शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog Page 7

फाल्कन २००० जेटसची नागपुरात निर्मिती; डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार;

मुंबई, दि. १८: पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन २००० जेटसच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून, फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची ही निर्मिती प्रथमच होणार आहे. ही निर्मिती नागपुरात होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या कराराचे स्वागत केले आहे.

नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही मोठा ‘बूस्ट’ मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. नागपुरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन २००० ची संपूर्णत: निर्मिती आता नागपुरात होणार आहे. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे सेंटर ऑफ एक्सलन्स ठरेल. फाल्कन ८ एक्स आणि ६ एक्सची असेम्ब्ली सुद्धा तेथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडिया फाल्कन २०२८ पर्यंत नागपुरात तयार होईल. २०१७ मध्ये या डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) ची स्थापना करण्यात आली होती. आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंते यांना नागपुरात रोजगार उपलब्ध होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन ही संरक्षण दलाला लागणाऱ्या राफेलसह, फाल्कनची निर्मिती करणारी जगातील अगग्रण्य कंपनी असून, आतापर्यंत त्यांनी १० हजारावर लष्करी आणि नागरी विमानांची निर्मिती केली आहे. सुमारे ९० देशांना त्याचा पुरवठा केला जातो.

०००

रस्ते विकासासाठी निकडीनुसार मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करा -मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १८ : राज्यातील रस्त्यांची कामे करताना त्यांची निकड विचारत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करावी, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तर गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

अमरावती आणि नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सचिव संजय दशपुते यांच्यासह विभागाचे अधिकारी तसेच अमरावती आणि नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, रस्त्यांची कामे निवडताना त्यांची निकड आणि तातडी या बाबी विचारत घेण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने निकडीसाठीचे धोरण आणि एसओपी तयार करुन जोडल्या जाणाऱ्या गावांचे जीवनमान उंचावले जाईल असे रस्ते बनवण्यासाठी व्हिजन ठरवून काम करावे. यासाठी विभागाने आपल्या सुस्पष्ट अभिप्रायांसह योजनाबद्धरितीने अत्यावश्यक कामे प्रस्तावित करावीत, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य

मंत्री भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर पर्यटन वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या तसेच व्यापार वृद्धीच्यादृष्टीने बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील अचलपूर – बडनेरा – यवतमाळ या रस्त्यासाठी हायब्रीड अन्युयिटी मॉडेल (हॅम) अंतर्गत प्रस्ताव पाठवण्याची सूचना मंत्री बावनकुळे यांनी अमरावतीच्या अधिकाऱ्यांना दिली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

आदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १८ : आदिवासी विकासासाठी राखीव निधी आदिवासी विकास योजनांसाठीच वापरला जावा, आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ आदिवासींनाच व्हावा, बोगस आदिवासी प्रमाणपत्र धारकांवर कडक कारवाई करावी तसेच पेसा भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यासंदर्भात आपण आग्रही असून न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून पेसा भागात आदिवासी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे दिले.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आदिवासी आमदार व आदिवासी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पेसा भागांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात सध्याच्या आदेशातील विसंगती दूर करणे, अवैधरित्या जात प्रमाणपत्र रोखण्यासंदर्भात कायदा करणे, आदिवासी विद्यापीठाची स्थापना करणे, प्रलंबित वनदावे निकाली काढणे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक वर्षातून किमान दोनदा व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

आदिवासी मुले-मुली मुंबई व पुणे येथे शिक्षणासाठी येतात. त्यांच्यासाठी वसतिगृहे बांधण्यासाठी मुंबई व पुणे येथील विद्यापीठ परिसरात जागा उपलब्ध करून दिल्यास आदिवासी विकास विभाग वसतिगृहे बांधून देईल, असे आदिवासी विकासमंत्री अशोक वुईके यांनी राज्यपालांना सांगितले.

राज्यपाल हे राज्यातील आदिवासी भागांचे पालक असल्याने त्यांनी राज्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची प्रत्येक विधानमंडळाच्या सत्राच्या वेळी बैठक घ्यावी अशी विनंती मंत्री झिरवाळ यांनी यावेळी केली.

बैठकीला आमदार भीमराव केराम, राजेंद्र गावित, राजू तोडसाम, आमश्या पाडवी, नितीन पवार तसेच आदिवासी सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

भूमिहीन कुटुंबांना घरकुले उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करा – मंत्री जयकुमार गोरे

  • यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत बैठक
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीचा खर्च नियोजनाचा अंतिम आराखडा सादर करा
  • संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्रच्या कामांना गती द्यावी

मुंबई, दि. १८: यवतमाळ जिल्ह्यातील घरकुल नसलेल्या नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी कार्यवाही करा, भूमिहीन गरीब कुटुंबांना गावठाणामधील जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या.

यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत मंत्रालयात ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, आमदार राजू तोडसाम, आमदार आमश्या पाडवी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल व यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्ह्यात शासनाने 68 हजार घरकुलाना मंजुरी दिली आहे. गावठाणच्या जागेवर वर्षानुवर्ष भूमिहीन कुटुंब राहत आहेत. या पात्र कुटुंबांना घरकुल उपलब्ध व्हावे, यासाठी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

मंत्री गोरे म्हणाले, गावठाणच्या जागेवर अनेक वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबांच्या घरकुलाची जागा नियमाकूल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा.

बैठकीत जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत अंतर्गत पांदण रस्ते, विविध गावांमध्ये रस्त्याची कामे, यासह त्रिशंकू स्थिती असलेल्या पुनर्वासित गावाबाबत चर्चा करण्यात आली. जवळपास 31 गावांमधील ग्रामपंचायत वार्ड निर्मिती, संबंधित ग्रामपंचायतीमधील समावेश आदीबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी जामवाडी, दर्यापूर, शिवनी सह विविध गावांच्या बाबत चर्चा करण्यात आली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीचा खर्च नियोजनाचा अंतिम आराखडा सादर करा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी (नायगाव, जि.सातारा) येथील स्मारक उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून स्मारकाच्या उभारणीचे नियोजन व खर्चाचे आराखडे लवकरात लवकर सादर करावेत, अशा सूचना मंत्री गोरे यांनी दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, अधीक्षक अभियंता डी. पी. माने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्रच्या कामांना गती द्यावी

संत शिरोमणी सावता माळी यांच्या सोलापूर जिल्ह्यातील अरण गावात शासनाने तीर्थक्षेत्रास ‘अ’ दर्जा दिला आहे. येथील समाधी मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी भूमी अधिग्रहण, मंदिर, भोवतालचे संरक्षक भिंत यांसह विविध विकासकामे केली जाणार आहेत. यासाठी शिखर समितीची मान्यता झाली असून संबंधित प्रस्ताव पाठवण्यात यावे व आराखड्यास अंतिम करण्यासाठी कामास गती द्यावी, असे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले.

यावेळी प्रधान सचिव एकनाथ डवले, मंदिर संस्थानचे प्रमुख सावता महाराज वसईकर, प्रभू महाराज उपस्थित होते. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कार्यकारी अभियंता अजय भोसले, वास्तुशास्त्र विशारद हेमंत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

०००

किरण वाघ/विसंअ/

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करा

मुंबई, दि. १८: कर्जत तालुक्यातील (जि.अहिल्यानगर) खेड-मानेवाडी ते शिंपोरा रस्त्यावरील पूल या भागातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांना रहदारीसाठी महत्त्वाचा आहे. हा पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या भागातील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. या  परिसरातील नागरिकांना या मार्गावरून सुरळीत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी हा पूल नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आठ दिवसात तत्काळ सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथील बैठकीत दिले.

सभापती प्रा. शिंदे आणि मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत विधान भवनातील दालनात पूल उभारण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एम.एम.जी.एस.वाय. चे सचिव सतिश चिखलीकर, सहसचिव के.जी.वळवी, उप सचिव प्रशांत पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आनंद भंडारी, सोलापूर पुनर्वसन विभाग उजनी अधीक्षक अभियंता श्री. साले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री.भदाणे उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पूल वाहून गेल्याच्या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि आठ दिवसात नवीन, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट पुल बांधणीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, नव्या पुलास लोकभावनेस अनुसरुन ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे खेड-मानेवाडी ते शिंपोरा ता.कर्जत, जि.अहिल्यानगर या रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल अवकाळी पाऊस व  अतिवृष्टीने २५ मे, २०२५ रोजी वाहून गेला. त्यानंतर ९ जून, २०२५ रोजी सभापती प्रा. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेबद्दल सभापती प्रा. शिंदे आणि ग्रामविकास मंत्री गोरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

या पुलाच्या बांधकामाची चौकशी करावी, यासाठी नेमलेल्या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. लोकभावनेची दखल घेऊन पुलाची उभारणी आता तातडीने होणार असल्याने परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे, असेही सभापती प्रा.शिंदे म्हणाले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक

??????????????

मुंबई, दि. १८: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच सर्व पारंपरिक विद्यापीठांची संयुक्त बैठक आयोजित करू तसेच राज्याच्या कृषिमंत्र्यांसह राज्यातील कृषी विद्यापीठांना भेट देऊन तेथील संशोधनाची विस्तृत माहिती घेऊ, असे राज्यपालांनी बैठकीत सांगितले.

??????????????

या बैठकीत विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांवरील भरती, विद्यापीठांमधील वैधानिक पदांची भरती, उच्च व तंत्रशिक्षण विभागाची पहिल्या १०० दिवसांमधील उपलब्धी, शिकाऊ उमेदवारी संलग्न पदवी अभ्यासक्रम, कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठांमधील प्रशासन सुधार, सर्व पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता आदी विषयांवर चर्चा झाली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

पुणे, दि. १८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी….  ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.

विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली.

महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

०००

वसतिगृहांसाठी तातडीने जागा निश्चित करा – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १८ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये वसतिगृहासाठी अद्याप भाडेतत्त्वावर जागा निश्चित करण्यात आलेली नाही, त्या जिल्ह्याचा तातडीने योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाज, विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१०० विद्यार्थी क्षमतेचे मुला-मुलींसाठी ५६ वसतिगृह २६ जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही तक्रारी येऊ नयेत यासाठी वसतीगृहांना भेटी देऊन सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करावी, अशी सूचना मंत्री सावे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्यासाठी नियोजन करण्यात यावे. वसतिगृह आणि आश्रमशाळांचे जीपीएस मॅपिंग करावे. वसतिगृह व्यवस्थापन आणि नामांकित शाळा पोर्टलची अंमलबजावणी तातडीने करावी. योजना लाभार्थ्यांमध्ये ५० टक्के महिला लाभार्थी असावेत. जिल्हाधिकारी कार्यालये व मंत्रालयात योजनांची माहिती डिजिटल होर्डिंगद्वारे द्यावी. तसेच रोजगार मेळाव्यांचे आयोजन विभागस्तरावर करण्यात यावे. यशोगाथांची माहिती पुस्तिका तयार करावी. विभागातील नवीन भरती प्रक्रिया, प्रशिक्षण, नियुक्त्या आणि रेकॉर्ड अद्ययावतीकरणाची प्रलंबित कामे तातडीने करावी, असेही मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येणार – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १८ : दिव्यांगांना त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने विविध उपक्रम राबवित असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कालसुसंगत व्यापक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले, व्हॉट्सॲप चॅटबॉट, ई-ऑफिस आदी तंत्रज्ञानाचा वापर करून दिव्यांगांना शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून द्याव्यात. ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान उर्वरित जिल्ह्यात राबविण्यात यावे. जिल्हास्तरावर दिव्यांगाचे सर्वेक्षण करण्यात यावे. दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेत एक टक्का निधी राखीव आहे, या निधीमधून दिव्यांग व्यक्तीसाठीच्या योजना राबविण्याबाबत पालकमंत्र्यांना पत्र देण्यात यावे. स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य, सुगम पायाभूत सुविधा, कौशल्य प्रशिक्षण यासारख्या योजनांचा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी

मुंबई, दि. १८: राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्याच सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील म्हणाले की, शासनाच्या ८ मार्च, २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये महिलासाठी वार्ड प्रभाग (मुंबई, ठाणे, नवी मुंबई) प्राथमिक सभासद संख्या १ हजार, नोंदणी वेळी भाग भांडवल १५ लाख रुपये, उर्वरित महानगरपालिका प्राथमिक सभासद संख्या ८००, नोंदणी वेळींचे भाग भांडवल दहा लाख, महानगरपालिका (मुंबई /ठाणे/ नवी मुंबई) प्राथमिक सभासद संख्या २०००, नोंदणी वेळी भाग भांडवल ३० लाख उर्वरित महानगरपालिका कार्यक्षेत्र प्राथमिक सभा संख्या १५०० नोंदणी वेळी भागभांडवल २० लाख,  नगरपालिका सभासद संख्या ५००, नोंदणी वेळी भांडवल पाच लाख असणे आवश्यक आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

गाव कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्या २५०, नोंदणी वेळी भांडवल १.५० लाख, तालुका कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्या ५०० भाग भांडवल पाच लाख, जिल्हास्तरावर प्राथमिक सभासद संख्या १५०० भाग भांडवल १० लाख रुपये अशा प्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व त्याखालील नियम, १९६१ च्या तरतुदीनुसार ही नोंदणी केली जाणार आहे.

पतसंस्थेची नोंदणी करताना लाभार्थी महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी, प्रवर्तकांची पार्श्वभूमी तपासणीमध्ये मुख्य व इतर प्रवर्तकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्याकडून अद्यावत सादर करणे बंधनकारक राहील, मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक यांनी माननीय कार्यकारी दंड अधिकाऱ्यासमोर खालील मुद्दे समाविष्ट असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील. यामध्ये ग्राहकाचे ‘आपला ग्राहक जाणा’ याबाबत १००टक्के KYC पूर्तता करणे, प्रवर्तक सावकारी किंवा तत्सम व्यवसाय करत नाही त्याची खात्री करणे, कोणत्याही सहकारी संस्थेचे थकबाकीदार नाहीत याची खात्री करणे, इतर सहकारी संस्थांचे संचालक नाहीत या नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांची नोंदणी नाकारण्यात येईल. प्रत्येक नोंदणीकृत पतसंस्थेसाठी ‘पालक अधिकारी’ नेमणूक – सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दर्जाचा अधिकारी संस्थेला मार्गदर्शन करणार असून यामध्ये हिशोब लेखन, ठेवी व कर्ज व्यवहार, सभा इतिवृत्त, लेखापरीक्षण आणि कायदेशीर बाबींबाबत मदत केली जाईल.

सहकार मंत्री पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. महिला सबलीकरणासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आर्थिक मदत मिळालेल्या महिलांना पतसंस्था स्थापनेच्या माध्यमातून बचत, गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराचे दार खुले होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास सहकार मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान – केंद्रीय मंत्री अमित शाह

0
मुंबई, दि. २०: देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना व्यापार व उद्योगांचे...

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात विचारवंत दिले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २० : पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात थोर विचारवंत व क्रांतिकारक दिले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल - बाल - पाल या त्रयींसह...

महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – केंद्रीय बंदरे...

0
मुंबई, दि. २०: महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री...

५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांना नियमित करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी – मंत्री मंगल...

0
मुंबई, दि. २०: ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे, असे...

‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’त पाच आरजे घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

0
मुंबई, दि. २०: जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिला ‘सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ व ‘महाराष्ट्र...