शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog Page 5

निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १८ : ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मारुती चितमपल्ली यांनी आपले संपूर्ण आयुष्य वन, प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या गूढ अभ्यासासाठी समर्पित केले. वृक्ष, पाने, फुले, पक्षी, प्राणी, डोंगर, अशा निसर्गातील अनेक गोष्टींची माहिती असलेला विश्वकोश ही त्यांची ओळख होती. त्यांच्या लेखनातून मराठी साहित्यात निसर्गाविषयी संवेदनशील जाण निर्माण झाली. त्यांच्या लेखणीतून मराठी शब्दसंपदेत अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभवांची भर पडली आहे.

वनविभागात तीन दशकांहून अधिक सेवा बजावत असताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांतून ही अभयारण्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आदर्श ठरली.

पक्षीशास्त्र आणि वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रात त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले.

30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा गौरव त्यांच्या संपूर्ण कार्याचा योग्य सन्मान होता. मात्र, त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले, हे अधिकच वेदनादायी आहे. मारुती चितमपल्ली यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००

मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी

मुंबई, दि. १८:  निसर्गाला शब्दरूपांनी साजिवंत करणारे आणि मराठी साहित्यात निसर्गसंपदे विषयीच्या अक्षरधनाची भर घालून, आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्यऋषी म्हणून पद्मश्री मारूती चितमपल्ली अजरामर राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात व्रतस्थ राहून काम करणारे चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दिपस्तंभ निमाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वन विभागात काम करताना चितमपल्ली यांनी आगळा दृष्टीकोन बाळगून काम केले. त्यांनी अनेक निसर्ग किमया आपल्या निरिक्षणातून शब्दांनी चितारल्या. त्यासाठी त्यांनी गाढा अभ्यासही केला. आदिवासी तसेच राना-वनात राहणाऱ्या बांधवांकडे असलेले निसर्गाविषयीचे ज्ञान त्यांच्यामुळेच शब्दबद्ध झाले. पक्षितज्ज्ञ, निसर्गलेखक, वन्यजीवांचा अभ्यासक अशी त्यांनी ओळख मिळवली. त्यांच्यामुळे मराठी भाषेला राना-वनातील, निसर्गाशी निगडीत अस्सल असे शब्द मिळाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नावच चकवाचांदण- एक वनोपनिषद असे होते. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी संस्कृतचाही अभ्यास केला. सोलापुरला झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांचे निसर्गाविषयीचे लेखन, अभ्यास- संशोधन, पक्षिकोश अशी साहित्य संपदा मराठी भाषेचे वैभव वाढणारे संचित आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक अमुल्य असा ठेवा आहे. दिवंगत चितमपल्ली यांचा सोलापूर ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते सोलापूर असा प्रवास राहीला आहे. विदर्भातही त्यांचा मोठा गोतावळा आहे. जंगलातील अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध राहीले आहेत. या सगळ्या प्रवासात ते आयुष्यभर निसर्ग आणि मराठी साहित्य क्षेत्राशी व्रतस्थ राहीले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील निसर्ग अभ्यासक, तसेच साहित्य क्षेत्रासाठीचा दिपस्तंभ निमाला आहे, ही एक मोठी हानी आहे.

दिवंगत चितमपल्ली यांचे कुटुंबिय आणि स्नेही यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना, असे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी, पद्मश्री मारूती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००

गडचिरोली व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी १ कोटी १० लाख वृक्ष लागवडीसाठी आराखडा तयार करा – वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. १८ : राज्यात यंदा 11 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्यात 1 कोटी 10 लाख आणि पालघर जिल्ह्यात 1 कोटी 10 लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे दोन्ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागाने आराखडा तयार करून रोपे उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

वन मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात वन विभागाच्या विविध बैठका झाल्या. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी बैठकीस वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वन बल प्रमुख शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, श्री. रामाराव, पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झिरमुरे, मुख्य वन संरक्षक रविकिरण गोवेकर, उपसचिव विवेक होशिंग यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

वन मंत्री नाईक म्हणाले की, गडचिरोली व पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. ही कामे होत असताना जिल्ह्यातील वृक्ष संपदाही वाढली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 1 कोटी 10 लाख झाडे लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये साग, चंदन आदी झाडे लावण्यात यावीत. तसेच प्रत्येक वन परिक्षेत्रात 100 एकरावर साग व चंदनाची झाडे लावण्याचे नियोजन करण्यात यावे.

गडचिरोली व पालघर या दोन्ही जिल्ह्यात तसेच राज्यात 11 कोटी झाडे लावताना ती देशी असावीत याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच एवढे मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी रोपे पुरविण्यासाठी वन विभागाच्या रोपवाटिका (नर्सरी) सक्षम करावे. गरज पडल्यास कृषि विद्यापीठे, खासगी नर्सरीचीही मदत घ्यावी. जांभूळ, वड, पिंपळ, बकुळी, प्राजक्त, बांबू, साग, चंदन आदी झाडे लावण्यात यावीत. ही झाडे किमान तीन वर्षे वयाची असतील याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जागा शोधणे, रोपे निवडणे आदी कामे वेगाने करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाला सर्वोत्तम कामगार रुग्णालय बनविणार – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १८: महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाला गतवैभव मिळवून देत राज्यातील सर्वोत्तम कामगार रुग्णालय बनविणार असल्याचा मानस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधी स्मारक कामगार रुग्णालयातील सभागृहात आयोजित बैठकीत मंत्री आबिटकर बोलत होते. बैठकीस विधान परिषद आमदार चित्रा वाघ, केंद्रीय कामगार विमा योजनेच्या क्षेत्रीय संचालक अभिलाषा झा, राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कामगार रुग्णालय मुख्य अभियंता अश्विन यादव, रुग्णालय अधीक्षिका मेघा आयरे आदी उपस्थित होते.

मंत्री आबिटकर म्हणाले, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय हे मुंबईतील एक महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाणी असलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयात सर्व वैद्यकीय सेवा तातडीने सुरू कराव्यात, विशेष तज्ज्ञांची पदे भरावीत. केईएम रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ न शकणाऱ्या तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांना या रुग्णालयाने उपचार द्यावेत. दक्षता विभाग तातडीने सुरू करून रुग्णालयाकरिता आवश्यक यंत्रसामग्री व मागण्यांचा प्रस्ताव तातडीने द्यावा, अशा सूचनाही मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

रुग्णालयाला आरोग्य मंत्री आबिटकर यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान शस्त्रक्रिया कक्ष, स्त्री रुग्ण कक्ष, बालकांचा कक्ष, व्हेंटिलेशन रूम, तसेच रुग्णालयातील विविध सुविधांची आणि परिसराची पाहणी केली.

कामगार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा ग्रॅज्युएटी संदर्भातील १५ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आरोग्यमंत्र्यांनी सोडवल्याबद्दल यावेळी कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सन १९६२ नंतर मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयाला भेट देणारे मंत्री आबिटकर हे पहिले आरोग्यमंत्री असल्याचे आमदार वाघ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार निधीतून दिलेल्या सुविधा, रुग्णालयातील नूतनीकरण केलेले सभागृह व पोर्टेबल एक्स-रे मशीनचे उद्घाटन मंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १८ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी नद्या, नाले  भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यांतील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल नुकताच कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे नागरिकांनी  पर्यटन स्थळे  व धोकादायक ठिकाणी अधिक सतर्क राहावे, असे  आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी केले आहे.  तसेच अतिवृष्टी, वीज पडणे, दरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर  तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने मदत मिळावी यासाठी  1070, 09321587143 , 022-22027990,  022-22794229 हे राज्य  हेल्पलाइन क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. तसेच 1077 हा  हेल्पलाइन क्रमांक २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत

पर्यटनाचा आनंद घेताना विशेष काळजी घ्या

पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी, वीज पडणे, दरडी कोसळणे यासारख्या आपत्ती परिस्थिती निर्माण होऊ शकतात.  त्यामुळे  पर्यटन स्थळी पर्यटकांनी विशेष खबरदारी व काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करून आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन म्हणाले, संभाव्य आपत्ती पासून संरक्षण होण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे  नागरिकांनी पालन करावे.

वारी आरोग्यदायी व आनंददायी

पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक परंपरा आहे‌. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पदयात्रा करतात, ही वारी सुरक्षित आरोग्यदायी व आनंददायी व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबरच आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देखील उपायोजना राबविण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळावी म्हणून वरील हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आपत्कालीन मदत केंद्र देखील प्रत्येक टप्प्यावर कार्यान्वित करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे वीज पडणे, दरडी कोसळणे यासारख्या आपत्ती निर्माण होऊ शकतात, यासाठी वारकऱ्यांनीही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी केले आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १८ : राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु, ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्‍ट केले आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, हिंदी ऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छा दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील. हिंदी ऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छा दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात येईल.

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल. ज्या शाळा मराठी भाषा शिकविणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यासंबंधीचे सर्व नियोजन हे शालेय शिक्षण आयुक्त यांच्या स्तरावरून तत्काळ करण्यात येईल. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता सहावी ते दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण प्रमाणे असेल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेबाबतच्या १६ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयामध्ये वरीलप्रमाणे बदल करण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

202506172233593421 (1)

लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंतांना साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई, दि. १८: साहित्य अकादमीच्या आज जाहीर झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये मराठी साहित्यातील दोन साहित्यिकांचा समावेश आहे. लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ तर कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे.

लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीने मराठी साहित्यातील युवा लेखकांच्या संवेदनशील आणि प्रभावी लेखनाची चुणूक दाखवली आहे. तर कवी सुरेश सावंत यांचा ‘आभाळमाया’ हा कवितासंग्रह बाल साहित्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा दाखला आहे.

मराठी साहित्याच्या क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या प्रदीप कोकरे आणि सुरेश सावंत यांचे या यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन करतानाच त्यांच्या साहित्य प्रवासाला यश मिळो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

०००

शेतमजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १८ :  शेतीतील उत्पादकता वाढावी तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतीतील मजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार आहे. कमी मनुष्यबळात काम करणे, मानवविरहित यंत्राचा वापर करणे, कृषी यांत्रिकीकरणासाठी शासन विविध कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना राबवत आहे शासन शेतक-यांच्या हितासाठी आलेल्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावरती कार्यवाही करेल असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्यला आश्वासित केले.

 

मंत्रालयात आयोजित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नविषयक शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या बैठकीत कृषी मंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्तालय पुणेचे दूरदृश्यप्रणालीद्वारे कृषी आयुक्त सुरज मांढरे, संचालक रफिक नायकवडी, सुनिल बोरकर, विनयकुमार आवटे, डॉ. के. पी. मोते, शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, सदस्य बीडचे नाथराव कराड ,परभणीचे सदाशिव थोरात, कोल्हापूरचे सर्जेराव पाटील, साताराचे विश्वंभर बाबर, वाशिमचे रविंद्र गायकवाड, कर्जतचे पांडूरंग डोंगरे, साताराचे राजेद्र गायकवाड, ठाणेच बबन हरणे, नागपूरचे आत्मास्वामी खोपडे, जळगाव प्रविण पाटील-फरंकाडे यासह इतर पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, कृषी विषयक समित्यावर शासन निर्णय घेऊन कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना सदस्य म्हणून घेण्यात येईल. शेतीविषयक कामांसाठी योग्य ते धोरण ठरविण्यात येईल शासनाकडे याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करू, पीकविमा योजनेत सुधारणा करणे, कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र यांना सक्षम करत आहोत. नवीन पिकाचे संशोधन करण्यासाठी शासन नेहमीच प्रोत्साहन देत असते. जमिनीची सुपीकता वाढवून पिकाची उत्पादकता वाढविणे यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

राज्य शासन व केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत काही सूचना असतील तर त्यावरती जरूर विचार करू. शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ नक्कीच चांगल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करेल. नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून पिकाची उत्पादकता वाढवणे, कृषी विषयक प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना ग्रामपंचायतीची कर आकारणी रद्द करणे याबाबत नक्कीच कार्यवाही करू. कृषी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या प्रतिनिधीस आमंत्रित करून व्यासपीठावर एका सदस्याला उपस्थित राहण्याची संधी देण्याबाबत शासन कार्यवाही करेल, असेही कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली

शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष कृषी भूषण ॲड. प्रकाश पाटील म्हणाले की, कृषी मंत्री यांनी राज्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची बैठक मंत्रालयात घेतली आणि राज्यातील शेतीविषयक १६ विषयांवर चर्चा केली. मंत्री ॲड. कोकाटे यांनी उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

फाल्कन २००० जेटसची नागपुरात निर्मिती; डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार;

मुंबई, दि. १८: पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन २००० जेटसच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून, फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची ही निर्मिती प्रथमच होणार आहे. ही निर्मिती नागपुरात होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या कराराचे स्वागत केले आहे.

नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही मोठा ‘बूस्ट’ मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. नागपुरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन २००० ची संपूर्णत: निर्मिती आता नागपुरात होणार आहे. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे सेंटर ऑफ एक्सलन्स ठरेल. फाल्कन ८ एक्स आणि ६ एक्सची असेम्ब्ली सुद्धा तेथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडिया फाल्कन २०२८ पर्यंत नागपुरात तयार होईल. २०१७ मध्ये या डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) ची स्थापना करण्यात आली होती. आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंते यांना नागपुरात रोजगार उपलब्ध होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन ही संरक्षण दलाला लागणाऱ्या राफेलसह, फाल्कनची निर्मिती करणारी जगातील अगग्रण्य कंपनी असून, आतापर्यंत त्यांनी १० हजारावर लष्करी आणि नागरी विमानांची निर्मिती केली आहे. सुमारे ९० देशांना त्याचा पुरवठा केला जातो.

०००

रस्ते विकासासाठी निकडीनुसार मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करा -मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १८ : राज्यातील रस्त्यांची कामे करताना त्यांची निकड विचारत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करावी, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तर गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

अमरावती आणि नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सचिव संजय दशपुते यांच्यासह विभागाचे अधिकारी तसेच अमरावती आणि नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, रस्त्यांची कामे निवडताना त्यांची निकड आणि तातडी या बाबी विचारत घेण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने निकडीसाठीचे धोरण आणि एसओपी तयार करुन जोडल्या जाणाऱ्या गावांचे जीवनमान उंचावले जाईल असे रस्ते बनवण्यासाठी व्हिजन ठरवून काम करावे. यासाठी विभागाने आपल्या सुस्पष्ट अभिप्रायांसह योजनाबद्धरितीने अत्यावश्यक कामे प्रस्तावित करावीत, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य

मंत्री भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर पर्यटन वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या तसेच व्यापार वृद्धीच्यादृष्टीने बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील अचलपूर – बडनेरा – यवतमाळ या रस्त्यासाठी हायब्रीड अन्युयिटी मॉडेल (हॅम) अंतर्गत प्रस्ताव पाठवण्याची सूचना मंत्री बावनकुळे यांनी अमरावतीच्या अधिकाऱ्यांना दिली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

ताज्या बातम्या

‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार...

0
स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन जळगाव, दि. २० जून (जिमाका):...

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २० : रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांची संघटना आहे हा हेतूपुरस्सर पसरवलेला गैरसमज आपल्या पुस्तकातून दूर करताना संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती रमेश...

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. 20 : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांची मुलाखत

0
मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'आषाढी वारी’ निमित्त  शासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधा' या विषयासंदर्भात ग्रामविकास व...

मंत्रालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0
मुंबई, दि. 20 : मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ‘इन्स्टिट्युट ऑफ योगा’ यांच्या सहयोगाने आयोजित...