शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog

जिल्ह्यात दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – पालक सचिव एकनाथ डवले

नाशिक, दि. १९ : राज्य शासनाने अलीकडेच दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. ई – ऑफिस प्रणालीचा वापर करावा, अशा सूचना पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाचा पालक सचिव डवले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालक सचिव डवले यांनी सांगितले की, शासनाच्या शंभर दिवसांच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी विकसित महाराष्ट्र २०४७ च्या अनुषंगाने व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यात दीर्घकालिन म्हणजे २०४७ पर्यंत गाठावयाची उद्दिष्टे, मध्यमकालिन उद्दिष्टे म्हणजे राज्याच्या अमृत महोत्सवापर्यंत गाठावयाची उद्दिष्टे आणि अल्पकालिन म्हणजे २ ऑक्टोबर २०२९ पर्यंतच्या पाच वर्षांत वर्षनिहाय गाठावयाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे. दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात विकसित महाराष्ट्र २०४७, ई गव्हर्नन्स, सेवाविषयक, प्रशासकीय सुधारणांचाही समावेश आहे. तसेच तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. आगामी काळात शंभर टक्के ई- ऑफिस प्रणालीचा वापर करावा, असेही पालक सचिव श्री. डवले यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी 150 दिवसानिमित जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

या बैठकीनंतर पालक सचिव डवले यांनी नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यातील विविध विकास कामांचा आढावा घेत त्यांना गती देण्याचे निर्देश दिले. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष श्रीमती नायर यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

०००

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार

सातारा दि. १९:  पाटण तालुक्यातील सळवे, ढेबेवाडी, पाटण मार्गावर जानुगडेवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी पाटण आगार बसचा अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना समजताच तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून जखमींना आवश्यक ते सर्व उपचार त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले. जखमींच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबत दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले आहे.

एमच-14 बी.टी.1127 ही बस सळवे–ढेबेवाडी या मार्गावर धावत असताना जानुगडेवाडी या गावच्या हद्दीत आली असता समोरून ट्रॅव्हल येत आसताना बस चालकाने बस डावीकडे घेतली आसता रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या झाडाला बसची धडक बसून गंभीर अपघात झाला. अपघातात रा. प. चालकाला वाहन नियंत्रित न झाल्याने सदर अपघाता झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

या अपघातात 30 जण किरकोळ जखमी झाले असून बसचेही नुकसान झाले आहे. यातील बहुतांश जणांना  प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले.त्यापैकी 9 जणांना कराड येथे  व  9 जखमी प्रवाशांना स्थानिक  ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

पालकमंत्री देसाई यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची विचारपूस केली. त्यांच्या उपचाराबाबत स्थानिक डॉक्टरांना सूचना दिल्या. कृष्णा हॉस्पिटलच्या वतीने देखील उपचाराबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही असे सांगण्यात आले. तसेच तत्काळ तेथे दाखल 9 प्रवाशी यांचेवर उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले. तसेच यातील किरकोळ स्वरुपाच्या जखमींना उपचारानंतर लगेच घरी सोडण्यात आले असून सद्यस्थितीत दोन जण कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, महसूल प्रशासनाचे सर्कल यांनी स्वत:भेट घेऊन विचारपासून केली व तात्काळ उपचार उपलब्ध होतील, याची दक्षता घेतली. किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. कराड येथील विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी देखील हॉस्पिटलमध्ये भेट देऊन याबाबत रुग्णाची विचारपूस केली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील हे देखील जखमी वरील उपचार व तात्काळ आवश्यक मदत या बाबींवर लक्ष ठेवून आहेत.

०००

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी

मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) आज घेतलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार महिन्यांत हे उपक्रम राबवले गेले.

गुजरातमधील २४-कडी (SC) आणि ८७-विश्वदर, केरळमधील ३५-निलांबूर, पंजाबमधील ६४-लुधियाना वेस्ट आणि पश्चिम बंगालमधील ८०-कालिगंज या मतदारसंघांत १३५४ मतदान केंद्रांवर पोटनिवडणुका पार पडल्या.

या निवडणुकीत खालील नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी झाली:

🔹 मोबाईल डिपॉझिट सुविधा:

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना त्यांच्या मोबाईल फोन ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात प्रवेशापूर्वी फोन कुठे ठेवावा, हा मोठा प्रश्न असतो. यावर उपाय म्हणून साधे डब्याचे खाचे किंवा गोण्यांमधून ही व्यवस्था करण्यात आली आणि स्वयंसेवकांमार्फत सुविधा दिली गेली.

🔹 सुधारित VTR (मतदान टक्केवारी) प्रणाली:

पूर्वी मतदान टक्केवारीचे आकडे सेक्टर अधिकारी फोन, SMS वा मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे संकलित करत असत. मात्र आता ECINET अ‍ॅपवरून प्रत्येक दोन तासांनी मतदान टक्केवारी थेट अद्ययावत केली जाऊ लागली. मतदान पूर्ण झाल्यानंतरही, प्रिसाइडिंग ऑफिसर मतदान केंद्र सोडण्यापूर्वी अंतिम VTR डेटा अ‍ॅपवर अपलोड करतात. त्यामुळे आकडेवारीत होणारा उशीर टळतो. जिथे नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे ऑफलाईन नोंदी करून नंतर त्यांचे समक्रमण होते.

🔹 १००% वेबकास्टिंग:

सर्व मतदान केंद्रांवर (फक्त एका अपवादाने) मतदान प्रक्रियेचे थेट वेबकास्टिंग करण्यात आले. यामुळे सर्व प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडली. RO, DEO आणि CEO स्तरावरील विशेष टीम्सने या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.

🔹 इलेक्टोरल रोल्सचा विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SSR):

सुमारे वीस वर्षांनंतर प्रथमच पोटनिवडणुकीपूर्वी मतदार यादींचे विशेष पुनरावलोकन करण्यात आले.

या सर्व उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

०००

 

नोंदणी विधेयक मसुद्यात सुधारणेसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा

मुंबई, दि. १९ : नोंदणी विधेयक मसुदा २०२५ वर सुधारणा सुचविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यातील उपविभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचनांमुळे मसुदा अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल असून नागरिकांना जलद, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा मिळण्यास मदत होईल, असे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी यावेळी नमूद केले.

नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक यांच्या सादरीकरणातून विधेयकाच्या मसुद्यातील सर्व कलमांवर सखोल चर्चा करण्यात आली. नोंदणी विधेयक मसुदा २०२५ हा नोंदणी कायदा १९०८ ला आधुनिक स्वरुपात रुपांतर करण्याचा प्रयत्न असून यामध्ये डिजिटल नोंदणी, आधार आधारित पडताळणी, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज व विस्तारित बंधनकारक दस्तऐवज यांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व नोंदणी व मुद्रांक उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या चर्चेत सहभाग घेऊन नागरिक केंद्रित, पारदर्शक व डिजिटलायझेशनला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

कार्यशाळेत डेटा गोपनीयतेसंदर्भात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्‍शन ॲक्ट २०२३ च्या तरतुदींचे पालन करुन डेटा संकलन, वापर, सुरक्षा आणि तृतीय पक्ष सामायिकरणासाठी कठोर नियम लागू करणे आवश्यक असल्यावर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात ऑफलाईन नोंदणी केंद्रे स्थापन करणे व डिजिटल साक्षरता कार्यक्रम राबवणे, डेटा एनक्रिप्शन, ऑडिटसाठी कठोर तरतुदी,  नोंदणी रद्दीकरण प्रक्रियेत स्पष्टता आणि अनिवार्य नोटीस,  स्वतंत्र नोंदणी विवाद निवारण प्राधिकरणाची स्थापना करणे आदी सूचना करण्यात आल्या.

या कार्यशाळेस अप्पर मुद्रांक नियंत्रक संजय चव्हाण, विशेष कार्य अधिकारी  राजेंद्र मुठे, सहसचिव सत्यनारायण बजाज, मुद्रांक अधीक्षक अशोक पाटील आणि नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नोंदणी विधेयक २०२५ लागू झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचा केवळ संदेशच नाही, तर वास्तव चित्र उभे राहत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत भरलेल्या निधी चौधरी यांच्या चित्र प्रदर्शनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट देऊन त्यांच्या कलाकृतीचे  कौतुक केले.

एकीकडे प्रशासकीय जबाबदारी आणि दुसरीकडे आपली कला जोपासत सनदी अधिकारी चौधरी सामाजिक संदेश देण्याचे काम करत आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या २२ जूनपर्यंत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांनी चित्रांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जगात प्रचलित असलेल्या विविध कथांवर आधारित त्यांनी चित्र रेखाटली आहेत. त्यांच्या एकूण ४० चित्रांचा या प्रदर्शनात समावेश असून यातील काही चित्रांमध्ये महापुरुषांच्या तत्त्वांचाही समर्पक वापर करण्यात आला आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

मारुती चितमपल्ली वनसंपदेचे सजग प्रहरी – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १९ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रसिद्ध निसर्गप्रेमी आणि लेखक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पद्मश्री चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या तरल आणि प्रवाही लेखनातून त्यांनी निसर्गाचे निरागस व निर्मळ विश्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.

ज्येष्ठ वनसंरक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतरही, चितमपल्ली आयुष्यभर वन्यजीव तसेच जैवविविधतेचे संरक्षक राहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने मानवतेचा आणि विशेषतः वनसंपदेचा सजग प्रहरी गमावला आहे. त्यांचे कार्य व वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबिय, चाहते आणि निसर्गप्रेमी जनतेला आपल्या शोकसंवेदना कळवतो, अशा शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

०००

 

नवी मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी तातडीने मार्ग काढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : नवी मुंबईतील नागरिकांच्या विविध सुविधांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबईतील विकास आराखड्यास मंजुरी, करारपद्धतीने कार्यरत प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेणे, गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करणे, नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा मंजूर करणे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विकास शुल्काच्या रक्कमेबाबत तसेच खारघर ते नेरूळ धक्का सागरी मार्ग बेलापूरमधून न घेता सेक्टर ११ बेलापूर मधून विमानतळाला जोडणे आदी मागण्यांबाबत तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महापालिका आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत आढावा बैठक वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार कपिल पाटील आदी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा महासभेच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी. महापालिकेने होर्डिंग व फेरीवाला धोरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी. तसेच अशा प्रकारचे धोरण महापालिकास्तरावर मंजूर करण्याबाबत विचार करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

बारवी धरणग्रस्तांना ज्या प्रमाणे विविध महापालिकांमध्ये कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे, त्या प्रमाणेच मोरबे धरण व सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेण्यासंदर्भात कालबद्ध आराखडा तयार करावा. ऐरोली जेट्टी चोवीस तास सुरू ठेवणे, शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प बाधित मच्छिमारांना भरपाई देणे, नवी मुंबईतील गावठाण विस्तारामध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांना अधिकृत करणे, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती कमी करणे, नवी मुंबई विमानतळामध्ये स्थानिकांना नोकरी देणे, दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांना पुनर्वसन म्हणून भूखंड देणे आदी विषयांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

खारघर सेक्टर १६ ते नेरूळ जेट्टी या प्रस्तावित सागरी किनारा मार्गातील बेलापूर सेक्टर १५ येथे डबल डेकर रस्ता तयार करता येईल का याचा विचार करावा. तसेच तुर्भे व कोपरखैरणे यांच्यामधील खैरणे गावाजवळ आणखी एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा लवकर मंजूर करावा – वन मंत्री गणेश नाईक

नवी मुंबईतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत. घणसोली येथे खुला रंगमंच कला अकादमी मिनी थिएटर बांधणे, मराठी भाषा भवन उभारणीला गती देणे, घणसोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणे, तसेच विकास शुल्कामध्ये महानगरापालिकेलाही हिस्सा मिळावा. परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाचे नाव बदलून श्री शिव गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ करणे, नागरी सुविधांसाठी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करावेत, आदी विविध मागण्या वन मंत्री नाईक यांनी यावेळी केल्या.

खारघर ते नेरूळ जेट्टी सागरी मार्ग बेलापूरमध्ये न आणता तो सेक्टर ११ मधून विमानतळाच्या दिशेला न्यावा, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेला विकास आराखडा लवकर मजूर करावा, अशी मागणी मंत्री नाईक यांनी यावेळी केली.

बैठकीस नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, यांच्यासह नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग, उद्योग विभाग, एमआयडीसी, मेरी टाईम बोर्ड आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

केमसेफ केमिकल कंपनीतील कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात

मुंबई, दि. १९: केमसेफ केमिकल कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घ्यावे, कंपनीच्या नियोजनानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कक्षात बैठक झाली. यावेळी कामगार उपआयुक्त अभय कुमार गीते, कामगार विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय जनरल कामगार उत्कर्ष संघटनेचे इंदर शेंडगे, गजानन गिरी, कंपनीचे संचालक आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

तळोजा एमआयडीसी मधील केमसेफ कंपनीचे कामावरून काढून टाकलेले अनेक कामगार २० वर्ष अथवा दीर्घ काळापासून कंत्राटी स्वरूपात काम करीत होते. यांना काम न देता नवीन कामगार कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत. यापूर्वी काम करणाऱ्या ६५ कामगारांना कंत्राटी पद्धतीने टप्प्याटप्प्याने कामावर नेमावे, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी दिले.

०००

किरण वाघ/विसंअ/

जेएनपीए येथे योग दिनानिमित्त ‘योग संगम’ कार्यक्रम

मुंबई, दि. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रासाठी नोडल समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरआरएपी – केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, वरळी, मुंबई यांच्या तर्फे ‘योग संगम’ या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन २१ जून २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता, जेएनपीए टाऊनशिप, सीआयएसएफ कॅम्पस, उरण, नवी मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर .गोविंद रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) तसेच भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमात सुमारे दहा हजार योगप्रेमी सहभागी होण्याची शक्यता असून, आयुष मंत्रालयाचे महासंचालक प्रो. रवीनारायण आचार्य यांची उपस्थिती राहणार आहेत.

योग दिनानिमित्त आयोजित होणारा हा उपक्रम आरोग्यप्रद जीवनशैलीचा संदेश देणारा ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना टी-शर्ट, रेनकोट, योगा मॅट मोफत वितरित करण्यात येणार आहे. असून अल्पपोहाराची ही सोय केली आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

योग संगम कार्यक्रमातून महाराष्ट्रात योग आणि हरित उपक्रमांना चालना

यावर्षी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने १० प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यात ‘योग संगम’ हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

या कार्यक्रमाअंतर्गत ‘हरित योग’ आणि ‘योगा पार्क’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वृक्षारोपणालाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून, केवळ जे.एन.पी.ए.मध्ये १ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. राज्यभरात योगप्रसारासाठी व्याख्याने, शिबिरे आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

आर.आर.ए.पी. संस्थेने या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन करत योगाची व्यापक घडी घातली असून, ‘योग संगम’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, निरोगी भारताच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असे मत संस्थेचे सहायक संचालक डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केले.

०००

मोहिनी राणे/ससं/

अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचा अंक प्रकाशित

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे २०२५ या अंकाचे प्रकाशन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव सुचिता महाडिक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकर, अवर सचिव (मावज) अजय भोसले, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लिहिलेल्या कथा, कविता, ललित लेख, सुलेखन मालिका, स्वानुभव, पाककला, भ्रमंती, तंत्रज्ञानाची टेकवारी, मिशन आयगॉट कर्मयोगी, वेव्हज, या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.

‘आपलं मंत्रालय’ वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा :

https://www.flipbookpdf.net/web/site/b0e9090b9e86355f811994004c4bfa975fb40900202506.pdf.html#page/3

https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:534b98de-2684-427b-ade2-a5788fff65d3

महासंवाद – https://mahasamvad.in/169708/

०००

अश्विनी पुजारी/ससं/

ताज्या बातम्या

जिल्ह्यात दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – पालक सचिव एकनाथ डवले

0
नाशिक, दि. १९ : राज्य शासनाने अलीकडेच दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे....

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार

0
सातारा दि. १९:  पाटण तालुक्यातील सळवे, ढेबेवाडी, पाटण मार्गावर जानुगडेवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी पाटण आगार बसचा अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी...

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी

0
मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) आज घेतलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश...

नोंदणी विधेयक मसुद्यात सुधारणेसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा

0
मुंबई, दि. १९ : नोंदणी विधेयक मसुदा २०२५ वर सुधारणा सुचविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यातील उपविभागीय...

निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा

0
मुंबई, दि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण...