शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 3

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतर्गत हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य व व्यावसायिक नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्था व कलाकारांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतात. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मिती खर्च देण्यात येतो. तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो.  गेली अनेक वर्ष राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्था व कलाकारांनी पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात वाढ करण्याबाबत मागणी केली होती. या मागणीचा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी सकारात्मक निर्णय घेऊन यामध्ये दुपटीने वाढ करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयातील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्ता इ. तील वाढीव रकमांचा लाभ ३ नोव्हेंबर, २०२५ पासून सुरु होणाऱ्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेपासून लागू होणार आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताशी दूरध्वनीवरून संवाद साधत तिला शुभेच्छा दिल्या.

या संभाषणात मंत्री कोकाटे यांनी महाराष्ट्राची हिरकणी असा संयुक्ताचा गौरव करत तिच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीनेही तिला शुभेच्छा दिल्या. संयुक्ताच्या पालकांसह प्रशिक्षक मानसी गावंडे आणि पूजा सुर्वे यांचेही अभिनंदन करण्यात आले. खेळासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांसाठी थेट फोन करण्याचे आवाहनही मंत्री कोकाटे यांनी केले.

संयुक्ता ही या जागतिक स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेली एकमेव जिमनॅस्ट असून ती पाचव्या वर्षापासून फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमीठाणे येथे प्रशिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूप्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूजा सुर्वे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.

आजवर संयुक्ताने  इंडिया युवा खेळराष्ट्रीय व इतर स्पर्धा मिळून १५० पदकं (१२५ सुवर्ण) जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ७ वा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवला आहे. याच स्पर्धेत मानसी गावंडे यांची भारताच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

किमया कार्लेचंही अभिनंदन

नव्या ऑलिंपिक सायकलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर २३ मार्क ओलांडणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट म्हणून किमया कार्ले हिचंही मंत्री कोकाटे यांनी अभिनंदन केलं. क्लुज-नापोका (रोमानिया) २०२५ क्लब स्पर्धेत किमयाने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. तिचं कौतुक करताना कोकाटे यांनी तिला रिदमिकची किमयागार अशी उपाधी दिली.

0000

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुंबई दि. २१ :- राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून SACHET platform चा वापर करून मागील ७ दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत SMS च्या माध्यमातून  पोहचवण्यात आले आहेत. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून (INCOIS) ठाणे, पालघर, या जिल्ह्यांना दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पर्यंत ३.० ते ३.७ मीटर तसेच, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पर्यंत २.७ ते ३.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी व रायगड जिल्ह्यातील अंबा, ठाणे जिल्ह्यातील काळू नदीने इशारा पातळी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुका मुळशी मौजे पडळघर, संभाव्य दरड प्रवण धोका असल्याने येथील ९ कुटुंब व रामनगर येथील २ कुटुंब अशी एकुण ११ कुटुंबे लवासा सिटी येथे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील ता. आंबेगाव मौजे घोडेगाव येथील घोडनदी काठी ५ व्यक्ती अडकले असता आपदा मित्रांनी रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. पुणे जिल्ह्यातील वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय येथील शिवणे नांदेडसिटी रस्ते, भिडे पुल रस्ते, रजपूत झोपडपट्टी ते मनपा मुख्यालय रस्ते सुरक्षेस्तव बंद करण्यात आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात मुखेड येथे भारतीय सैन्य दलाच्या ७२ जवानांच्या कंपनी मार्फत स्थलांतरित शिबिरात चिकीत्त्सा शिबीर लावले व ३८२ स्थलांतरित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा केली असून प्रशासनातर्फे आपत्ती नंतरच्या कामांना गती देण्याबाबत सूचित केले आहे.

अलमट्टी धरणाच्या विसर्गावर लक्ष

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून अलमट्टी धरणाच्या विसर्ग, (250000 क्युसेक्स) व येवा तसेच धरणाची पाणी पातळी व सांगली, कोल्हापूर, सातारा (ता. कराड) जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचण्याची स्थिती यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अलमट्टी धरणातील पाणी साठ्यामुळे फुगवटा तयार  होऊ नये यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. कोयना धरणातून ९३००० क्युसेक्स वरुन ८०००० क्युसेक्स, वारणा धरणातून ३८००० क्युसेक्स वरुण १३७०० क्युसेक्स एवढा विसर्ग कमी करून कृष्णा नदीवरील इतर धरणातून सुद्धा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच राधानगरी धरणातून २८६० क्युसेक्स एवढा विसर्ग  नदीपात्रात करण्यात आला असून पंचगंगा  नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे.  नागरिकांचे आवश्यक स्थलांतर करण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या आयर्विन पूल सांगली येथे कृष्णा नदीने धोका पातळी पार केली असून, विसर्ग कमी केल्याने सांगली जिल्ह्यातील पाणी फुगवटा आज दुपार पासून ओसरण्यास सुरुवात होईल. सांगली जिल्ह्यातील राज्यमार्ग ०७, प्रमुख जिल्हा मार्ग-१५, ग्रामीण मार्ग – ०८, इतर जिल्हा मार्ग ०१ इत्यादी रस्ते सुरक्षेस्तव बंद करण्यात आले असून पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. उजणी धरण १०० टक्के भरल्याने १३०००० क्युसेक्स एवढा जास्तीचा विसर्ग भीमा नदीत करण्यात आला असून भीमा नदी काठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्या आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड या ठिकानी पाणी फुगवटा झालेला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील नवजा-कोयनानगर पाबळनाला रस्ता खचल्याने आणि निसरे ते मारुल हवेली पूलावर पाणी वाहत असल्याने वाहतुक सुरक्षेस्तव बंद करण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नियोजन विभागाचे उपायुक्त विजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे नियोजन अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले, “युनिक पायाभूत सुविधा आयडी पोर्टल ही नवी संकल्पना असून या तंत्रज्ञानाचा वापर करून विकासकामांची सुसूत्रता, समतोल विकास व खर्चबचत साधता येणार आहे.”

राज्यात १ ऑक्टोबर २०२५ पासून प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक आयडी अनिवार्य असणार आहे. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, देयके, तसेच मंजुरीपासून अंमलबजावणी व देखभालपर्यंत सर्व माहिती या आयडीद्वारे ट्रॅक केली जाणार आहे.

प्रशिक्षणात नव्या सुविधेची नोंद पोर्टलवर कशी करायची, मॅपिंग पद्धती, कामांचे स्वरूप व निकषांनुसार नोंदणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र, नागपूरचे श्री. अभिजित व श्री. स्वराज यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण केले.

प्रास्ताविक उपायुक्त (नियोजन) विजय पवार यांनी केले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री. संजय पाटील, विभाग प्रमुख (मुंबई व पुणे), महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र यांनी पोर्टलच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी व प्रमुख यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले.

०००

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर, दि. २० :प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंत अधिकारी-कर्मचारी तसेच आदर्श ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांचा सन्मान सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त पापळकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला आस्थापना विभागाचे अपर आयुक्त राजेंद्र अहिरे, गटविकास अधिकारी राजेंद्र महाजन, कक्ष अधिकारी मिलिंद म्हस्के, दिलीप भूमरे, अनिल टेकाळे, सुवर्णा शिदे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

गुणवंत अधिकारी-कर्मचारी सन्मानित

मिलिंद पाराजीराव तुरूकमारे – विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद बीड

सुनील शिवाजीराव नवले – सहायक प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद बीड

मनोजकुमार मोहनराव येरोळे – सहायक लेखाधिकारी, जिल्हा परिषद लातूर

मण्मथ धोंडिबा मुक्तापुरे – कृषी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर

सचिन वैजनाथ काडवादे – कनिष्ठ प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद लातूर

आदर्श ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सन्मानित

शितल त्र्यंबकराव उमप – ग्रामसेवक, पोखरी (संभाजीनगर)

नंदकिशोर विनायकराव वानखेडे – ग्रामविकास अधिकारी, जालना

सुखदेव देवसिंग शेळके – ग्रामविकास अधिकारी, जालना

मधुकर मानसिंग मोरे – ग्रामसेवक, नांदेड

पुष्पा बालासाहेब काळे – ग्रामसेवक, परभणी

विजयसिंह विलासराव नलावडे – ग्रामविकास अधिकारी, धाराशिव

धनंजय रामराव भोसले – ग्रामसेवक, लातूर

गोपीनाथ भीमराव इंगोले – ग्रामसेवक, हिंगोली

०००

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

  •  पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या
  • संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश

यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी पुरस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्र्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री वॅाररुममधून दुरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्याच्या पुरस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस यवतमाळ येथून जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह पाटबंधारे, जलसंपदा, बांधकाम, वीज वितरण, जलसंधारण आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

गेले दोन दिवस जिल्ह्यात सतत पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतेक महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली झाली आहे. काही ठिकाणी शेती व घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने शेतीपिके, शेतजमीनींचे पंचनामे केले पाहिजे. पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील काही धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आवक झाली आहे. त्यामुळे या धरणांमधून पाणी सोडणे आवश्यक असल्यास रात्रीच्यावेळी न सोडता दिवसा सोडावे. त्यापुर्वी नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्या. नदी, नाल्याच्या शेजारी असलेल्या शेतांचे देखील नुकसान झाले आहे. अशा नुकसानीचे देखील पंचनामे करण्यात यावे. काही ठिकाणी वीज पुरवठा बाधित झाल्याच्या तक्रारी आहे, अशा ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पुरस्थितीमुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असल्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पाण्यात ब्लिचिंग पावडर सोडण्यात यावी. पाणी स्त्रोत जास्त दूषित असल्यास पिण्याच्या पाण्याचा तात्पुरत्या स्वरुपात टॅंकरने पुरवठा करण्यात यावा. ज्या ठिकाणी गावांचा संपर्क तुटला होता, अशा गावात रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

घरे, जनावरांचे नुकसान किंवा पुरस्थितीत जिवीत हाणी झाल्यास शासनाकडून तातडीने सानुग्रह अनुदान दिले जाते. अशा मदतीचे वाटप तातडीने करण्यात यावे. पुरस्थितीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी शवविच्छेदन अहवाल तातडीने प्राप्त करून घेण्यात यावे. सद्या पुरस्थितीचे दिवस असल्याने विभाग, तालुका व गावस्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडू नये, सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती नियंत्रणासाठी काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचेही सर्व्हे करा

अतिवृष्टीत शेतपिके, शेतजमीनी, घरांची पडझड, जनावरांचे नुकसान होते. आपण नेहमी अशाच नुकसानीचे सर्वेक्षण करतो. त्यामुळे शासकीय मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनस्तरावरून मदत मिळत नाही. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करतांना शासकीय रस्ते, वीज खांब कोलमडने, तारा तुटने, पाणी पुरवठा योजना, शासकीय ईमारतींच्या नुकसानीचे देखील सर्वेक्षण करून अहवाल शासनास सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.

जिल्ह्यात 90 हजार हेक्टर पिकांचे नुकसान

जिल्ह्यात दि.15 जुनपासून आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 640 गावे व 1 लाख 34 हजार शेतकरी बाधित झाले आहे.  या शेतकऱ्यांचे 90 हजार 924 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधित 47 हजार 560 हेक्टर नुकसान एकट्या उमरखेड तालुक्यात झाले. त्यापाठोपाठ महागाव 17 हजार 934 व पुसद तालुक्यात 14 हजार 736 हेक्टरवर नुकसान झाले आहे. वीज पडून एका तर पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. पुरस्थितीत 45 जनावरे दगावली तर 250 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे

०००

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या हेतूने कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित नागरिक, तसेच, दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.

राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे. जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तिंच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरिता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

विविध आपत्तीतील आपद्ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा प्रमुख उद्देश असला तरी, नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त खालील विविध बाबींकरिता निधीचा विनियोग करण्यात येत असतो.

नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी, पूर व भूकंप इत्यादी.) राज्यात तसेच देशात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांकरिता वेळोवेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्यात येते.

जातीय दंगल व बॉम्बस्फोट इत्यादी आपत्तीमध्ये शासनाच्या योजनेतून नियमानुसार देण्यात आलेल्या मदती व्यतिरीक्त अशा प्रकरणी मा. मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसहाय्याची अनुकुलता दर्शविली असेल तर, आपद्ग्रस्तांना मदत होण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.

अपघातामुळे कुटुंबातील कर्ता व्यक्ती मृत पावल्यास, ज्यांना कोणत्याही प्रकारे विमा संरक्षण नाही तसेच शासनाकडून किंवा शासनाच्या अन्य योजनामधून आर्थिक मदत मिळालेली नाही, अशा प्रकरणी अर्थसहाय्य दिले जाते. अशा प्रकरणांमध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांच्या शिफारसीसह सविस्तर अहवाल व पोलीस पंचानामा (एफआय आर), शव विच्छेदन अहवाल व मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करुन घेऊन अर्थसहाय्याचे प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या आदेशार्थ सादर करण्यात येतात. मदत निधी योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. मदत थेट प्राप्तकर्त्याला प्रदान केली जाणार नाही.

याशिवाय, वित्तमालाचे नुकसान झाल्यास पंचनाम्यानुसार नुकसानीच्या प्रमाणात रक्कम रूपये तीन हजार ते वीस हजार या दरम्यान अर्थसहाय्य देण्यात येते. अशा प्रकरणामध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांचा स्वयंस्पष्ट अहवाल, महसूल अधिकारी यांनी साक्षांकित केलेला नुकसानीचा पंचनामा आणि बाधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचा तपशील आदि कागदपत्रांची पूर्तता संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून करून घेण्यात येते.

याचबरोबर रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या राज्यातील गरजू व गरीब रूग्णांवरील शस्त्रक्रिया/उपचारासाठी निधीतून अंशत: अर्थसहाय्य रुग्णालयाचे नावे प्रदान केले जाते. यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खासगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च एक लाखाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे), राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रेशन कार्ड / रहिवासी दाखला/ आधार कार्ड क्रमांक, तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न रु. एक  लाखापेक्षा कमी असल्याबाबत), नोंदणीकृत भ्रमणध्वणी क्रमांक, आमदार/खासदारांचे शिफारस पत्र, रुग्णालयास प्रदानाबाबत तपशील, यामध्ये बँक खाते क्रमांक, रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा, रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव, आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर, रुग्णालयाचा ई-मेल, सदर मदत ही प्रत्येक रुग्णास ३ वर्षातून एकदा देण्यात येईल. उपरोक्त गोष्टींची पूर्तता केल्यानंतर खालील प्रमाणे अंशत: अर्थसहाय्य करण्यात येते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगीही देता येते. सदर अर्थसहाय्य कलम 80 (जी) अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधिमध्ये जमा केलेली रक्कम ही आयकर सूट घेण्यास पात्र आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ख़ालीलप्रमाणे योगदान केले जाऊ शकते :

मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई, येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या नावे पोस्टल ऑर्डर/ मनी ऑर्डर द्वारे माध्यमातून, धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात, किंवा https://cmrf.maharashtra.gov.in  या पोर्टलवर ऑनलाईन भरणा करता येतो. किंवा धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक / शाखेतून आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या चलनमध्ये दाता तपशील उल्लेख करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी एसबीआय संकलन शाखा जमा मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या नावे करावी. चेक किंवा डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक / शाखेतून आरटिजीएस किंवा एनईएफटी द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या चलन मध्ये दाता तपशील उल्लेख करून मुख्यमंत्री रिलीफ फंड एसबीआय संकलन शाखा जमा मुख्यमंत्री रिलीफ फंडच्या नावे करावी.

नाव आणि या संकलन बँकेच्या नोडल शाखा पत्ता   –

फंडाचे नाव          बँकेचे नाव     A/c क्रमांक          आयएफएससी कोड  

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (मुख्य खाते)    स्टेट बँक ऑफ इंडिया     खाते क्र. 10972433751     IFSC Code SBIN0000300

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असून, यामुळे हजारो गरजूंना नवसंजीवनी मिळत आहे. हा यशस्वी उपक्रम जनतेच्या हितासाठी सुरू आहे.

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

माहितीस्त्रोत – मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे संकेतस्थळ

00000

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

  • ३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आला असून, या कक्षामार्फत गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी पैशाची चणचण भासते. त्यामुळे बरेचदा रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक वेळेत उपचार घेऊ शकत नाहीत. अशावेळी कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचार न घेता परत जाता कामा नये. त्याच्यावर वेळेत उपचार व्हावेत आणि त्याचा जीव वाचावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कक्षाची स्थापना केली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना आणि पर्यायाने त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे. आजकाल दैनंदिन आयुष्यात अनेकदा आरोग्यपूर्ण जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. अनेकदा एखाद्या कुटुंबावर अचानक गंभीर आजाराचा, अपघाताचा आघात होतो. रुग्णासह संपूर्ण कुटुंबाचा धीर खचून जातो. अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.

या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज राहिली नसून प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाची स्थापना 1 मे 2025 पासून करण्यात आली आहे. रुग्णांना आता त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात उपचारासाठी मदतीसाठी अर्ज करता येणार असून, अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहितीसुद्धा त्यांच्या जिल्ह्याच्या कक्षात मिळणार आहे.

हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. येथे डॉ. नामदेव कोरडे हे कार्यरत असून, या कक्षामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत या निधीच्या माध्यमातून 30 रुग्णांना मदत केली आहे. यासाठी 23 लक्ष रुपयांचा निधी गेल्या 3 महिन्यात वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय हिंगोली कक्षाच्यावतीने दिली आहे.

शामराव किशनराव सूर्यवंशी हे हिंगोली जिल्ह्यातील शेवाळा (ता.कळमनुरी) येथील रहिवाशी आहेत. ते व्यवसायाने शेतकरी असून, नेहमीप्रमाणे ते, त्यांचा भाऊ आणि मुलगा असे तिघेजण 23 जून 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शेतीकाम करून घराकडे परतत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला व पायाला मार लागला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शामराव सूर्यवंशी यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील तुकामाई हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी ते एकसारखी बडबड करत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुढील तपासणी केली असता, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचे निदान झाले. पुढील उपचाराठी यशोसाई रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा मुलगा अविनाश याने हिंगोली येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे अर्ज दाखल केला.

त्यामुळे त्यांना 70 हजार रुपयांची मदत झाल्याचे सांगत त्यांचा मुलगा अविनाश सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि राज्य शासनाने आभार मानले आहेत. केवळ 2 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना नाकीनऊ येत असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामुळे माझ्या वडिलाचा जीव वाचला असल्याचा आनंद अविनाश सूर्यवंशी यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

सध्या वडील शामराव सूर्यवंशी यांच्यावर घरी औषधोपचार सुरु असून, लवकरच ते पूर्ववत आपले दैनंदिन जीवन जगण्याचा आनंद घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. अविनाश याने महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मदत मिळाल्यामुळे त्यांच्या वडिलांचा जीव वाचला, याबाबत त्यांनी मनापासून आभार मानले. गरजू व पात्र लाभार्थ्यांना या मदतीमुळे खूप मोठा आधार मिळत असून ही मदत गरजू रुग्णांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरत आहे.

  • संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शासनाकडे सुपूर्द

पुणे, दि.२०:  संवेदना, संवेदनशीलता आणि सहवेदना यांचे वेगवेगळे प्रकार असले तरी त्यामध्ये कलाकृती, चित्रकला यांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रयत्न असून दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती शासनाकडे सुपूर्द करणे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांच्या १३९ कलाकृती मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी शासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या, यावेळी ते बोलत होते.  शासनाच्यावतीने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि स्मीता परांजपे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

ॲड.शेलार म्हणाले, ज्याप्रमाणे ‘एआय’ महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे ‘सीआय’ म्हणजेच क्रिएटिव्हिटी महत्त्वाची आहे. त्यामुळे रवी परांजपे यांच्या कलाकृती शासनाकडे योग्य पद्धतीने जतन करून शासनाच्या अधिनस्त असलेल्या विविध संग्रहालयांमध्ये जनसामान्यांना पाहण्याकरिता राज्यभर प्रदर्शित करण्यात येतील. या कलाकृतींमधून योग्य संदेश राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. चित्रसाक्षरता हा विषय महत्त्वाचा असून इतका मौल्यवान ठेवा शासनाकडे सुपूर्द केल्याबद्दल मंत्री शेलार यांनी परांजपे कुटुंबियांना धन्यवाद दिले.

दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांनी साकारलेल्या ७२ मूळ पेंटिग्ज आणि ६७ फ्रेम आर्ट वर्क अशा एकूण १३९ चित्र कलाकृती महाराष्ट्र शासनास सुपूर्त करण्याची इच्छा दिवंगत रवी परांजपे यांच्या पत्नी स्मीता‍ परांजपे यांनी व्यक्त केली होती. या कलाकृती स्विकारण्यास व यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास सांस्कृतिक कार्य विभागाच्या १७ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या कलाकृती  २६ जून २०२३ रोजी पुरातत्व संचालनालयाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. सध्या त्या सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत. नंतर या चित्र कलाकृतींमधील मोठा भाग मुंबई येथील नियोजित महाराष्ट्र राज्य वस्तुसंग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

०००

जिल्ह्यातील शेतमालाच्या नुकसानीचा पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्याकडून आढावा

चंद्रपूर, दि. २०: गत आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. तसेच नुकसानग्रस्त शेतमालाचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. सोबतच वर्धा, वैनगंगा, पैनगंगा नद्या दुधडी भरून वाहत असून इतर जिल्ह्यातील पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली, तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 130 गावांना पुराचा फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार 1378 हेक्टर क्षेत्रावर शेतमालाचे नुकसान झाले आहे. यात धान 80 हेक्टर, कापूस 1139 हेक्टर, सोयाबीन 135 हेक्टर, तूर 8 हेक्टर, भाजीपाल्याचे 15 हेक्टर वर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त बाधित एकूण शेतक-यांची संख्या 4038 आहे. पंचनामे झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढू शकतो, असे कृषी विभागाने कळविले आहे.

०००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...