शनिवार, जुलै 26, 2025
Home Blog Page 410

१०० दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे, दि. 30: पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासंबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्यावात, 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित वाहतूक समस्येबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्वांनी वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पुढाकार घ्यावा. रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करुन महानगरपालिकेने ते अतिक्रमण तात्काळ काढावेत, रस्ते आणि वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती द्यावी. याकरिता आवश्यकतेप्रमाणे पोलीस विभागाची मदत घ्यावी. याकरिता अत्याधुनिक साधने, कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (एआय) नवनवीन तंत्रज्ञानाची तसेच या विषयाशी निगडीत तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. भूसंपादनाची प्रलंबित असलेली न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता पुणे महागरपालिकेकडे असलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तातरीत करावी. नवले पुलाचे प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत. स्मार्ट सिटी कार्यालयातील वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पोलीस आयुक्ताकडे वर्ग करावी, अशाही सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

अहिल्यानगर व सोलापूर महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रव्हॅल्स थांब्याकरीता जागा निश्चित कराव्यात. सुरक्षितेतच्यादृष्टीने त्याठिकाणी सीसीटिव्ही, वीज आणि शौचालय, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी.

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मिळून कार्यवाही करावी. वाहतूक सुरळीत राहण्याच्यादृष्टीने पायाभूत सुविधा उभाराव्यात. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही श्री. पवार म्हणाले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, खासदार श्रीमती कुलकर्णी यांनी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबत अनधिकृत अतिक्रमण काढण्याची सूचना केली. आमदार श्री. तापकीर, श्री. शिवतारे, श्री. पठारे यांनी वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत सूचना केल्या.

श्री. हर्डीकर म्हणाले, शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्याकरीता मेट्रो पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पीएमपीएलच्या बसेसच्या फेऱ्यामध्ये वाढ करावी लागेल. नागरिकांना परवडेल असे भाडेदरात आकारणी करावी लागेल, असे श्री. हर्डीकर म्हणाले.

पोलीस आयुक्त श्री. कुमार म्हणाले, आगामी काळात होणारी लोकसंख्येतील वाढ व रस्त्यांची रुंदी विचारात घेता शहरात वाघोली, सोलापूर मार्गासह विविध भागात थांबणाऱ्या ट्रॅव्हल्सकरीता धोरण राबविणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर असल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.

डॉ. भोसले म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्याकरीता बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. याकरीता सर्व संबंधित यंत्रणेला विचारात घेवून प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील.

श्री. म्हसे म्हणाले, वाहतूकीच्यादृष्टीने पीएमआरडीएच्यावतीने शहर परिसरात मल्टीमोडल हब विकास आराखड्याअंतर्गत कामे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

श्री. शेखर सिंह आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक कोंडी तसेच ती सोडविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.
0000

लोकप्रतिनिधींनी आराखड्याचा अभ्यास करुन सूचना कळवाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.३० : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि रोजगारांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महामेट्रोकडून सादर केलेल्या पुढील ३० वर्षाच्या १ लाख २६ हजार ४८९ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यामध्ये काही बदल, सूचना असल्यास सर्व लोकप्रतिनिधींनी येत्या ७ ते १० दिवसांमध्ये महामेट्रोला लेखी स्वरुपात कळवाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे महानगर प्रभाव क्षेत्रातील सर्वंकष वाहतूक आराखडा अद्ययावत करणे व पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, आमदार अमित गोरखे, चेतन तुपे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना मेट्रोने सादर केलेल्या आराखड्याचा अभ्यास करुन त्यांना वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल त्यासाठी नवीन मार्ग, पर्यायी रस्ते आदींबाबत मेट्रोकडे सूचना कळवाव्यात. महामेट्रोकडून त्याबाबत तांत्रिक तसेच आर्थिक व्यवहार्यता तपासून आवश्यकतेप्रमाणे आराखड्यात बदल करण्यात येतील.

यावेळी श्री. हर्डीकर यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीत हिंजवडी ते जिल्हा न्यायालय, पिंपरी चिंचवड ते निगडी व स्वारगेट ते कात्रज या मार्गावर नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन, बीआरटी व रेल्वे लाईन, मांगडेवाडी, कदम वस्ती, लोणीकंद व मोशी या ठिकाणी नवीन बस टर्मीनल, कोथरुड, कात्रज, हडपसर, मार्केटयार्ड व पिंपरी बस डेपोचा पुनर्विकास, पूलगेट, चिंचवड, भोसरी, निगडी, मुखई चौक, चिखली, वाघोली, रांजणगाव, तळेगाव व चाकण येथील जुन्या बस टर्मीनलचा पुनर्विकास, रिंग रोड, मिसींग लिंक, रेल्वे जंक्शनचा विकास, सायकल ट्रॅक, फूटपाथमध्ये सुधारणा, ट्रक टर्मीनल व लॉजिस्टिक हब, पार्कींग व्यवस्था, रस्ता रुंदीकरण, बसेसची उपलब्धता, रेल्वे ओव्हर ब्रीज, पीएमपीएमएलच्या नवीन मार्गावर बस सुरु करणे याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दर पाच वर्षांनी वाहतूक आराखडा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असल्याचे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती सुळे यांनी वाहतूक विकास आराखडा तयार करताना पुरंदर येथील विमानतळाच्या जागेच्या अनुषंगाने सूचना केली.

श्री. शिवतारे यांनी पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच सासवड येथे बसडेपो सुरु करावा, पुणे ते नीरा लोकलची सेवा सुरु करावी, बंद केलेल्या मार्गावरील बसेस सुरु कराव्यात अशी मागणी केली.

श्री. तुपे म्हणाले, नवीन मुठा उजवा कालव्याच्या खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत प्रस्तावित बोगद्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता देऊन पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण बोगद्याच्या अंतरापर्यंत जमिनीवर रस्ता आणि समांतर लोकल रेल्वे किंवा मेट्रो केल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकेल; त्याबाबत विचार व्हावा, असे ते म्हणाले.

आमदार श्री. तुपे यांनी मेट्रोच्या स्वारगेट कात्रज विस्तारित मार्गापासून कात्रज ते मंतरवाडी अशी सासवड मार्गाशी जोडणी प्रस्तावित करावी अशी मागणी केली.
0000

पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या उभारणीस वेग येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४१ कोटी निधीस मान्यता

मुंबई, दि. ३० : पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकासाठी ४१ कोटी निधीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

हे स्मारक उभारण्यासाठी १९९७ पासून मागणी होत होती. उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेमुळे आता क्रांतिवीर चापेकर स्मारक उभारणीस वेग येणार आहे.

चापेकर वाडा येथे स्मारक तयार करण्यासाठी सर्वप्रथम  दत्ताजी साळवी, सभापती स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती.

त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सप्टेंबर, १९९७ मध्ये ठराव मंजूर करुन चापेकर स्मारकाचा २९ लक्ष रकमेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये ४४ लक्ष किंमतीचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला.

मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जुलै, २०२३ मध्ये  स्थानिक खासदार श्री. बारणे यांच्या विनंतीनुसार यथोचित स्मारक उभारण्यासाठी शासनामार्फत ४१ कोटी देण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते.

आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी  चापेकर स्मारकाचे काम  पूर्ण होण्यासाठी ६८ कोटी रकमेच्या आराखड्यास मंजुरी देऊन ४१ कोटी इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

स्मारकाच्या या कामात स्थापत्य विषयक कामे, संग्रहालय, ऐतिहासिक कास्य शिल्प, ऑडियो व्हीज्युअल अशा कामांचा समावेश आहे.

000

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियोजन भवन येथील पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर, दिनांक 30:- नियोजन भवन इमारतीमधील पहिल्या मजल्यावर पालकमंत्री यांच्यासाठी कार्यालय तयार करण्यात आलेले असून या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज फित कापून केले. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणीही केली.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट व पाहणी

राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली व कार्यालयाची सविस्तर पाहणी केली.

पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच श्री गोरे यांनी आज प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना सांगून प्रत्येक शाखेच्या अधिकाऱ्याची व त्याच्या कामकाजाची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अभ्यागतासाठी स्वतंत्र अभ्यागत कक्ष तयार करण्यात आलेला असून त्या कक्षाची ही पाहणी पालकमंत्री यांनी केली.

यावेळी महापालिका आयुक्त शितल उगले तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख तहसीलदार श्रीकांत पाटील व अन्य महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामुळे दिव्यांग बांधवांना विनाविलंब सहायक उपकरणे मिळण्यास मदत होईल – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

  • ‘डीडीआरसी’मार्फत चालविले जाणारे पहिलेच प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र
  • हरंगुळ बु. येथील संवेदना प्रकल्पाला पालकमंत्र्यांकडून ५ लाखांची देणगी

लातूर, दि. ३० दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव, सहायक उपकरणे यांचे वितरण करण्यासाठी यापूर्वी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अर्थात अॅलिमको या संस्थेमार्फत दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात होती. मात्र, आता लातूर येथे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक सहायक उपकरणे देण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु राहील. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्प, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई येथील आयईसी लिमिटेड यांच्या सहकार्याने लातूर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अंतर्गत प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना. भोसले यांच्या हस्ते झाले.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, संजय अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील, आरईसी लिमिटेडचे महाव्यवस्थापक सुमन एक्का, अॅलिमकोचे कमलेश यादव, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. योगेश निटूरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईक आदी यांची यावेळी उपस्थिती होती.

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामुळे दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर साहित्य मिळाल्यामुळे त्यांचे जीवनमान सुखकर होईल. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचवून त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. दिव्यांग बांधवांसाठीही विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री ना. भोसले यावेळी म्हणाले. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. दिव्यांगांसाठी राज्यातील पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून चालविली जात आहे. त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार, रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच दिव्यांग कल्याणाचे इतरही उपक्रम या संस्थेमार्फत चालविले जात असून या संस्थेचे कार्य अभिमानास्पद असल्याचे पालकमंत्री ना. भोसले यावेळी म्हणाले. तसेच या संस्थेच्या कामासाठी आपण वैयक्तिकरित्या पाच लाख रुपयांची देणगी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिव्यांग बांधवांसाठी संवेदना प्रकल्पामार्फत करण्यात येत असलेल्या कार्याचा उल्लेख करून जिल्ह्यात यापूर्वी सहायक उपकरणे वाटपासाठी या संस्थेने केलेल्या प्रयत्नांमुळे एकाच वेळी सुमारे १२ हजार ५०० दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि सहायक उपकरणे वितरीत करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवांच्या कल्याणसाठी अनेक योजना हाती घेतल्या असून त्यामुळे दिव्यांग बांधवांना मदत होत असल्याचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले. तसेच दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात सहायक उपकरणे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असून दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी गतीने व्हावी, असे सामाजिक न्याय विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील यावेळी म्हणाले.

प्रारंभी संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. निटूरकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामाची माहिती दिली. व्यंकट लामजणे यांनी निवेदन केले.

 पालकमंत्र्यांच्या हस्ते ३५० दिव्यांग बांधवांना सहायक उपकरणांचे वितरण

गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे ३५० दिव्यांग बांधवांना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सहायक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मोटाराईज ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलचेअर, रोलेटर, सीपीचेअर, श्रवणयंत्र, काठी आदी साधनांचा समावेश होता. वितरण कार्यक्रमासाठी बसवराज पैके, प्रविण सगर, सुनिल वसमत्कर, चापेकर, राहुल देशपांडे यांनी परिश्रम घेतले.

महिलांना भरारी घेण्यासाठी कृषी नवीन प्रगतीचे क्षेत्र : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा

नांदेड दि. ३० जानेवारी : कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेला नीटनेटकेपणा, योग्य वेळेची निवड,नवनवीन प्रयोग, बाजाराचा अभ्यास व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा आता महिलांनी देखील अभ्यास करावा. कृषी क्षेत्र देखील महिलांसाठी प्रगतीची नवी दिशा ठरू शकते असे प्रतिपादन,राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हयातील कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शेतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र साह्यभूत भूमिका सोडून आता या क्षेत्रातही महिलांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .कृषी विज्ञान केंद्र सगरोळी सारख्या केंद्रांनी आता या दृष्टीने देखील प्रयत्न करावे. अशा महिलांना आणखी प्रशिक्षित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात गुरुवार (ता.३०) रोजी महिला मेळाव्यास त्या संबोधित करीत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी,उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प्रणीता देवरे चिखलीकर,उद्योजिका चंद्रिका चव्हाण, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियंका भालेराव, कर्करोग तज्ञ डॉ. सुप्रिया सोनजे, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होत्या.

कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असून तंत्रज्ञान युगात युवतींना अनेक संधी  उपलब्ध आहेत.कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून ड्रोन पायलट बनण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिली आहे,अशा अनेक योजना केंद्र व राज्य शासनातर्फे राबविल्या जात आहेत. त्यातून महिला आत्मनिर्भर, सक्षम व आरोग्यमय होतील, याची खात्री असल्याचे बोर्डीकर म्हणाल्या.

आमदार चित्रा वाघ यांनी, हर घर शौचालय व लखपती दीदी अशा योजनांचा  महिलांनी लाभ घ्यावा. नावासमोर आईचे नाव जोडून शासनाने महिलांचा सन्मान केला आहे. कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठ एकशेबारा डायल करावा असे आवाहन केले. शासनाने लखपती दिदिसाठी अकरा कोटी तर बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी दहा हजार कोटी निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले. महिलांनी उभारलेल्या प्रदर्शनींना भेटी देऊन संवाद साधला. चंद्रिका चव्हाण यांनी महिलांसाठी उद्योगाच्या संधी, डॉ भालेराव यांनी स्त्रियांचे आरोग्य व डॉ. सोनजे यांनी कर्करोग निदान व उपचार तर प्रा. कुलकर्णी यांनी, निरामय, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याचा कानमंत्र दिला. यावेळी यावेळी परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

इतिहासाचा समृद्ध वारसा ‘शिवशस्त्र शौर्य प्रदर्शना’तून नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहाेचवू – अपर मुख्य सचिव विकास खारगे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार शुभारंभ

नागपूर,दि.30: महाराष्ट्राला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यादृष्टीने सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व विभाग प्रयत्नशिल असून नागपूर येथे येत्या 7 फेब्रुवारी पासून शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटीशांच्या ताब्यात असलेली वाघनखे हे खास या प्रदर्शनाचे आकर्षण असून यासमवेत शिवशस्त्र नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनीला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी संबंधीत विभाग प्रमुखांनी आपली जबाबदारी चोख बजावावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिले.

सिव्हिल लाईन्स येथील मध्यवर्ती संग्रहालयात खास उभारण्यात आलेल्या सभागृहात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा  अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी घेतला.

या प्रदर्शनीच्या निमित्ताने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करुन त्यांनी संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, अभिरक्षक मयुरेश खडके, सहाय्यक संचालक संदीप शेंडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवकालीन इतिहास हा श्रध्देसमवेत प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे  जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणातील ही महत्वाची टप्पे असून एक प्रकारे ही आपली सांस्कृतिक, ऐतिहासिक शक्तीस्थळ आहेत. या ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभवाला सातत्याने समाजापर्यंत पोहचविण्याची नितांत गरज असून यातून सामाजिक शांतता व स्वास्थ्य अधिक दृढ होते. राज्यात सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई येथे वाघनख्यांसह हे शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन आपण याच उद्देशाने आयोजित केल्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या प्रस्तावित समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज सुरेश भट सभागृह येथे भेट देऊन पाहणी केली.

मध्यवर्ती संग्रहालय येथे जय्यत तयारी

झिरो माईलपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र हॉल उभारण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच वेळी सूमारे 50 लोकांना प्रदर्शनाची  पाहणी करता येईल. त्यानुसार गटाने प्रवेश व्यवस्था असेल. वाघनखे व शिवशस्त्रासह खुले शिल्पदालन, शिलालेख दालन पाहता येईल. खुलेशिल्प दालनामध्ये मध्य भारतातील आढळून आलेली इसवीसन पूर्व ते मध्ययुगीन काळापर्यंतची विविध  मुर्तीशिल्पे प्रदर्शित करण्यात आली आहेत. शिवकालीन शस्त्र दालनामध्ये वाघनखे, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा, अग्नीबाण आदी महत्वपूर्ण शस्त्रास्त्र पाहता येतील. अग्नीबाण हा राज्याच्या केवळ नागपूर येथील संग्रहालयात उपलब्ध आहे.

या ठिकाणी विविध मर्दानी खेळ व शिवकालीन शस्त्रांची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. मुख्य समारंभ हा संग्रहालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर सुरेश भट सभागृहात संपन्न होईल.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. ३०: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना मिळून एकूण १ हजार २९९ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास व ७५३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली.

या बैठकीस राज्याचे सर्व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही राधा, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.

मान्यता देण्यात आलेल्या आराखड्यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा व ७०० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत १४५ कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेकरिता ६३ कोटी १३ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा आणि ५३ लाख १ हजार रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करा

पुणे शहर आणि जिल्ह्यात खूप ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक महत्त्वाची ठिकाणे, गड किल्ले, स्मारके असून तेथील संवर्धनाचे काम सुरू आहे. ही सर्व ठिकाणे पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते पुढे म्हणाले, या आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल तसेच कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. राज्याच्या पर्यटन विभागाकडूनही जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

आदर्श शाळा उपक्रम राबवावा
पुणे जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल ३०३ शाळा अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनीही आपल्या शाळांचा अशा पद्धतीने विकास करण्याचा आराखडा तयार करून सादर करावा. या शाळांचा दर्जात्मक विकास करण्यासाठी अशासकीय स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेता येईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र

जिल्ह्यात पुणे मॉडेल पीएचसी अर्थात आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र १०८ उपक्रमाची चांगल्या प्रमाणे अंमलबजावणी करावी अशाही सूचना त्यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

‘जीबीएस’ आजाराबाबत घेतला आढावा
यावेळी गुलियन बॅरे सिंड्रो अर्थात ‘जीबीएस’ आजाराबाबतही आढावाही श्री. पवार यांनी घेतला. जिल्ह्यात आज अखेर या आजाराचे १२९ रुग्ण असून पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपाचे यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयासह, काशीबाई नवले रुग्णालय, भारती विद्यापीठ रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आदी या उपचारांची सोय असलेल्या रुग्णालयांशी संपर्कात असल्याचे पुणे मनपा आयुक्तांनी सांगितले.

उपचाराचे अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी आपल्या रुग्णालयात या आजारावरील उपचारासाठीची पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. उपचारांसाठी अवास्तव दर करणाऱ्या रुग्णालयांकडून उपचारांची देयके कमी करून रुग्णांना दिलासा द्यावा. दराबाबत ऐकत नसलेल्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

केंद्रीय शिष्यवृत्तीचा प्रश्न केंद्रीय स्तरावर सोडविण्याबाबत प्रयत्न सुरू- चंद्रकांत पाटील
विविध शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने शिक्षण संस्थांना येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यस्तरावरून मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या १०० टक्के शिष्यवृत्तीबाबतची पद्धती योग्यरीत्या कार्यान्वित करण्यात आली असल्याने त्यामध्ये अडचणी येत नाहीत, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रस्तावित योजना व तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

यावेळी मंत्री भरणे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह खासदार, आमदार यांनी विविध सूचना केल्या.

बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०२५- २६ मराठी उपक्षेत्र निहाय प्रस्तावित नियतव्यय पुढील प्रमाणे:
कृषी व संलग्न सेवांसाठी ७१ कोटी २० लाख, ग्रामीण विकास साठी १७५ कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी २३ कोटी २६ लाख, ऊर्जा विकास साठी ८५ कोटी, उद्योग खाणकाम साठी ७७ कोटी ७६ लाख, परिवहन साठी १८५ कोटी, सामान्य आर्थिक सेवा साठी २९ कोटी, सामाजिक सामूहिक सेवा ३९० कोटी ११ लाख, नाविन्यपूर्ण योजनांसाठी ५५ कोटी १२ लाख याप्रमाणे १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय ७०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी ३ कोटी ४० लाख, ऊर्जा विकाससाठी १० कोटी १५ लाख, उद्योग साठी १० लाख, परिवहन साठी १० कोटी, सामाजिक सामूहिक सेवांसाठी १९४ कोटी ७ लाख, नाविन्यपूर्ण योजनांसाठी ४ कोटी ३५ लाख रुपये अशा प्रस्तावित नियतव्ययास मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी १४ कोटी १५ लाख, ग्रामीण विकास ४ कोटी ८५ लाख, पाटबंधारे व पूर नियंत्रण १ कोटी ३० लाख, ऊर्जा विकास ३ कोटी ४३ लाख, उद्योग खाणकाम २० लाख, परिवहन ८ कोटी ९७ लाख, सामाजिक सामूहिक सेवा २८ कोटी ९४ लाख, नाविन्यपूर्ण योजना १ कोटी ४५ लाख अशा एकूण ६३ कोटी १३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यासह ५३ कोटी १ लाख रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे.

बैठकीत सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत झालेल्या खर्चाचा व कामांचाही आढावा घेण्यात आला.
0000

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील संविधान उद्देशिका प्रतिकृती, जनसंवाद कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर, दि. ३० : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने सुरु केलेल्या घर घर संविधान अभियानानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या सात कलमी कृती आराखडा अंतर्गत जनसंवाद कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या संविधान उद्देशिका प्रतिकृतीचे व जनसंवाद कक्षाचे उद्घाटन आज पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले.

 आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राज्य शासनाने सुरु केलेल्या घर घर संविधान अभियानानिमित्त लातूर जिह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वागतला बुके ऐवजी संविधान देवून प्रत्येक घरामध्ये संविधान पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच कार्यालयाच्या दर्शनी भागात संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती लावण्याच्या सूचनाही कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचे उद्घाटना पालकमंत्री ना. भोसले यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद कक्षाची निर्मिती जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली असून या कक्षाचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

‘झिरो प्रीस्क्रिप्शन’ निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३० :- जनतेला दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची शासनाची भूमिका असून  या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि  नाविन्यता  मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबई शहरचे खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य, लोकप्रतिनिधी, अपर मुख्य सचिव आय एस चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, पोलिस आयुक्त, सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.शिंदे यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे सूचित करुन केईएम.जे.जे यासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना बाहेरुन औषध विकत घेण्याची वेळ येऊ नये, यादृष्टीने रुग्णालयामार्फत औषध उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून झिरो प्रिस्किप्शनची अंमलबजावणी तातडीने करण्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये पूरेशा प्रमाणात एमआरआय, व्हेंटीलेटर, सिटी स्कॅन मशीन्सची सुविधा उपलब्ध ठेवण्याचे सूचित केले. केईएम मधील रुग्णांची संख्या लक्षात घेता त्याठिकाणी तातडीने नवीन अतिरिक्त एमआरआय मशीन खरेदी करण्यात यावे,त्यासाठीची खरेदी प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी, जोपर्यंत नवीन मशीन्स येत नाही तोपर्यंत रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी वाडीया,खालसा या रुग्णालयांतून तपासणी सुविधा उपल्ब्ध करुन द्यावी. केईएमच्या खाटांची क्षमता वाढवण्यासाठी त्याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या शताब्दी टॉवर संदर्भात लवकर कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हेंटीलेटर व इतर सुविधांच्या बाबत आढावा घेऊन त्याची पूर्तता करावी. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील असे श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुंबई मधील रस्ते सुव्यवस्थित चांगले ठेवण्यात यावे. रस्त्यांवरील वाहतूक लक्षात घेता फुटपाथवरुन सुरक्षित चालण्याची नागरिकांची जागा मोकळी करावी. पावसळ्यापूर्वी करावयाची कामे युद्धपातळीवर सुरु करण्यात यावी. रस्त्यांची डागडूजी, नालेसफाई या सर्व कामांना आत्ताच सुरवात करावी जेणेकरुन पावसळ्यापूर्वी ती योग्यपद्धतीने पूर्ण होतील. त्याचप्रमाणे लालबाग, माटुंगा, परळ याठिकाणच्या पूलांचे रिसफरिंग करावे. मुंबईतील पर्यावरणाचे संतुलन आणि हवेची गुणवत्ता अबाधित राखण्यास कटाक्षाने लक्ष देण्यात यावे,यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबई शहरातील सर्व बागांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने चांगली संस्था नेमून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मुंबईच्या स्वच्छेतच्या दृष्टीने पुन्हा डीप क्लिन्सिंग ड्राईव्ह सुरु करण्यात यावे. महापालिकेने ससून डॉक व इतर भागातील कचरा स्वच्छ करावा. सर्व पुलांच्या खालील जागेचे सुशोभिकरण करण्यात यावे. त्याचप्रमाणे पावसळ्यापूर्वीच्या धोकादायक इमारतीच्या दुरुस्ती तसेच पुर्नविकास प्रकल्पांच्या विविध कामांसाठी ट्रान्झींट कॅम्प आवश्यक असून त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईतील आपल्या घराचे स्वप्न् पूर्ण करण्यासाठी शासन विविध शासकीय गृहनिर्माण संस्थ्याच्या सहकार्याने सर्वांना परवडणारी घरे या संकल्पनेची अंमलबजावणी मोठ्या स्वरुपात करणार असून यामध्ये महिला,विद्यार्थीनी,डबेवाले,गिरणी कामगार,ज्येष्ठ नागरिक,पोलिस, या सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देणार आहेत यासाठी म्हाडाची गृहनिर्माण धोरण नव्याने आणणार आहे. सर्व योजनांच्या अमंलबजावणीतून लोकांना लाभ देण्याचा उद्देश असून सर्व यंत्रणांनी कालबद्धपणे काम करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिल्या.

मुंबई शहरच्या सन २०२५ -२६  वर्षासाठीच्या  एकूण  ६९०  कोटी रुपयांच्या  प्रारुप आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी  पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीच्या  व्यवस्थापनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद  उपलब्ध करून द्यावी. तसेच हवेच्या गुणवत्ता लक्षात घेता  मुंबई शहरातील स्मशान भूमीत शवदहनासाठी एलपीजी, सीएनजीची व्यवस्था करावी,असे सूचित केले.

कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी   बांग्लादेशी आणि रोहिंग्ये यांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सूचित केले. तसेच  याबाबतच्या समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करण्याचे सूचना दिल्या. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाच्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी संदर्भात  उचित कार्यवाही करण्याचे सूचित केले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ प्रारुप आराखडा

मुंबई शहरामध्ये एकूण ११ मोठी शासकीय रुग्णालय आहे या रुग्णालयांमध्ये मुंबई शहरातील रुग्णांची संख्या व मुंबई शहरा बाहेरील रुग्णांची संख्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आहे, यामध्ये सर्वसाधारण आजार व गंभीर आजार अशा दोन्ही प्रकारचे सामान्य कुटुंबातील रुग्ण उपचार घेत आहेत, यासाठी रुग्णालयामध्ये औषधोपचार व यंत्रसामग्री तसेच रुग्णालयातील वॉर्डचे आधुनिकीकरण अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी रुपये १३२.४७ कोटीच्या निधीस मान्यता दिली.

मुंबई शहरातील काही भागांमध्ये डोंगर उतारा खाली झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून यामध्ये अति सामान्य व गरीब कुटुंबे राहत आहेत यांच्या सुरक्षितेसाठी व संरक्षण अर्थ डोंगर उतारा खाली संरक्षण भिंतीची कामे घेण्यात येत आहे यासाठी  रूपये २६.९० कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली.

शासकीय महाविद्यालयाचा विकास या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील ९ मोठी शासकीय महाविद्यालय मध्ये आवश्यकता सोयी सुविधा व साधन सुविधा तसेच एज्युकेशन अपग्रेशन याकरिता रुपये २५.०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली.

महिला व बालविकास या विभागाअंतर्गत मुंबई शहरातील डेविड ससून डोंगरी उमरखडी येथील बालसुधार गृह इमारतींचे सक्षमीकरण तसेच येथील मैदानांचे सुशोभीकरण व बालक युवकांसाठी इतर क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, यासाठी रुपये १५.२० कोटीच्या निधीस मान्यता दिली. एकात्मिक बाल विकास योजना या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील सर्व अंगणवाडी येथे स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याचे प्रयोजन आहे तसेच अंगणवाड्यांमध्ये आवश्यकता मूलभूत सुविधा साधन साहित्य साधनसामग्री उपलब्ध करून द्यायचे आहे यासाठी लागणारा आवश्यक निधी रुपये ५.२० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील सर्व कोळीवाड्यांमधील पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे रंगरंगोटी व सौंदर्यकरण यांची कामे तसेच समुद्रकिनाऱ्यावरील जीटीची बांधकामे व मजबुतीकरण करण्यात येत आहे, यासाठी रुपये ३३.२६ कोटीची रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरामध्ये एकूण ५ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून यामध्ये एक युवतींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एक अल्पसंख्यांक साठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे येथील यंत्र सामग्री साठी तसेच आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे यासाठी रुपये ८.२५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी ओपन जिम व शैक्षणिक संस्थांतर्गत असलेले खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण करून मैदानी तयार करावयाचे आहेत यासाठी रुपये ५.१२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील युवकांना व युवतींना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करीत आहे, यासाठी रुपये ३.५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील ऐतिहासिक वास्तू एशियाटिक लायब्ररी या ठिकाणी जुन्या पुस्तकांचे जतन करण्यासाठी व त्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे , यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत रुपये ०.०२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

पोलीस व तुरुंग या विभागांना पायाभुत सुविधा पुरविणे यामध्ये  पोलीसांना वाहन उपलब्ध करणे, पोलीस वसाहती व पोलीस स्थानके अद्ययावत करणे,  पोलीस व तुरूंग या विभागांना साधनसामग्री पुरविणे, जिल्हा रस्ता सुरक्षा उपाय करणे, पोलीस व तुरुंग या विभागांच्या कामांसाठी रूपये ६४.१० कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्हयातील गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत शासकीय कार्यालये व शासकीय निवासी इमारतींची दुरूस्ती करणे तसेच सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभांवती संरक्षक भिंत बांधणे या कामांसाठी रूपये ४०.३६ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करणे करीता रूपये ४६.६८ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके संवर्धन करणे करीता रूपये २०.७० कोटीची निधी मागणी आहे (३% राखीव निधी) मुंबई शहर जिल्हयामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबविणे करीता रूपये ३१.०५ कोटीची निधी मागणी आहे. (राखीव ४.५% शाश्वत विकास ध्येय १% सह) मुंबई शहर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) अंतर्गत अपारंपारिक उर्जा विकास करणे करिता रूपये २.८५ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा धारावी, सायन, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी व कुलाबा क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, येथील मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने रुपये २२५.१९ कोटीची निधी मागणी करण्यात आलेली आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

 

ताज्या बातम्या

जिल्हा न्यायालयातील इ लायब्ररीचे उद्घाटन

0
अमरावती, दि. २६ : सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते अमरावती जिल्हा न्यायालयातील इ लायब्ररीचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती विजय आचलिया, न्यायमूर्ती अनिल...

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

0
बुलढाणा,दि.२६(जिमाका) :  जिल्ह्यातील सोयाबीन व मका पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी, या संकटावर मात करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे...

पिकविम्याचे सुरक्षा कवच

0
         हवामानाच्या अनिश्चितेशी निगडित जोखीम कमी करून कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचे रक्षण करण्यासाठी देशात प्रधानमंत्री पिक विमा योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. केंद्र व...

कोल्हापुरी चप्पल : देशी हस्तकलेचा अनमोल वारसा

0
भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक हस्तकलांपैकी एक असलेल्या अशा कोल्हापुरी चपला आज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयात येत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचं आकर्षण महाराष्ट्रात आणि देशात...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

0
मुंबई, दि.२५ : भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन...