : जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ’ या विषयावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

 

ॲड. नार्वेकर म्हणाले, “संसदीय लोकशाही प्रणालीत लोकप्रतिनिधी सभागृहात जनतेच्या भावना मांडत असतात. त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याला लोकप्रतिनिधींचे प्राधान्य असते. राज्य व देशहिताच्या प्रश्नांवर चर्चा होत असते. सामूहिकपणे राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात. विधिमंडळे संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार काम करीत असतात. कायदा संविधानाच्या विरुद्ध असेल तर न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारातच विधिमंडळे कामकाज करीत असतात. विधिमंडळ हे जनतेच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा व्यक्त करण्याचे व कायदे करण्याचे व्यासपीठ आहे”.

“नागरिकांनी स्वातंत्र्य उपभोगताना घटनेने दिलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडावीत, तरच आपली लोकशाही सुरक्षित राहील. लोकशाहीचे महत्त्व अनुभवण्यासाठी अधिकार व कर्तव्ये माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षण हे महत्वाचे आहे. देशातील सर्व नागरिकांना शिक्षित करण्यासाठी कायदा केलेला आहे. भारत हा प्रबळ देश बनविण्यासाठी शिक्षित नागरिक असणे आवश्यक आहे. पारदर्शकता ही लोकशाहीत महत्त्वाची असते. आपल्या संसदीय लोकशाहीला असलेली गौरवशाली परंपरा सुरु राहील आणि विधिमंडळावर विश्वास वाढेल, असे कार्य आपल्या युवा पिढीकडून व्हावे”, अशी अपेक्षाही ॲड.नार्वेकर यांनी व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ॲड.नार्वेकर यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.प्रेरणा चौधरी यांनी आभार व्यक्त केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here