शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 4

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना धरण जलाशयात जलपूजन

सातारा दि. २०: कोयना धरणात 96.38 टक्के  टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणातील जलाशयातील जलपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कोयना धरणस्थळी झालेल्या जलपुजन कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता महेश रासनकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई यांनी कोयना धरणातील जलाचे विधिवत पूजन करून ओटी भरण केले. यावेळी ते म्हणाले, कोयना धरणास महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये, संपन्नतेमध्ये या धरणाचा फार मोलाचा वाटा आहे. आज परंपरेने रितीरिवाजाप्रमाणे प्रशासनास घेऊन जलपूजन करत असताना सध्या धरणात 101 टीएमसी पाणीसाठा आहे. पाण्याचा 99000 क्युसेक्सने विसर्गही सुरू आहे.  कोयना धरण हे 100 टीएमसीच्यावर भरल्याने कोयनामाईची अशीच कृपा संपूर्ण महाराष्ट्रावर व्हावी, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र व्हावा, पाण्याची टंचाई भासू नये, मुबलक वीज निर्मिती व्हावी, यासाठी कोयनामाईचे पूजन करण्यात आल्याची भावनाही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.

धरण क्षेत्रात पाऊस होत असला तरी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, पूर परिस्थितीवर आवश्यक ती उचित कार्यवाही करण्याच्या प्रशासनास सूचना देण्यात आली आहे. कोयना भागातील व पाटण मधील काही कुटुंबांना स्थलांतरण करावे लागले आहे. स्थलांतरणानंतर त्यांच्या निवाऱ्याची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोय, अंथरुन पांघरुनाची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. पोलीस पाटील, तलाठी, मंडलधिकारी, ग्रामसेवक यांना आपल्या गावात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड, सातारा, वाई, जावली या ठिकाणी भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावाही घेणार असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

०००

लोकसंस्कृतीच्या जतनासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करा –राज्यपाल हरिभाऊ बागडे

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका): लोकसंस्कृतीचे जतन आणि  संवर्धन करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कला आणि संस्कृतीचे संस्कार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करा, असे आवाहन राजस्थानचे  राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी केले.

केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘वारसा सह्याद्रीचा’ कार्यक्रमाच्या समारोप समारंभात सांगितले.

राज्यपाल बागडे म्हणाले की, शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या कलेचा वारसा विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक आहे.यामुळे लोककलांना प्रोत्साहन मिळेल. तसेच नवीन लोककलाकार तयार होतील. हे व्यासपीठ म्हणजे आपल्या प्राचीन लोककलांना जिवंत ठेवणारे माध्यम ठरू शकते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोककलांमधून संस्कृती दर्शनही घडते. विविध संस्कृतीतून वेगवेगळ्या कलांची माहिती होते. त्यातून एकतेची संस्कृती तयार होते. भारताचे वैविध्य व त्यातून एकता हे वैशिष्ट्य आहे. ते म्हणाले ,भारताला कोणीही गुलाम बनवू शकत नाही, कारण येथे एकतेची संस्कृती आहे. ही संस्कृती अखंड राहिली तर कोणीही भारताकडे वाईट नजरेने पाहू शकणार नाही. शिक्षण घेत असताना काही बदल स्वीकारण्याची गरज व्यक्त करत भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धतीमधील काही गोष्टीचा समावेश केल्याने त्याचे फायदे आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांनी अशा महोत्सवांचे आयोजन केल्याबद्दल केंद्राचे संचालक फुरकान खान आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे सहसंचालक श्रीराम पांडे, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक फुरकान खान, एमआयटीचे संचालक मुनिश शर्मा यांच्यासह विद्यार्थी, नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली.  मोहिता दीक्षित आणि मिलिंद रमेश कुलकर्णी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

छत्रपती संभाजीनगरकर लोकनृत्यावर थिरकले

‘वारसा सह्याद्रीचा’ मध्ये 7 राज्यातील २३५ कलाकारांचा सहभाग, सात राज्यांच्या लोककला आणि संस्कृतीचा अनोखा संगम  विविध राज्यांतील वाद्यांची संगीतमय सिम्फनी व लोकनृत्यांवर छत्रपती संभाजीनगरचे रसिक थिकरले. तर विख्यात नृत्यांगणा शमा भाटे यांचे ‘कृष्णा द लिबरेटर’ हे कथ्थक आणि प्रमिला सूर्यवंशी यांच्या लावणीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.

कार्यक्रमात महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, राजस्थान, मणिपूर, पंजाब आणि पश्चिम बंगाल या 7 राज्यातील 235 कलाकारांनी लोककला सादर केली. दोन्ही दिवस महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

नृत्यांगना शमा भाटे आणि संचाने ‘कृष्णा द लिबरेटर’ हे कथ्थक बॅले सादर केले. यात श्रीकृष्णाच्या संकटमुक्तीच्या प्रसंगांना बारकाईने उलगडण्यात आले. भाटे यांच्या दिग्दर्शनाखाली आणि अमीरा पाटणकर व अवनी गद्रे यांच्या नेतृत्वात 14 नृत्यांगनांनी मनमोहक भावमुद्रा आणि आनंदित तालबद्धतेने सादरीकरणाला वेगळ्या उंचीवर नेले.  कालियामर्दन, गोवर्धन पर्वत उचलणे, कंस वध, माखन चोरी, गोपी वस्त्रहरण यांसारखे प्रसंग दाखवत गोप-गोपिकांसह सर्वांना संकटातून मुक्त करून निर्भयपणे जगण्याचा संदेश दिला. त्यांनी श्रीकृष्णाचे पर्यावरण प्रेम आणि रूढीवादविरोधी स्वरूपही बारकाईने व्यक्त केले. प्रमिला सूर्यवंशी यांच्या लावणीने महोत्सवात रंग भरले. वेगवान संगीत आणि तालावर थिरकणाऱ्या प्रमिला यांच्या भावमुद्रांनी अस्सल मराठमोळ्या अदाकारीने रसिक मनाला स्पर्श केला.

‘डेझर्ट सिम्फनी’ या लोकनृत्याच्या सादरीकरणात राजस्थानचे लोकवाद्य खरताल, पुंगी (बीन), चौतारा, कामायचा, सारंगी, मटका, बाजा, ढोलक, मोरचंग यांच्यासह कच्छची वीणा, जोडिया पावा, गमेलू, मंजीरा आणि महाराष्ट्राची नाळ आणि तुतारी यांच्या अनोख्या संगीतमय मिश्रणाने श्रोते थक्क झाले. यानंतर, संतोष नायर यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या नृत्य सादरीकरणात गोंधळ, गोव्याचे समई नृत्य, लावणी, राजस्थानचे चरी व कालबेलिया, गुजरातचे राठवा आणि सिद्दी धमाल, मणिपूरचे पुंग ढोल चोलम, पश्चिम बंगालचे पुरूलियाचे नटुआ आणि पंजाबच्या भांगडाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सादरीकरणादरम्यान हॉल अनेकदा टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला.

विविध राज्यांमध्ये अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करून एका राज्याची लोकसंस्कृती दुसऱ्या राज्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होते असे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे संचालक फुरकान खान म्हणाले. तर छत्रपती संभाजीनगरातील प्रेक्षकांना 7 राज्यातील सांस्कृतिक वैविध्य एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी देणारा हा अविस्मरणीय असा सांस्कृतिक सोहळा ठरल्याचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे  सहायक संचालक (वित्त एवं लेखा) दुर्गेश चांदवानी आणि कार्यक्रम अधिकारी हेमंत मेहता म्हणाले.

०००

 

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाटण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

सातारा दि. २०: सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पाटण तालुक्यातील पाटण, हेळवाक येथील पूर परिस्थितीचे व नवजा कडे खचलेला रस्ता यांची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी पाटण नगरपंचायतीमधील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व जुनिअर कॉलेज या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन त्यांनाही दिलासा दिला.

पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना निवाऱ्यासह सर्व सोयी उपलब्ध करून दिलासा देण्याच्या सूचना केल्या.

याप्रसंगी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्तांशी पालकमंत्र्यांचा संवाद

पाटण येथील पूरग्रस्तांना कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल मध्ये 34 कुटुंबांना निवारा उपलब्ध करून दिला आहे. या पूरग्रस्तांशी पालकमंत्री देसाई यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.

पूरग्रस्त स्थलांतरितांना जेवण, अंथरून पांघरून, चहा, नाश्ता वेळेवर  मिळाला आहे ना,  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था यांची व्यक्तीशः चौकशी पालकमंत्री देसाई यांनी केली.

या ठिकाणी स्थलांतरित असलेल्या अनेकांनी आपल्याला राहायला घर नसल्याची कैफियत मांडली. स्थलांतरितांपैकी ज्यांना हक्काचा निवारा नाही अशांनी घर देण्याची विनंती केली. यावर त्यांच्या समस्या जाणून घेत पालकमंत्री देसाई यांनी पाटण नगरपंचायत क्षेत्रात वर्षानुवर्षे राहत असलेल्या व ज्यांना घर नाही अशा पूरग्रस्तांची यादी तयार करावी, यादीनुसार घरांच्या कामासाठी जागा व वसाहतीसाठी निधीही उपलब्ध देण्यात येईल अशी ग्वाही दिली. शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांडूनही पाटण तालुक्यातील विविध पूरग्रस्त भागाची पाहणी

पाटण, नावडी व तांमकडे या गावातील पूर परिस्थितीची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणी केली. पुरामुळे कुठल्याही गावाचा संपर्क तुटणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रांताधिकारी व तहसिलदारांना केल्या. पूर परिस्थितीमुळे कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना करून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ज्या गावांमध्ये धरणातील विसर्गामुळे दूषित पाणी येत आहे अशा गावातील नागरिकांनी इतर स्त्रोतातून पाणी पिण्यासाठी उपयोग करावा व पाणी उकळून प्यावे. स्थलांतरित नागरिकांची जिल्हाधिकारी यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच कोणाला आरोग्य विषयी समस्या असल्यास त्यांनी या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. त्यांना उपचार दिले जातील असे सांगितले. पूरग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून वेळेवर चहा, नाश्ता, जेवण मिळत असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.

०००

कुपोषणाविरुद्ध गडचिरोलीत ‘गिफ्टमिल्क’चा यशस्वी प्रयोग

गडचिरोली, दि. २० (जिमाका): गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मुलांना रोज मिळणाऱ्या पौष्टिक दुधामुळे त्यांचे आरोग्य व आयुष्य सकारात्मक दिशेने बदलत आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या ‘गिफ्टमिल्क’ कार्यक्रमामुळे कुपोषणाशी लढा सोपा झाला असून शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक विकासाला चालना मिळाली आहे.

हा उपक्रम माझगाव डॉक लिमिटेडने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या ‘फाऊंडेशन फॉर न्यूट्रिशन’च्या माध्यमातून हाती घेतला आहे. गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दररोज २०० मिली फ्लेव्हरयुक्त दूध दिले जात असून, ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण कमी करण्याबरोबरच शाळेत हजेरी वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मागील वर्षी धानोरा, कुरखेडा, देसाईगंज व कोरची तालुक्यातील ४७२ शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. यातून इयत्ता पहिली ते पाचवीच्या १६ हजार ६१८ व इयत्ता सहावी ते आठवीच्या ४ हजार १७० अशा एकूण २० हजार ८८८ विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळाला. यावर्षी हा उपक्रम आरमोरी तालुक्यातील १२४ शाळांमध्ये राबविण्यात येत असून सप्टेंबरपासून ९ हजार ३३७ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

शालेय प्रशासन व पालकांच्या मते, या योजनेमुळे मुलांची आरोग्यस्थिती सुधारली असून शाळेत नियमित उपस्थिती वाढली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात गडचिरोली जिल्ह्यात व्यापक स्वरूपात तो राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेली माझगाव डॉक लिमिटेड ही जहाजबांधणी कंपनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रांत सामाजिक जबाबदारी पार पाडत असून, ‘गिफ्टमिल्क’ हा त्यांचा गडचिरोलीसाठीचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

०००

‘समृद्धी’च्या धर्तीवर नांदेड-जालना मार्गासाठी मोबदला देण्याच्या पर्यायाचा विचार करावा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २० : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठीही जमीन संपादनाचा मोबदला निश्चित करण्याच्या पर्यायाचा विचार केला जावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

जालना जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. तर आमदार सर्वश्री अर्जुन खोतकर, नारायण कुचे, कैलास गौरंट्याल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत समृद्धी महामार्गासाठी जमीन मूल्यांकन, झाडे व घरांची नुकसान भरपाई आणि झोपड्यांचे नियमितीकरण आदी मुद्यांवर देखील चर्चा करण्यात आली.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी जो दर देण्यात आला त्याचा अभ्यास करुन तो दर देणे शक्य आहे का ते पाहावे, अथवा रेडीरेकनरच्या दरानुसार अधिसूचनेच्या आधीच्या तीन वर्षात खरेदीखताचा जो सर्वाधिक दर असेल तो गृहीत धरुन त्यावर प्रतिवर्षी १० टक्के वाढ करावी. या दोन्ही पर्यायांपैकी जो दर शेतकऱ्यांना मान्य असेल त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा. जालना शहराजवळील ज्या जागांचे बाजारभाव अधिक असतील त्यांना सानुग्रह अनुदान देता येईल का ते तपासून पाहण्याची सूचनाही त्यांनी केली. त्याबरोबरच फळबागा आणि घरांच्या भरपाईचा आराखडा तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

झोपडपट्ट्यांमधील पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करा

जिल्ह्यातील नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करावे. 2011 पूर्वीच्या घरांना नियमित करुन त्यांना सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वाटप करण्यात यावे. याअनुषंगाने नागपूर येथे झालेल्या कामाची माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारातील बाबींवर तातडीने निर्णय घ्यावा तसेच जी प्रकरणे शासनाकडे पाठविणे आवश्यक असेल ते प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असेही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना चालना द्यावी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

नवी दिल्ली, दि. २०: पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली.

मंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पालखी मार्गामधील अडथळे दूर करावेत तसेच फलटण ते पुणे  हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती केली.

जिहे-कठापूर लिफ्ट सिंचन योजनेसाठी केंद्रीय पाणी आयोगाशी चर्चा

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांना सिंचन सुविधा पुरवण्यासाठी गोरे यांनी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर लिफ्ट सिंचन योजनेच्या टप्पा-दोनच्या विस्ताराला गती देण्याच्या उद्देशाने केंद्रीय पाणी आयोगाचे अध्यक्ष अतुल जैन यांची सेवा भवन येथे भेट घेतली. या वेळी त्यांनी तांत्रिक सल्लागार समिती (TAC) मंजुरीसाठी औपचारिक निवेदन सादर केले. ही योजना 176 गावांना लाभ देणारी असून, 6.332 टीएमसी पाण्याचा वापर करून 60,437 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे सामाजिक-आर्थिक जीवनमान सुधारेल आणि स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पाला 1997 मध्ये प्रथम प्रशासकीय मान्यता मिळाली होती, परंतु निधीच्या कमतरतेमुळे कामे थांबली होती. 2019 मध्ये दुसरी पुनरीक्षित प्रशासकीय मान्यता (₹1,33,074 कोटी) मिळाली, तर 2022 मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेत (PMKSY) समावेश करताना ₹647.69 कोटी मंजूर झाले. या निधीमुळे जिहे-कठापूर बॅरेज, मुख्य पंप हाऊस, वर्धनगड आणि आंधळी बोगद्यांची कामे पूर्ण झाली असून, सध्या 14,600 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. नीर लिफ्ट सिंचन योजना क्रमांक 1 आणि 2 तसेच आंधळी लिफ्ट सिंचन योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर असून, ती मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. 11 ऑक्टोबर 2024 च्या ठरावानुसार प्रकल्पाला तिसरी पुनरीक्षित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, टप्पा-दोनसह एकूण खर्च ₹5,409.72 कोटी आहे. हा प्रकल्प मार्च 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गोरे यांनी TAC मंजुरीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. “या योजनेमुळे सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ग्रामीण रस्ते विकासासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट

या दौऱ्या दरम्यान ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) टप्पा-4 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवेदन सादर केले. यापूर्वी 17 एप्रिल 2024 रोजीही त्यांनी चौहान यांच्याशी याच विषयावर चर्चा केली होती. या निवेदनात महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. PMGSY टप्पा-3 अंतर्गत महाराष्ट्रासाठी 2,009 रस्त्यांना मंजूरी मिळाली असून, त्यांची एकूण लांबी 6,455 किलोमीटर आहे. टप्पा-4 अंतर्गत सामान्य क्षेत्रातील 500 पेक्षा जास्त आणि दुर्गम क्षेत्रातील 250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. सध्याचे पात्रता निकष 2011 च्या जनगणनेवर आधारित असून, गेल्या 12 वर्षांत लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता, मंत्री गोरे यांनी जल जीवन मिशनप्रमाणे वर्तमान लोकसंख्येवर आधारित निकष लागू करण्याची मागणी केली.

याशिवाय, 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्वसाधारण वसाहतींना पात्र ठरविण्याची आणि टप्पा-1 अंतर्गत बांधलेले 10,000 किलोमीटर रस्ते, जे जड वाहतुकीमुळे खराब झाले आहेत, त्यांच्या दुरुस्ती व उन्नयनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. “ग्रामीण रस्ते हे विकासाचा पाया आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने या सूचना अमलात आल्यास महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा कायापालट होईल,” असे  मंत्री गोरे यांनी सांगितले. चौहान यांनी या सूचनांवर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.

यासह केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. सोलापूर येथून मुंबई ते पुणे विमान सेवा सुरळीत व्हावी, यासंदर्भात चर्चा केली. तसेच 10 ऑक्टोंबर 20 24 राज्य शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्य शासन प्रवाशांना सुविधा देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली.

०००

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

मुंबई, दि. २० : क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी. त्यासाठीचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाच्या धर्तीवर नवे क्रीडा धोरण तयार करण्यात यावे. तसेच राज्यातील खेळाडूंच्या अपेक्षेप्रमाणे बदल करावे. क्रीडा महोत्सवात जिल्हा तसे तालुकास्तरावर विविध क्रीडा कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करावे. शाळा महाविद्यालय विद्यापीठांना तसेच जिल्ह्यातील क्रीडापटूंना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन, फिट इंडिया शपथ आणि ६० मिनिटे संघ खेळ व विरंगुळ्याचे खेळ आयोजित करावे.

३० ऑगस्ट रोजी स्थानिक/आदिवासी खेळ, इनडोअर स्पोर्ट्स, शाळा/महाविद्यालय स्तरावरील क्रीडा, वादविवाद, फिटनेस व्याख्याने, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. ३१ ऑगस्ट रोजी संडेज ऑन सायकल Sundays on Cycle या उपक्रमात देशभरातील नागरिकांचा सहभाग करून उपक्रम राबवावा.

या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात दोर खेचणे (Tug of war), ५० मी. शर्यत, रिले रेस, मॅरेथॉन, चमच्यातील गोळी शर्यत, गोणपाट शर्यत, योग, क्रिकेट, सायकलिंग, पिट्ठू सारखे स्थानिक खेळ, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, दोरीवर उड्या मारणे, बुद्धिबळ, ऑलिंपिक मूल्य शिक्षण कार्यक्रम  तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३०० मी. स्पीड वॉक, १ किमी वॉक, योग, श्वसनाचे व्यायाम, सांध्यांचे व्यायाम, स्ट्रेचिंग चॅलेंज, सायकलिंग या क्रीडा प्रकाराचा सहभाग करावा.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

महिला, बालक व सामाजिक गटांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. २० : राज्यातील महिला, बालक आणि सामाजिक गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. गरोदर माता, लहान बालके आणि वयोवृद्ध महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने योजना राबवाव्यात तसेच पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेत दिव्यांग भवन उभारावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत अपर मुख्य सचिव (अर्थ) डॉ. राजगोपाल देवरा यांनी महिला व बालकांसाठी विविध विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचा तुलनात्मक अभ्यास, विभागनिहाय तरतुदी आणि खर्चाचे सादरीकरण केले. बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त ज्योत्स्ना पडियार तसेच युनिसेफचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यातील महिलांमध्ये हिमोग्लोबिन व लोहाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. गरोदर मातांमध्ये कुपोषण व बालकांमध्ये जन्मजात कुपोषण रोखण्यासाठी विशेष ॲनिमिया व बालविवाह मुक्ती अभियान राबविण्यात यावे. पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेत दिव्यांग भवन उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

राज्यात १८ विभागांमार्फत एकूण २५५ योजना राबविल्या  त्यापैकी ३९ योजना महिलांसाठी, १८६ योजना बालकांसाठी आणि ३० योजना महिला व बालकांसाठी एकत्रितपणे राबवल्या  आहेत. यासाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये  ९८ टक्के बजेटचा प्रभावी वापर झाल्याचे समाधान उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले की, महिला व बालकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समित्यांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. तसेच या योजनांचे सामाजिक परिणाम तपासण्यासाठी संशोधनावर विशेष भर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणे, दि.२०: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, मुख्य अभियंता रिनाज पठाण आदी उपस्थित होते.

महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्पाबाबत माहिती दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्प

पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित २७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा, म्हणून या दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.

या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध -शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार आहे.

०००

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

नांदेड दि. २० : मागील पाच ते सहा दिवसांपासून संपूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

आज हदगाव तालुक्यातील करमोडी येथे भेट देवून त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत व परिसरातील शेतकरी, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

पाच ते सहा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक अंदाजानुसार 20 लाख 12 हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकट्या नांदेड जिल्हृयात 2.59 लक्ष हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणच्या शेतातील माती वाहून गेलेली आहे. तर पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरात पाणी शिरले असून घराची मोठी पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्यावतीने सुरु केले आहेत. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतचा अहवाल प्राप्त होताच त्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

नांदेड विमानतळावर मंत्री भरणे यांची आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोढारकर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी भेट घेवून नांदेड जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाई आणि इतर प्रश्नावर चर्चा केली.

०००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...