सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 4

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. 25:  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी  श्री. पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केली.

यावेळी अधिकारी कक्ष, आवक जावक बारनिशी, सी.सी.टीव्हि, वायरलेस, डे-बुक, मुद्देमाल कारकून कक्ष,तपास पथक कक्ष, हिरकणी कक्ष, पुरुष व महिला विश्रांती कक्ष, खेळाचे मैदान, बैठक कक्ष, प्रसाधन गृह, आदी कक्षांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नवीन विकासकामांची माहिती देण्यात आली.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार-उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. : 25: जिल्ह्यातील पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी 31 मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे,  दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील कांबळे, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, शंकर जगताप,  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,  पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण,  जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधी विकास कामांची माहिती 15 मे पर्यंत प्रशासनाकडे सादर करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी 31 मे अखेर प्रशासकीय मान्यता घेवून पुढील कार्यवाही डिसेंबरअखेर पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होईल याकडे लक्ष द्यावे.  गडकिल्ले, पर्यटनस्थळे आदी ठिकाणे पर्यटकांना सुरक्षित वाटली पाहिजे, याकरीता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे.

नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. लोकप्रतिनिधी सूचित केलेल्या सूचना, तक्रारीचे दखल घेत त्यांना विश्वासात घेवून त्या निकाली काढाव्यात. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसारखा निधी दिला जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णालयात विविध आजाराकरीता उपचारासाठीची लागणारी पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे.  या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याकामी जिल्हाप्रशासन, महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे,असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. पाटील, मंत्री श्री. भरणे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, श्रीमती गोऱ्हे यांच्यासह आमदार यांनी विविध सूचना केल्या.

यावेळी जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या सर्वसाधारण योजनेसाठी १ हजार ३७९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १४५ कोटी रुपये आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ६५ कोटी ४६ लाख रुपये या प्रमाणे एकूण १ हजार ५८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे माहिती जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनीही प्रस्तावित योजना व तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद आणि आयुका संस्थेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आयुका, नासा व इस्त्रो या संस्थेस भेटीबाबत मदत करण्यासोबतच तेथील कामकाजाबाबत माहिती व शास्त्रज्ञाच्या भेटीबाबत सामंजस्य करार करण्यात आला.  तसेच  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘वॉर्ड हेल्थ ॲक्शन प्लॅन’चे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीत सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली.

बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

आदिवासी उपयोजना आढावा बैठक

शेतकऱ्यांना बोअरवेल हा आपल्यासाठी सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल

गडचिरोली, (जिमाका) दि.25: आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज गडचिरोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत 2024-25 च्या खर्चाचा आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार रामदास मसराम, प्रभारी पोलीस अधीक्षक आतिश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (भामरागड), जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन मडावी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मंत्री डॉ. अशोक उईके यांनी वनहक्क कायद्यानुसार सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा देण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले, जेणेकरून या पट्टाधारकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. मंत्री अशोक उईके यांनी यावेळी सांगितले की ज्या गावात वीज नाही त्या प्रत्येक गावात वीज पोहचविण्याचे आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री वीज कनेक्शन योजना गडचिरोली जिल्ह्यापासून राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. घरकुलाचा आढावा घेतांना त्यांनी प्रधानमंत्री जनमन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सांगितले. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचाराची सुविधा असलेल्या दवाखाण्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे व त्याच प्रचार प्रसार करण्याच्या सूचना मंत्री उईके यांनी आरोग्य विभागाला दिल्या. गडचिरोली जिल्ह्यचे पालकत्व मुख्यमंत्री महोदयांकडे आहे आणि या जिल्ह्यातील एकही गाव रस्त्यापासून वंचित राहू नये यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देवू असे ते म्हणाले.

राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी आदिवासी मानसाच्या जीवणात बदल घडवणाऱ्या योजनांसाठीच आदिवासी उपयोजनेचा निधी मंजूर करण्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात विशेष बाब म्हणून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत आठ हजार बोअरवेल सोलर सह देण्याचा शासनाचा मानस असून यासाठी कृषी विभागाने व्यापक प्रसिद्ध करण्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी हा विषय सवोच्च प्राथमिकतेचा असल्याचे ते म्हणाले. घरकुलाच्या लाभार्थ्यांना रेती मोफत देण्याचा शासनाचा निर्णय आहे, गटविकास अधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना घरकुल लाभार्थ्यांची यादी द्यावी व प्रशासनाने लाभार्थ्यांना घरपोच रॉयल्टीची रेती पोहचवून द्यावी, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रेती नसल्याने घरकुलाचे काम थांबले तर प्रशासनाची जबाबदारी राहील असे त्यांनी सांगितले. जलजीवनच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगून मी आकस्मिक भेट देवून कामाची पाहणी करणार व अनियमितता आढळल्यास पोलीस एफ.आय.आर. दाखल करेल असे श्री जयस्वाल यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी नवीन वाळू धोरण अंमलबजावणीबाबत विचारणा करून आदिवासी शाळेत चांगले प्रसाधनगृह तयार करण्याचे तर आ. मसराम यांनी विद्यार्थ्यांना शाळेत जेवणासाठी शेड निर्माण करण्याची पिण्याचे पाणी उपलब्धतेसाठी मागणी केली

पत्रकार परिषदेत धान्य घोटाळ्याबाबत मंत्री अशोक उईके यांना विचारणा केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देवून याबाबत 30 एप्रिल च्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

पुणे, दि.२५: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या पर्यटकांच्या कुटुंबियांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्यशासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा धीर त्यांनी दिला.

यावेळी स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा कुणाल गणबोटे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
0000

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

मुंबई दि. 25 :  मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या कालावधीत विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमामध्ये हँडबॉल, बास्केटबॉल, वुशू, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि फुटबॉल या खेळांचा समावेश आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

प्रशिक्षण स्थळे आणि वेळा पुढीलप्रमाणे:

बास्केटबॉल: जिकेपी बास्केटबॉल कोर्ट, आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथे सायंकाळी ४.४५ ते ६.००

हँडबॉल: विभागीय क्रीडा संकुल, चिकूवाडी, मुंबई पब्लिक स्कूलसमोर, सायंकाळी ४ ते ६

फुटबॉल: होली पब्लिक स्कूल, अंधेरी येथे सायंकाळी ४ ते ६

पॉवरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंग: फिटनेस पॉईंट जिम, भांडूप पश्चिम येथे दुपारी ३ ते ६

वुशू: श्री नारायण गुरु हायस्कूल, चेंबूर व एस.आय.इ.एस., घाटकोपर येथे दुपारी १२.३० ते १.३०

शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, भक्ती आंब्रे, क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मनिषा गारगोटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  मनिषा गारगोटे – ८२०८३७२०३४, श्रीमती प्रीती टेमघरे – ९०२९०५०२६८ यांना संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

0000

श्रीमती श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

‘माहिती व जनसंपर्क’मधील नवनियुक्त उपसंचालकांचा प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार

मुंबई दि 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पदोन्नतीने नियुक्त झालेल्या उपसंचालक (माहिती) यांचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) श्री. र.बा.गिते, उपसंचालक (माहिती) श्री. देवेंद्र लक्ष्मण पाटील, उपसंचालक (माहिती) श्रीमती मीनल शशिकांत जोगळेकर, उपसंचालक (माहिती) श्रीमती कीर्ती प्र. मोहरील-पांडे आणि उपसंचालक (माहिती) श्रीमती वर्षा संतोष आंधळे या नवनियुक्त उपसंचालकांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर येथील विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) श्री. प्रविण टाके व पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) पदावर श्री. किरण मोघे यांची नियुक्ती झाली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सर्व उपसंचालकपदी नवनियुक्त अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व संघभावनेने कार्य करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कार्य अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

यावेळी संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) ( वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे उपस्थित होते.

0000

‘वेव्हज २०२५’ :  माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

देशातील माध्यम व मनोरंजन (Media & Entertainment) क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘WAVES 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. १ मे रोजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

१ ते ४ मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमीकडे वाटचाल

बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ‘क्रिएटर हब’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असून, जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला दिशा देणारा मंच

‘WAVES 2025’ ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यम व मनोरंजन (M&E)  उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनास चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.

या परिषदेतील एक विशेष आकर्षण ‘WAVES बाजार

‘WAVES बाजार’ – एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून जिथे खरेदीदार आणि विक्रेते थेट संवाद साधू शकतात. नव्या प्रकल्पांची ओळख, सर्जनशील कल्पना, आणि गुंतवणुकीच्या संधी येथे उपलब्ध होतील. विशेषतः, श्रेणीआधारित शोध प्रणाली आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधांमुळे व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील.

परिषदेत काय असणार?

१. परिषद सत्रे – जागतिक उद्योग नेते, विचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

२. मीडिया मार्केटप्लेस – भारताच्या माध्यम व मनोरंजन (M&E) क्षेत्रातील वैविध्य, क्षमता आणि नवकल्पनांचे आकर्षक प्रदर्शन.

३. तंत्रज्ञान प्रदर्शन – नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचे लाईव्ह डेमो.

४. सांस्कृतिक कार्यक्रम – भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम.

‘WAVES 2025’ : उद्योगाला बळकटी देणारी संजीवनी

माध्यम आणि मनोरंजन उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. ‘WAVES 2025’ ही परिषद नव्या कल्पनांना दिशा देऊन, भारताला जागतिक M&E सुपरपॉवर बनवण्याचा पाया रचणार आहे. सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा मेळ घालून, भारताला ‘ग्लोबल कंटेंट डेस्टिनेशन’ बनवण्याचे स्वप्न या मंचाद्वारे प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी ही परिषद भारताच्या सृजनशील भविष्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे.

००००

  • वर्षा फडके-आंधळे,उपसंचालक (वृत्त)

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच भारतीय समाजव्यवस्था उभी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 25 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच भारतीय समाजव्यवस्थेची भक्कम रचना उभी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. लंडनमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘न्याय, समानता आणि लोकशाहीची पूर्वकल्पना- जागतिक दृष्टिकोन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित होते.

ही आंतरराष्ट्रीय परिषद बार्टी, ग्रेस इन सोसायटी, लंडन, मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये जगभरातील नामवंत अभ्यासकांनी सहभाग घेतला.या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे संशोधन प्रबंध प्रसिध्द करण्यात आले.  यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे उपस्थित होते.

000000

शैलजा पाटील/विसंअ

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासन पोलीस विभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदी उपस्थित होते.

या नवीन वास्तूच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वास्तूमधून पारदर्शक कारभार करुन येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक सेवा देण्याचे काम करावे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. चौबे यांनी पोलीस ठाण्याविषयी माहिती दिली.
0000

२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

मुंबई, २५ एप्रिल : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल.

दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून महाराष्ट्रातील 416 पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवाय, सुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतील, तसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

००००

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...