शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog Page 6

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १८ : राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु, ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्‍ट केले आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, हिंदी ऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छा दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील. हिंदी ऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छा दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात येईल.

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल. ज्या शाळा मराठी भाषा शिकविणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यासंबंधीचे सर्व नियोजन हे शालेय शिक्षण आयुक्त यांच्या स्तरावरून तत्काळ करण्यात येईल. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता सहावी ते दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण प्रमाणे असेल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेबाबतच्या १६ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयामध्ये वरीलप्रमाणे बदल करण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

202506172233593421 (1)

लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंतांना साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई, दि. १८: साहित्य अकादमीच्या आज जाहीर झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये मराठी साहित्यातील दोन साहित्यिकांचा समावेश आहे. लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ तर कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे.

लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीने मराठी साहित्यातील युवा लेखकांच्या संवेदनशील आणि प्रभावी लेखनाची चुणूक दाखवली आहे. तर कवी सुरेश सावंत यांचा ‘आभाळमाया’ हा कवितासंग्रह बाल साहित्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा दाखला आहे.

मराठी साहित्याच्या क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या प्रदीप कोकरे आणि सुरेश सावंत यांचे या यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन करतानाच त्यांच्या साहित्य प्रवासाला यश मिळो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

०००

शेतमजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १८ :  शेतीतील उत्पादकता वाढावी तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतीतील मजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार आहे. कमी मनुष्यबळात काम करणे, मानवविरहित यंत्राचा वापर करणे, कृषी यांत्रिकीकरणासाठी शासन विविध कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना राबवत आहे शासन शेतक-यांच्या हितासाठी आलेल्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावरती कार्यवाही करेल असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्यला आश्वासित केले.

 

मंत्रालयात आयोजित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नविषयक शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या बैठकीत कृषी मंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्तालय पुणेचे दूरदृश्यप्रणालीद्वारे कृषी आयुक्त सुरज मांढरे, संचालक रफिक नायकवडी, सुनिल बोरकर, विनयकुमार आवटे, डॉ. के. पी. मोते, शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, सदस्य बीडचे नाथराव कराड ,परभणीचे सदाशिव थोरात, कोल्हापूरचे सर्जेराव पाटील, साताराचे विश्वंभर बाबर, वाशिमचे रविंद्र गायकवाड, कर्जतचे पांडूरंग डोंगरे, साताराचे राजेद्र गायकवाड, ठाणेच बबन हरणे, नागपूरचे आत्मास्वामी खोपडे, जळगाव प्रविण पाटील-फरंकाडे यासह इतर पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, कृषी विषयक समित्यावर शासन निर्णय घेऊन कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना सदस्य म्हणून घेण्यात येईल. शेतीविषयक कामांसाठी योग्य ते धोरण ठरविण्यात येईल शासनाकडे याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करू, पीकविमा योजनेत सुधारणा करणे, कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र यांना सक्षम करत आहोत. नवीन पिकाचे संशोधन करण्यासाठी शासन नेहमीच प्रोत्साहन देत असते. जमिनीची सुपीकता वाढवून पिकाची उत्पादकता वाढविणे यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

राज्य शासन व केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत काही सूचना असतील तर त्यावरती जरूर विचार करू. शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ नक्कीच चांगल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करेल. नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून पिकाची उत्पादकता वाढवणे, कृषी विषयक प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना ग्रामपंचायतीची कर आकारणी रद्द करणे याबाबत नक्कीच कार्यवाही करू. कृषी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या प्रतिनिधीस आमंत्रित करून व्यासपीठावर एका सदस्याला उपस्थित राहण्याची संधी देण्याबाबत शासन कार्यवाही करेल, असेही कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली

शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष कृषी भूषण ॲड. प्रकाश पाटील म्हणाले की, कृषी मंत्री यांनी राज्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची बैठक मंत्रालयात घेतली आणि राज्यातील शेतीविषयक १६ विषयांवर चर्चा केली. मंत्री ॲड. कोकाटे यांनी उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

फाल्कन २००० जेटसची नागपुरात निर्मिती; डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार;

मुंबई, दि. १८: पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन २००० जेटसच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून, फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची ही निर्मिती प्रथमच होणार आहे. ही निर्मिती नागपुरात होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या कराराचे स्वागत केले आहे.

नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही मोठा ‘बूस्ट’ मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. नागपुरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन २००० ची संपूर्णत: निर्मिती आता नागपुरात होणार आहे. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे सेंटर ऑफ एक्सलन्स ठरेल. फाल्कन ८ एक्स आणि ६ एक्सची असेम्ब्ली सुद्धा तेथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडिया फाल्कन २०२८ पर्यंत नागपुरात तयार होईल. २०१७ मध्ये या डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) ची स्थापना करण्यात आली होती. आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंते यांना नागपुरात रोजगार उपलब्ध होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन ही संरक्षण दलाला लागणाऱ्या राफेलसह, फाल्कनची निर्मिती करणारी जगातील अगग्रण्य कंपनी असून, आतापर्यंत त्यांनी १० हजारावर लष्करी आणि नागरी विमानांची निर्मिती केली आहे. सुमारे ९० देशांना त्याचा पुरवठा केला जातो.

०००

रस्ते विकासासाठी निकडीनुसार मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करा -मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १८ : राज्यातील रस्त्यांची कामे करताना त्यांची निकड विचारत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करावी, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तर गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

अमरावती आणि नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सचिव संजय दशपुते यांच्यासह विभागाचे अधिकारी तसेच अमरावती आणि नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, रस्त्यांची कामे निवडताना त्यांची निकड आणि तातडी या बाबी विचारत घेण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने निकडीसाठीचे धोरण आणि एसओपी तयार करुन जोडल्या जाणाऱ्या गावांचे जीवनमान उंचावले जाईल असे रस्ते बनवण्यासाठी व्हिजन ठरवून काम करावे. यासाठी विभागाने आपल्या सुस्पष्ट अभिप्रायांसह योजनाबद्धरितीने अत्यावश्यक कामे प्रस्तावित करावीत, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य

मंत्री भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर पर्यटन वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या तसेच व्यापार वृद्धीच्यादृष्टीने बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील अचलपूर – बडनेरा – यवतमाळ या रस्त्यासाठी हायब्रीड अन्युयिटी मॉडेल (हॅम) अंतर्गत प्रस्ताव पाठवण्याची सूचना मंत्री बावनकुळे यांनी अमरावतीच्या अधिकाऱ्यांना दिली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

आदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १८ : आदिवासी विकासासाठी राखीव निधी आदिवासी विकास योजनांसाठीच वापरला जावा, आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ आदिवासींनाच व्हावा, बोगस आदिवासी प्रमाणपत्र धारकांवर कडक कारवाई करावी तसेच पेसा भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यासंदर्भात आपण आग्रही असून न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून पेसा भागात आदिवासी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे दिले.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आदिवासी आमदार व आदिवासी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पेसा भागांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात सध्याच्या आदेशातील विसंगती दूर करणे, अवैधरित्या जात प्रमाणपत्र रोखण्यासंदर्भात कायदा करणे, आदिवासी विद्यापीठाची स्थापना करणे, प्रलंबित वनदावे निकाली काढणे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक वर्षातून किमान दोनदा व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

आदिवासी मुले-मुली मुंबई व पुणे येथे शिक्षणासाठी येतात. त्यांच्यासाठी वसतिगृहे बांधण्यासाठी मुंबई व पुणे येथील विद्यापीठ परिसरात जागा उपलब्ध करून दिल्यास आदिवासी विकास विभाग वसतिगृहे बांधून देईल, असे आदिवासी विकासमंत्री अशोक वुईके यांनी राज्यपालांना सांगितले.

राज्यपाल हे राज्यातील आदिवासी भागांचे पालक असल्याने त्यांनी राज्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची प्रत्येक विधानमंडळाच्या सत्राच्या वेळी बैठक घ्यावी अशी विनंती मंत्री झिरवाळ यांनी यावेळी केली.

बैठकीला आमदार भीमराव केराम, राजेंद्र गावित, राजू तोडसाम, आमश्या पाडवी, नितीन पवार तसेच आदिवासी सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

भूमिहीन कुटुंबांना घरकुले उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करा – मंत्री जयकुमार गोरे

  • यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत बैठक
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीचा खर्च नियोजनाचा अंतिम आराखडा सादर करा
  • संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्रच्या कामांना गती द्यावी

मुंबई, दि. १८: यवतमाळ जिल्ह्यातील घरकुल नसलेल्या नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी कार्यवाही करा, भूमिहीन गरीब कुटुंबांना गावठाणामधील जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या.

यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत मंत्रालयात ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, आमदार राजू तोडसाम, आमदार आमश्या पाडवी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल व यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्ह्यात शासनाने 68 हजार घरकुलाना मंजुरी दिली आहे. गावठाणच्या जागेवर वर्षानुवर्ष भूमिहीन कुटुंब राहत आहेत. या पात्र कुटुंबांना घरकुल उपलब्ध व्हावे, यासाठी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

मंत्री गोरे म्हणाले, गावठाणच्या जागेवर अनेक वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबांच्या घरकुलाची जागा नियमाकूल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा.

बैठकीत जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत अंतर्गत पांदण रस्ते, विविध गावांमध्ये रस्त्याची कामे, यासह त्रिशंकू स्थिती असलेल्या पुनर्वासित गावाबाबत चर्चा करण्यात आली. जवळपास 31 गावांमधील ग्रामपंचायत वार्ड निर्मिती, संबंधित ग्रामपंचायतीमधील समावेश आदीबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी जामवाडी, दर्यापूर, शिवनी सह विविध गावांच्या बाबत चर्चा करण्यात आली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीचा खर्च नियोजनाचा अंतिम आराखडा सादर करा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी (नायगाव, जि.सातारा) येथील स्मारक उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून स्मारकाच्या उभारणीचे नियोजन व खर्चाचे आराखडे लवकरात लवकर सादर करावेत, अशा सूचना मंत्री गोरे यांनी दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, अधीक्षक अभियंता डी. पी. माने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्रच्या कामांना गती द्यावी

संत शिरोमणी सावता माळी यांच्या सोलापूर जिल्ह्यातील अरण गावात शासनाने तीर्थक्षेत्रास ‘अ’ दर्जा दिला आहे. येथील समाधी मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी भूमी अधिग्रहण, मंदिर, भोवतालचे संरक्षक भिंत यांसह विविध विकासकामे केली जाणार आहेत. यासाठी शिखर समितीची मान्यता झाली असून संबंधित प्रस्ताव पाठवण्यात यावे व आराखड्यास अंतिम करण्यासाठी कामास गती द्यावी, असे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले.

यावेळी प्रधान सचिव एकनाथ डवले, मंदिर संस्थानचे प्रमुख सावता महाराज वसईकर, प्रभू महाराज उपस्थित होते. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कार्यकारी अभियंता अजय भोसले, वास्तुशास्त्र विशारद हेमंत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

०००

किरण वाघ/विसंअ/

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करा

मुंबई, दि. १८: कर्जत तालुक्यातील (जि.अहिल्यानगर) खेड-मानेवाडी ते शिंपोरा रस्त्यावरील पूल या भागातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांना रहदारीसाठी महत्त्वाचा आहे. हा पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या भागातील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. या  परिसरातील नागरिकांना या मार्गावरून सुरळीत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी हा पूल नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आठ दिवसात तत्काळ सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथील बैठकीत दिले.

सभापती प्रा. शिंदे आणि मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत विधान भवनातील दालनात पूल उभारण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एम.एम.जी.एस.वाय. चे सचिव सतिश चिखलीकर, सहसचिव के.जी.वळवी, उप सचिव प्रशांत पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आनंद भंडारी, सोलापूर पुनर्वसन विभाग उजनी अधीक्षक अभियंता श्री. साले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री.भदाणे उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पूल वाहून गेल्याच्या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि आठ दिवसात नवीन, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट पुल बांधणीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, नव्या पुलास लोकभावनेस अनुसरुन ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे खेड-मानेवाडी ते शिंपोरा ता.कर्जत, जि.अहिल्यानगर या रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल अवकाळी पाऊस व  अतिवृष्टीने २५ मे, २०२५ रोजी वाहून गेला. त्यानंतर ९ जून, २०२५ रोजी सभापती प्रा. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेबद्दल सभापती प्रा. शिंदे आणि ग्रामविकास मंत्री गोरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

या पुलाच्या बांधकामाची चौकशी करावी, यासाठी नेमलेल्या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. लोकभावनेची दखल घेऊन पुलाची उभारणी आता तातडीने होणार असल्याने परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे, असेही सभापती प्रा.शिंदे म्हणाले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक

??????????????

मुंबई, दि. १८: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच सर्व पारंपरिक विद्यापीठांची संयुक्त बैठक आयोजित करू तसेच राज्याच्या कृषिमंत्र्यांसह राज्यातील कृषी विद्यापीठांना भेट देऊन तेथील संशोधनाची विस्तृत माहिती घेऊ, असे राज्यपालांनी बैठकीत सांगितले.

??????????????

या बैठकीत विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांवरील भरती, विद्यापीठांमधील वैधानिक पदांची भरती, उच्च व तंत्रशिक्षण विभागाची पहिल्या १०० दिवसांमधील उपलब्धी, शिकाऊ उमेदवारी संलग्न पदवी अभ्यासक्रम, कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठांमधील प्रशासन सुधार, सर्व पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता आदी विषयांवर चर्चा झाली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

पुणे, दि. १८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी….  ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.

विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली.

महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

०००

ताज्या बातम्या

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांना शासकीय वाहनांचे वितरण

0
नांदेड, दि. २०: नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचे वितरण आज करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या...

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे

0
मुंबई, दि. २०: 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. २० : सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध शासकीय विभागांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईचे एकत्र प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावे. नुकसान भरपाई...

विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर : पालकमंत्री अतुल सावे

0
नांदेड, दि. २० : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण,...

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

0
मुंबई, दि. २० : संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत होणा असून...